डॉ. प्रदीप जोशी -

या कठीण प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थितीत आपण काय करू शकतो? कोरोनामुळे होणार्या कोव्हीड 19 या आजाराची संपूर्ण माहिती आपण करून घेतली पाहिजे. याविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे त्यानुळे आता इथे रीपीट करणार नाही. माहिती घेतांना काळजी घ्या, ती कोणत्या सोर्सकडून आली आहे. सध्या कोणीही चुकिची माहितीसुध्दा टाकीत आहे. योग्य सोर्स असेल,विशेषत: सरकारी असेल तरच विश्वास ठेवा. शंका असेल तेव्हा तज्ञाकडून खात्री करून घ्या. आत्ता आत्तापर्यंत अनेक भंकस उपाय जोरजोरात सांगितले जात होते. सुदैवाने ते आता बंद झालेले दिसताहेत.
लोकांना केवळ करोनापासूनच नव्हे तर अफवांपासूनही आपल्याला वाचवायचे आहे. अफवांचे निरसन करण्यात पुढे रहा त्यासाठी आपण योग्य शास्त्रीय माहिती मिळवत रहा. हा आजार आणि व्हायरसही नवीनच असल्याने त्याविषयीची माहिती सारखी अपडेट होत असते.अफवांपासून लोकांना दूर ठेवणे ही मानसिकता जपण्याचे पहिले आणि सर्वात आवश्यक पाऊल आहे. या आजारावरील उपचारात सोशल डीस्टन्सिंग हे महत्वपूर्ण आहे. यांचे महत्व पटवून द्या.
अजूनही अनेकांना गरज नसतांना फिरणे भूषणास्पद वाटत आहे. ही हुशारीनसून मूर्खपणा आहे. आपणही प्रत्यक्ष लोकांशी संपर्क टाळा पण सोशल मिडीयावर त्यांच्याशी संपर्कात रहा. सोशल मिडीयाचा मला वाटते प्रथमच इतका विधायक वापर करण्याची संधी मिंळाली आहे.
दिवसभर घरात बसून काय करायचे हा प्रश्ण अनेकांना पडला असणार आहे. घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा कसा त्याचे मार्गदर्शन करा. आपल्याकडे पूर्वी अनेक खेळ होते घरात बसून खेळण्याचे.ते आता परत आठवा. पत्ते,कॅरम,सागरगोटे,बुध्दीबळ सारखे. सध्याच्या काळात एका मर्यादेत व्हिडीओ गेम, टीव्हीवरील मालीका यांचाही वापर करता येईल.मुलाच्या बाबतीत मात्र ते वडीलधार्यांच्या नजरेखालीच झाले पाहिजे. अनेक स्त्री पुरुषांच्या बाबतीत एक तक्रार नेहमी ऐकण्यात येते.
मला खर् तर अमुक अमुक करायचे होते पण काय करणार, वेळ च नसतो. त्यांना तर खर म्हणजे ही सुवर्णसंधीच आहे. आणि आता त्यांनी उपयोग करून घेतला नाही तर भविष्यात अशी कुरकुर करायची त्यांना संधी राहणार नाही. खरे तर घरात आपण एकमेकांना किती ओळखतो हा सुध्दा एक चांगला खेळ होईल. कौटुंबिक संबंध अधिक अर्थपूर्ण आणि परीपक्व करण्याचीही संधी बनू शकते.
या सगळ्यांविषयी आपण सोशल मिडिया द्वारे माहिती देऊ शकतो. महासंकटाच्यावेळी खरेतर सोशल बांडींग खूप महत्त्वाचे असते. पण इथे सोशल आयसोलेशनच अनिवार्य असल्याने ते जमणार नाही. तरी पण व्हिडीयो कान्फरन्सिंगने आपल्या फॅमिली ग्रुपशी संपर्कात राहणे, अंताक्षरी खेळणे, हाउसी खेळणे या गोष्टीतून मंडीपण येईल आणि एकमेकांशी संपर्कात राहिल्याने एकटेपणाही कमी होईल. अशा कौटुंबिक मेळाव्यात भजन म्हणणे गाणी म्हणणे प्रार्थना म्हणणे असे उपक्रम मनाला शांती द्यायला उपयोगी पडू शकतात.
ज्या लोकांना भिती वाटतेंय जे चिंताग्रस्त आहेत अशांना आपण फोनवरून बोलून त्यांना मानसिक आधारही देऊ शकतो. त्यासाठी इ मेल, व्हीडीओ चाही वापर करता येईल. जेव्हा असे लोक त्यांची भिती बोलत असतील तेव्हा ‘हट् उगीचच भिती वाटतेंय’ असे म्हणू नका. अंशावेळी त्यांना जास्तीत जास्त बोलू द्या. ते जेवढे बोलतील तेवढा त्यांना धीर मिळणार आहे.त्याच्या भावना मोकळ्या होणे आवश्यक आहे. त्यांच्या मनांत कोणाविषयी राग,संताप असेल तर तो व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
या विशिष्ट परिस्थिती विषयीच्याही सगळ्या भावना मोकळेपणे बाहेर येऊ द्या. याला कँथार्सिस आणि अधिक गाइडेड असेल तर डीब्रिफींग असे म्हणतात. पुढील स्टेज मध्ये आपल्याला सायकोलोजीकल फर्स्ट एड पुरवावी लागणार आहे.
अर्थात हे संकट चालू असतांना आणि संकट आटोक्यात आल्यानंतरही मानसिक अस्वस्थता असणार्यांसाठी करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना आयुष्य पूर्ववत करण्यासाठी मदत करणे,त्यांच्या जवळच्या लोकांशी परत संपर्क स्थापन करून देणे,त्यांच्या मनातील गोष्टींना मोकळी वाट करून देण्याची स्थिती तयार करणे, एकूण परिस्थितीविषयी खरी माहिती पुरवणे, अफवांमुळे काही गैरसमज असतील तर ते दूर करणे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी इतरांना मदत करणे या गोष्टी फायद्याच्या ठरतात.
या काळात प्रत्यक्ष मानसिक आजार असलेले चिंता नैराश्य यांचे पेशंट ओळखणे आवश्यक आहे. त्यासाठी गरज पडली तर वेगवेगळे स्केल्स उपलब्ध असतात त्याचा उपयोग करता येईल. अशा लोकांना मानसोपचार तज्ञांची मदत मिळवून देणे आणि त्याचा रीतसर फोलोअप ठेवणे हेरून काम आपल्याला करता येऊ शकेल.
जे आधीचेच मनोरुग्ण आहेत,अशांकडे जास्त लक्ष द्यावे लागते त्यांच्या गोळ्यांचा डोसही या काळात डजस्ट करावा लागू शकतो. काही गटांकडे जास्त लक्ष ठेवून असावे लागते. लहान मुले व वयस्कर व्यक्ती.
शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण
याआधी कधी अशा महासंकटातून गेलेल्या व्यक्ती म्हणजे आपल्याला कोल्हापूर सांगलीकडे जास्तच लक्ष दिले पाहिजे कारण नुकतेच ते महापूराच्या संकटातून गेले आहेत.कोरोनामुळे ज्या कुटुंबात मृत्यु घडला आहे, त्यांच्याकडेही जास्त लक्ष द्यावे लागेल.
ज्या कुटुंबात भावनिक संबंध घट्ट असतात, कामाविषयी समाधान असते,शिक्षण चांगले असते, अंधश्रध्दांवर विश्वास नसतो तिथे मानसिक ताण कमी आढळतो. एकूण मानस मित्रांना आता तयारीत राहिले पाहिजे, कोरोनाशी लढाई करण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी…