नाभिक समाज आंबेडकरी चळवळीपासून खूप दूर…

वाघेश साळुंखे -

‘वेळप्रसंगी भांडी विका, सण-उत्सव थोडे कमी करा, पण मुलांना शिकवा’, हा संदेश गाडगेबाबांचा आहे असे तुम्हाला वाटेल. पण हा संदेश आहे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा. वीर भाई कोतवाल नाभिक जातीत जन्माला आले होते. पण नाभिक समाजाने तरी त्यांचा हा संदेश किती अंमलात आणला, हा प्रश्नच आहे. गरिबी असताना सण-उत्सव कमी करून शिक्षणासाठी खर्च करणारा नाभिक शोधूनही सापडणार नाही. आधी जत्रा-यात्रा, देवधर्म, सण-उत्सव यासाठी पैसे खर्च करायचे. यातून उरले तर शिक्षणावर खर्च करायचे, असा व्यवहार असणारे लाखो नाभिक भेटतील. दुसरे उदाहरण संत सेना महाराजांचे घेता येईल. संत सेना महाराज एका अभंगात म्हणतात,

धर्माचे थोतांड करून भरी पो
भार्या मुले मठ मजा करी॥१॥
पुराण सांगत नागावाणी डोले।
आविर्भाव फोल करीतसे॥ २॥
गळां माळा भस्म नेसे पितांबर
साधूचा आचार दाखवितो॥ ३॥
सेना म्हणे ऐशा दांभिका भजती
दोघेही जाताती अधोगती ॥ ४॥

इथे सेना महाराज समाजाला स्पष्टपणे धर्माचे थोतांड माजवणार्‍या लोकांबाबत सावध करत आहेत. पण नाभिक लोकांनी सेना महाराजांचा हा महत्त्वाचा उपदेश कधीच ध्यानात घेतला नाही. इतर बहुजनांप्रमाणे नाभिक समाजही धर्माचे थोतांड माजवणार्‍या लोकांच्या भजनी मोठ्या प्रमाणात लागलेला दिसतो.

पुरोगामित्वाची परंपरा

खरे तर नाभिक समाजाला समतावादी आणि पुरोगामी विचारांची चांगली परंपरा आहे. बौद्ध तत्त्वज्ञ उपाली, संत सेना महाराज, जिवाजी महाले, शिवा काशीद, हुतात्मा वीर भाई कोतवाल, हुतात्मा शाहीर लालाजी वाघमारे, भारतरत्न कर्पूरी ठाकूर, राम नगरकर ही सर्व नावे भारताच्या समतावादी, बहुजनवादी, पुरोगामी परंपरेतील आहेत. यातील प्रत्येकाच्या कार्याबद्दल लिहायचे झाले तर पुस्तके लिहावी लागतील. (अनेकांनी ती लिहिलीत सुद्धा.) हे सर्व लोक जन्माने जरी नाभिक असले, तरी त्यांनी केवळ एका जातीसाठी काम कधीच केले नाही. सर्व समाजाच्याच मुक्तीसाठी त्यांनी काम केले. त्यासाठी स्वतः झीज सोसली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८८९ मध्ये पुण्यातील सर्व नाभिकांना संघटित करून विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणला. ब्राह्मण स्त्रियांचा सन्मान जपण्यासाठी त्या वेळी नाभिकांनी ज्योतिबा फुले यांना साथ दिली. नागपंचमीला नाभिक लोक आपले सलून बंद ठेवतात. नाग वंशाबद्दल आणि नागांच्या सांस्कृतिक लढ्याबद्दल सध्याच्या बहुतांश नाभिकांना फारसे काही माहीत नाही. परंतु नागांचा आणि नाभिकांचा काहीतरी संबंध निश्चित असला पाहिजे. अशा प्रकारे नाभिक समाज हा पुरोगामी विचारांची मोठी परंपरा असलेला समाज आहे.

सद्य:स्थिती

नाभिक समाज हा मुळातच अल्पसंख्य समाज आहे. तीन हजार लोकसंख्येच्या गावात साधारणपणे तीन ते पाच कुटुंबे असतात. पारंपरिक हजामती करण्याच्या कामाबरोबर गावातील निमंत्रणे पोहोचवणे, अंत्यविधीमध्ये दहावा करणे, सवर्णांच्या लग्नात नवरदेवाला अंघोळ घालणे, इ. कामेही नाभिक समाजाकडे असतात. स्थळ-काळानुसार या कामांमध्ये बदल होताना दिसतो. या समाजाकडे शेती असली, तरी बहुतांश नाभिक अल्प भूधारक आहेत. तसेच बहुतांश शेतीही कोरडवाहू स्वरूपाची आहे. जातीच्या उतरंडीत नाभिक समाज हा प्रतिष्ठा नसलेला समाज आहे. सध्या हा समाज ‘ओबीसी’मध्ये येत असला. तरी या समाजाची सामाजिक स्थिती ओबीसींपेक्षा खालच्या पातळीवर आहे. ओबीसींमधील इतर जाती आपल्या जातीचे नाव सांगायला लाजत नाहीत; पण नाभिक मात्र आपल्या जातीचे नाव सांगायला लाजतात. जातीचे नाव सांगताना एक प्रकारचा न्यूनगंड व्यत होतो. त्यातल्या त्यात शिकलेल्या व्यतींच्या बाबतीत ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. मग ‘न्हावी’ न म्हणता ‘नाभिक’ हा त्यातल्या त्यात सोफिस्टिकेटेड शब्द वापरला जातो. मनात असा न्यूनगंड निर्माण होण्याचे कारण म्हणजे, या जातीला इतर समाजाकडून वेळोवेळी मिळालेली हिणकस वागणूक आणि ‘न्हावी’ या शब्दाचा समाजाकडून केला गेलेला तुच्छतादर्शक वापर. सकाळी सकाळी न्हाव्याचे तोंड पाहू नये, इथपासून चांगल्या कामाला जाताना न्हावी समोर आला तर ‘अपशकुन झाला’ असे म्हणणे, इथपर्यंत अनेक रूढी, परंपरा, टोमणे, टिप्पण्या, हिणकस शब्दप्रयोग यांतून हा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. अगदी ओबीसींमधील इतर जातीही नाभिकांना अशा पद्धतीने वागवताना दिसतात. नाभिकांचा प्रमुख व्यवसाय केस कापणे आणि दाढी करणे हाही सामाजिकदृष्ट्या अप्रतिष्ठेचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय ‘घाण काम’ या श्रेणीत मोडतो. नाकातले केस काढणे, बगला काढणे हा प्रकार तर खरोखर घाण वाटेल असाच असतो. समोरची व्यक्ती आजारी असेल, अस्वच्छ असेल, तोंडाचा वास येत असेल, वय किंवा इतर कारणाने तोंडातून लाळ गळत असेल तरीही त्या व्यक्तीची हजामत करावीच लागते. हे घाण काम आणि जातीची सामाजिक अप्रतिष्ठा या दोन्ही कारणांनी नाभिक समाज अलीकडे आम्हाला अनुसूचित जातींमध्ये घाला अशी मागणी करू लागलेला आहे.

त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे, अलीकडे गावकीची कामे बंद होत चालली आहेत. आता जवळपास सगळीकडे रोख पैशांच्या मोबदल्यात हजामत केली जाते. त्यामुळे पुरेसा नसला, तरी रोजच्या रोज ‘ताजा पैसा’ मिळतोय. त्यामुळे नोकरी नसली तरी जगण्यापुरता रोजगार आहे. गरिबीत का होईना, पण माणूस जगून निघतोय. उपाशी मरत नाही. पण यामुळे दोन गोष्टी होत आहेत. एक म्हणजे, शिक्षणाबाबत कुठलेच गांभीर्य राहात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक परिस्थिती कधीच बदलत नाही. हजामती करून श्रीमंत झालेला माणूस कुणीही नाही. नाभिकांना कामावर ठेवून जावेद हबीब सारखा माणूस मात्र निश्चित श्रीमंत झाला आहे. त्याचाच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न शहरातील काही नाभिक करत आहेत. पण त्यात फारसे यश मिळालेले दिसत नाही. शिक्षणाच्या बाबतीतही परिस्थिती निराशाजनकच आहे. मुळात शिक्षणाचे महत्त्व जाणणारे लोकच कमी आहेत. त्यातच पारंपरिक व्यवसायात उपाशी न मरण्याची खात्री असल्याने शिक्षण नाही घेतले तरी चालते, असा बर्‍याच तरुणांचा समज झाला आहे. यामुळे पालक आणि त्यांची मुले हे दोन्ही घटक शिक्षणाच्या बाबतीत पुरेसे गंभीर नाहीत.

