उषा शहा -

महाराष्ट्र अंनिस महिला सहभाग विभागामार्फत सर्व शाखांना महिला दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास अनुसरून काही शाखांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केले. म.अंनिस सोलापूर शाखेने विडी घरकूल येथे महिला विडी कामगारांसाठी कार्यक्रम केला. यावेळी श्रीमती उमा श्रीगांधी आणि श्रीमती येदुरे या महिलांचा सत्कार करण्यात आला. श्रीगांधी हिने स्वत: एक शिवणयंत्र घेऊन कामास सुरुवात केली आणि आता तिच्याकडे तीन यंत्रे आहेत. तिचा मुलगा आणि मुली तिला मदत करतात. ती अतिशय सुरेख डिझायनर ब्लाऊज आणि साड्या तयार करून विकते. मॅचिंग परकरही शिवते. येदुरे हिने छोट्याशा टपरीत किराणा माल विक्री सुरू केली. आता खूप मोठे दुकान चालवते. शिवाय तिने स्वत:चे एक छान घर बांधले आहे. या कार्यक्रमात चमत्कार प्रयोग सादर केले आणि स्त्रियांच्या क्षमतांची चर्चा झाली. इंदुरीकर महाराजांच्या स्त्रियांविषयीच्या वक्तव्याचा सर्वच महिलांनी निषेध केला. हा कार्यक्रम या कामगार महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करणार्या सीमा किणीकर यांच्या उपस्थितीत उषा शहा आणि शालिनी ओक यांनी पार पाडला.
मअंनिस पनवेल शाखा 6 मार्च महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृतिदिन संयुक्तपणे साजरा करते. या निमित्ताने गेली पाच वर्षे समाजात वेगळे काम करणार्या महिलांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी ‘स्कूल व्हॅन’ चालवणार्या महिलांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पाचही महिलांची प्रत्येकीची वेगळी कहाणी होती. या सन्मानामुळे या महिला व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले होते. यावर्षी पहिल्यांदाच कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, स्लो सायकल यासारखे खेळ घेण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आणखी वेगळेपण म्हणजे प्रसिद्ध चित्रपट व मालिका निर्मात्या अपर्णा पाडगावकर यांची आरती नाईक हिने घेतलेली प्रकट मुलाखत. यामध्ये स्त्रियांचे प्रश्न, सुधारकांचे कार्य आणि सावित्रीबाईंचे कार्य असे अनेक विषय उलगडले गेले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय कार्यवाह अल्लाउद्दिन शेख, अनेक समविचारी संघटनांचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका हिने, तर प्रास्ताविक शाखेची महिला कार्यवाह तनुश्री हिने केले.
मअंनिस अलिबाग शाखेने नागाव येथील मैत्र महिला मंडळात महिला दिनाचा कार्यक्रम केला. कार्यक्रमाचा विषय ‘स्त्री उवाच’ असा होता. संत चोख्यामेळ्याची पत्नी सोयराबाईंनी महिलांच्या पाळीला विटाळ मानणे कसे चूक आहे, हे आपल्या अभंगातून मांडले, याची खूप चर्चा झाली. काही कथा आणि निबंध यांचे वाचन करण्यात आले. नीरजा यांनी आपल्या कवितेत भविष्यात स्त्री-पुरुष समानतेने जगतील, हा आशावाद मांडला. यातून स्त्रिया कोणतेही काम करू शकतात, हा विचार सर्वच महिलांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात निर्मला फुलगावकर, संध्या कुलकर्णी आणि शांताराम राऊत या साथींनी सहभाग घेतला होता. ठाणे जिल्हा नेहमी मध्यवर्तीचे सर्व उपक्रम राबवण्यात आघाडीवर असतो. महिला दिनाचे कार्यक्रमही या जिल्ह्याने मोठ्या संख्येने पार पाडले.
1) मराठा सहाय्यक मंडळ, बोरिवली तर्फे 8 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता मंडळाच्या कार्यालयात महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सुशीला मुंडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी स्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2) 9 मार्च रोजी स्वामी समर्थ इंग्रजी माध्यम शाळा, कामशेत, पुणे येथे प्रा. मच्छिंद्र मुंडे सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करुन महिला दिनाचा कार्यक्रम केला. यावेळी बहुसंख्य शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
3) अशोक व वंदना यांच्या घरी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ शाखेतील कार्यकर्त्या आणि इतर महिलांसाठी कार्यक्रम करण्यात आला. किरण जाधव व सुरेखा भापकर यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नाबाबत उपस्थित महिलांना बोलते केले. आहेर कुटुंबीयांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती.
4) 7 मार्च सकाळी 9.30 वाजता तुर्भे पोलीस ठाण्यातील पोलीस स्टाफसाठी महिला विषयक कायदे आणि आपले कायदे यांची माहिती दिली. महिलांना कसे अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवतात यांची उदाहरणे दिली. वक्ता – तृप्ती पाटील.
5) 7 मार्च संध्याकाळी 4.30 वाजता विलेपार्ले येथील लॉ कॉलेजमध्ये विविध कायद्यांची माहिती आणि आपले कायदेसुद्धा सांगण्यात आली. वक्ता – तृप्ती पाटील
6) 8 मार्च सकाळी 11 वाजता रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल कोर्स ठाकुर्ली येथे 100 महिला प्रशिक्षणार्थींना महिला विषयक कायद्यांची महिती देण्यात आली.
7) 8 मार्च संध्याकाळी 4.30 वाजता कल्याण येथील नवरंग बँक्वेट हॉल येथे बाजारपेठ पोलीस स्टेशन आयोजित कार्यक्रमात महिला विषयक आणि आपले दोन्ही कायदे यांची माहिती देण्यात आली. वक्ता- तृप्ती पाटील.
8) आधार इंडिया व शिक्षक स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रेती भवन, डोंबिवली पश्चिम येथे महिला दिन साजरा करण्यात आला. शाहीर एस. एस. शिंदे यांनी महिला सक्षमीकरणाचे विचार मांडले व चमत्काराचे प्रयोग सादर केले. स्त्री-पुरुष समानतेची गीते गायली.
9) 8 मार्च रोजी अंबरनाथ येथे धम्मदीप बुद्ध विहारात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर सुरेखा भापकर यांनी व्याख्यान दिले. समाजातील स्त्रियांची सद्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली. ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
10) 8 मार्चला दुपारी राणू भारत गॅस ऑफिसच्या महिला कर्मचार्यांसाठी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात ऑफिसमधील महिलांचा व त्यांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. सुरेखा भापकर आणि किरण जाधव यांनी महिला कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
11) महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार ज्ञानामृत विद्यालय अंबरनाथ येथे 9 मार्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये ‘गुड टच बॅड टच’ या विषयाबरोबरच महिलांच्या जनन इंद्रियांच्या अंधश्रद्धा बाबतीत किरण जाधव व राजश्री जाधव यांनी मार्गदर्शन केले.
12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग अंबरनाथ पश्चिम यांच्या वतीने दि. 13 रोजी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या आरोग्य विषयक अंधश्रद्धांबाबत किरण जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बबन सोनवणे, राजश्री जाधव, आयोजक अडकमल सर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याने महिला दिनाच्या केलेल्या कार्यक्रमात अंनिसच्या सर्वच साथींनी मोलाचा सहभाग दिला आहे. सर्वच कार्यकर्त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल चौगुले आणि महिला सहभाग विभाग कार्यवाह कल्पना बॉम्बे यांनी कार्यक्रमांचा सविस्तर अहवाल वेळेत पाठवला त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद.
