-
अंनिस ची ‘चला व्यंगचित्र शिकूया’ कार्यशाळा उत्साहात संपन्न
व्यंगचित्रकार आपल्या चित्रातून समाजाच्या चुकीच्या गोष्टीतील व्यंग पकडून त्यावर भाष्य करतो. व्यंगचित्रकार हा समाजाचा जागल्या असतो असे प्रतिपादन व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली यांच्या वतीने आयोजित विवेक रेषा व्यंगचित्र प्रदर्शनानिमित्ताने आयोजित ‘चला व्यंगचित्र शिकूया’ या कार्यशाळेमध्ये बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन अंनिसच्या विवेक रेषा या विशेषांकाचे प्रकाशन करुन झाले.
व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव पुढे म्हणाले की, एखादे व्यंग समजण्यासाठी निरीक्षण महत्त्वाचे असते आणि चित्र काढण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. या दोन्ही मधून व्यंगचित्र तयार होते.
व्यंगचित्रातून अवघड गोष्ट सोपी करून विनोदी पद्धतीने सांगता येते. त्यामुळे लोकांना व्यंगचित्र भावते. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा परंपरा यामध्ये व्यंगाचा अनेक जागा असतात. या समाजाला व्यंगचित्रांच्या माध्यमातून दाखवल्या तर त्यांचं प्रबोधन करणे सोपे होईल.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध ॲनिमेटर जयेश दळवी यांनी ॲनिमेशनचे तंत्र आणि विज्ञानाची सोप्या भाषेत मुलांना माहिती दिली. अर्ध्या तासाच्या ॲनिमेशन फिल्म साठी तब्बल 35 लाख चित्रे काढावी लागतात असे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या सत्रात ओमकार बागवे यांनी कॉमिक्स तयार करण्यामागचे तंत्र शिकवले.
चौथ्या सत्रात व्यंगचित्रकार रोहित कबाडे म्हणाले की, राजकीय विसंगतीवर व्यंगचित्रे जास्त काढली जातात, पण समाजातील अनिष्ट प्रथेविरोधात व्यंगचित्र काढण्यासाठी धाडस लागते. व्यंगचित्रांचा उपयोग समाज प्रबोधनासाठी कसा करता येईल याबाबत कबाडे यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. बाबुराव गुरव यांनी व्यंगचित्र प्रदर्शनास भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, भारतभरातील दीडशे व्यंगचित्रकारांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर व्यंगचित्रे काढून चळवळ गतिमान करण्यासाठी मोठी मदत केली आहे. चळवळीतील कार्यकर्त्यांनी ही नवी माध्यमे चळवळीत वापरली पाहिजेत.
या कार्यशाळेसाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे येथून ६० विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये गौरव सर्जेराव यांनी उपस्थितांची सुंदर व्यंगचित्रे काढून वाहवा मिळवली. सुत्रसंचलन राहुल थोरात यांनी तर स्वागत वाघेश साळुंखे यांनी केले. तर चळवळीची गाणी त्रिशला शहा, आशा धनाले यांनी गायली.
कार्यशाळेचे संयोजन राहुल थोरात, संजय निटवे, आशा धनाले, प्रविण कोकरे, सुहास यरोडकर, मालोजीराजे माने, सरिता पाटील, स्मिता मुलाणी, सचिन करगणे यांनी केले.