आंबेडकरी विचार आणि नाभिक समाज

आपल्या जातीला समाजात प्रतिष्ठा नसली, तरी आपण मांग-महारांच्या वरचे आहोत, या विचाराने सुखावणारी मानसिकता पूर्वापार आहेच. यातूनच आंबेडकरी विचार आपल्यासाठी नाहीच, ही भावना सर्वत्र दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा केवळ १४ एप्रिलला शाब्दिक अभिवादन करण्याचाच विषय राहतो. सांविधानिक मूल्यांबाबतही हीच परिस्थिती दिसते. संविधानाने दिलेले आरक्षण हवे; परंतु सांविधानिक मूल्ये जाणून घ्यायची नाहीत. अनेकांना तर ती नकोच आहेत. नाही म्हणायला समाजावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध एकजूट लवकर होते. महाराष्ट्रात काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी ठराव करून नाभिकांच्या सेवांचे दर ठरवले. ग्रामपंचायतीने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर नाभिकांनी आकारू नयेत, असे ठराव काही ग्रामपंचायतींनी केले. त्याविरुद्ध राज्यभरातील नाभिक समाजाने संघटितपणे आवाज उठवला. काही राजकीय नेत्यांनी केलेल्या जातिवाचक आणि कुत्सित टिप्पण्यांविरुद्ध नाभिक समाजाने आंदोलन केल्यामुळे त्या नेत्यांना माफी मागावी लागली. ‘संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे बाबासाहेबांचे दोन संदेश नाभिक समाजाने काही प्रमाणात अंमलात आणले आहेत. पण ‘शिका’ या संदेशाच्या बाबतीत मात्र म्हणावी अशी प्रगती नाही. नाभिक समाजाच्या नेत्यांकडूनही समाजाला पुढे नेण्याचे फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. दिवंगत हणमंतराव साळुंखे (तात्या) यांनी महाराष्ट्रात नाभिक समाजाचे मोठे संघटन उभे केले. इतरही अनेक छोट्या-मोठ्या संघटना उदयास आल्या आहेत. पण वधू-वर मेळावे भरवणे, जयंत्या-पुण्यतिथ्या साजर्‍या करणे, अधिवेशने घेणे आणि किरकोळ आंदोलने करणे यापलीकडे या संघटनांकडून फारसे काम झाल्याचे दिसत नाही. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, संविधानिक मूल्ये रुजावीत, उद्योजकता वाढीस लागावी, व्यसनाधीनता कमी व्हावी, अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात, समाजातील चुकीच्या प्रथा बंद व्हाव्यात यासाठी कुठल्याही संघटनेने किंवा त्यांच्या नेत्यांनी काम केल्याचे दिसत नाही. काही लोक तर जातीय अस्मिता चेतवण्याचेच काम करत आहेत. भूतकाळातले दाखले देऊन नाभिक किती महान आहेत हे सांगितले जात आहे. त्यासाठी पुराणातील कथा आणि सांगोवांगीच्या गोष्टींचा आधार घेतला जातोय. विष्णूच्या नाभीतून नाभिक जन्माला आलेला आहे असे सांगितले की, आमचा नाभिक बांधव हवेत तरंगायला लागतो. अलीकडे नाभिक साहित्य संमेलनासारखे काही विधायक उपक्रम होत आहेत. यातून नाभिक समाजाच्या पुरोगामी वारशाची समाजाला जाणीव करून देता येईल. दुसर्‍या नाभिक साहित्य संमेलनात कॅप्टन महेश गायकवाड यांनी केलेले भाषण आशा जागवणारे होते.

काय व्हायला हवे?

(१) काही लोकांकडून जातीय अस्मिता चेतवल्या जात आहेत, ते पहिल्यांदा थांबवायला हवे. नाभिक किती महान आहेत हे सांगण्यापेक्षा नाभिक महान कसे होतील, यासाठी काम करायला हवे. बौद्ध समाजाकडून काहीतरी शिकायला हवे. बौद्धांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बौद्ध केवळ आरक्षणामुळे पुढे गेलेले नाहीत. आरक्षणासोबतच त्यांनी शिक्षण, वाचन, अभ्यास, व्यासंग या गोष्टींना महत्त्व दिल्याने त्यांच्या परिस्थितीत बदल झाला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. नाभिकांनी मुलांच्या शिक्षणावर भर द्यायला हवा. शिक्षण देण्याच्या बाबतीत मुलगा-मुलगी हा भेद टाळायला हवा.

२) दुसरी गोष्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण ही केवळ बौद्धांसाठी नाही; तर सर्वच बहुजनांसाठी आहे हेही ध्यानात घ्यायला हवे. बाबासाहेबांच्या साहित्याचा, विचारांचा जागर नाभिक समाजामध्ये व्हायला हवा. समाजधुरिणांनी यात पुढाकार घ्यायला हवा.

(३) समाजात व्यसनाधीनता भरपूर आहे. ती कमी होण्यासाठी संघटित प्रयत्न होणे आवश्यक आहे. आजपर्यंत नाभिक समाजाच्या एकाही संघटनेने व्यसनाधीनता कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही. व्यसनाधीनतेविरोधात काम करणे म्हणजे केवळ जनजागृती करणे नव्हे; तर प्रतिबंध, उपचार आणि पुनर्वसन यांवर काम करणे आवश्यक आहे. व्यसनाधीनतेविरोधात एखादे कीर्तन आयोजित करणे आणि व्यसनाधीन तरुणांना माळ घालायला लावणे, हे समस्येवरचे उत्तर नाही. समस्या आणि समाधान यांचे सुलभीकरण टाळायला हवे.

(४) लोकशाहीत अल्पसंख्य समाजाला स्वतःच्या बळावर राजकारण करता येत नाही. त्यासाठी इतर समूहांना सोबत घ्यावे लागते. ‘जनसेवा पक्षा’सारखे राजकीय प्रयोग थांबवायला हवेत. केवळ नाभिकांचा पक्ष राजकारणात टिकूच शकत नाही, याचे भान बाळगायला हवे. आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानाला जातीवर आधारित राजकीय पक्षच अभिप्रेत नाहीत, याची जाणीव असायला हवी. आपली शक्ती नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवणे चुकीचे आहे.

(५) पारंपरिक व्यवसायावरचे अवलंबित्व आता कमी करायला हवे. व्यवसायाच्या नव्या वाटा चोखाळायला हव्यात. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या युगात अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्या शोधायला हव्यात. उद्योजकता विकासाची प्रशिक्षणे व्हायला हवीत. व्यवसायांबाबत पारंपरिक दृष्टिकोन सोडून out of the box जाऊन विचार करायला हवा. केशकर्तन व्यवसायात सुद्धा परदेशात अनेक नवी तंत्रे आलेली आहेत. संघटनांनी त्यांच्या अभ्यासासाठी काही विशेष प्रयत्न करायला हवेत.

(६) धार्मिक कर्मकांडे आणि अंधश्रद्धांमधून नाभिकांनी बाहेर पडायला हवे. धार्मिक जत्रा, वार्‍या, देवाला पशुबळी देणे, सत्यनारायण, ग्रहशांती, तथाकथित अध्यात्मिक पंथांच्या/संघटनांच्या नादी लागणे, भोंदू बुवांच्या नादी लागणे, भविष्य बघणे, लग्न जुळवताना पत्रिका बघणे, मुहूर्त बघणे इत्यादी गोष्टी टाळायला हव्यात. लग्ने अत्यंत कमी खर्चात करावीत.

(७) नाभिक समाजासाठी सुद्धा अ‍ॅट्रॉसिटी कायदा लागू व्हायला हवा. करण्यासारख्या अजूनही अनेक गोष्टी आहेत. पण प्राधान्याने करावयाच्या गोष्टी इथे सांगितल्या आहेत. हे करण्याची जबाबदारी अर्थातच संघटना, समाजाचे नेते, विचारवंत, इत्यादींची आहे. हे काम अवघड नकीच आहे. पण नाभिकांचा पुरोगामी वारसा पुन्हा जागृत करायचा असेल आणि समाजाची प्रगती करायची असेल तर हे करावेच लागेल. याला पर्याय नाही.

वाघेश साळुंखे, वेजेगाव ता. खानापूर

संपर्क छ ९९६०६०६०४४


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ]