अंनिवा -
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 यासाठीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी छद्म-विज्ञानाच्या प्रसाराविरोधात लढण्यासाठी आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या भावी पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून राज्यातील प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये एक असे अत्याधुनिक ‘राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क’ स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. या संदर्भातील घोषणा विधानसभेमध्ये करताना अजित पवार म्हणाले की, सध्याच्या काळात देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रसार होत असताना पुरोगामी महाराष्ट्रातील भावी पिढीत अभिजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, ही आपली जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक ‘राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क’ स्थापन करण्याचा निर्णय या शासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये, याप्रमाणे एकूण 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवार यांची विधानभवनातील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद झाली असता, त्यांना यासंदर्भात प्रश्न करण्यात आला. कोणाचेही नाव न घेता आपल्या मिश्किल शैलीत ते म्हणाले की, “सध्या जो उठतो, तो काहीही बोलू लागला आहे. काही जण तर असे देखील म्हणतात की, आंबे खाल्ल्याने मूल होते. आता तुम्हीच सांगा की, असं कधी घडू शकेल का? पण लोकांवर अशा वक्तव्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकार या नात्याने आमची अशी जबाबदारी आहे की, आपल्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार झाला पाहिजे आणि त्याच उद्देशाने आम्ही हे पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आमची खात्री आहे की, त्याचा खूप चांगला फायदा होईल.” अजित पवार यांनी कोणाचे नाव घेतले नाही, तरी त्यांचा रोख सांगलीच्या संभाजी भिडे यांच्यावर होता. भिडे यांनी मध्यंतरी, “माझ्या बागेतील आंबे खाल्ल्यास मुलगा होईल,” अशा प्रकारचे वक्तव्य केले होते व त्यावरून राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता. राज्य सरकारने घोषित केलेल्या ‘राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क’बद्दल अधिकची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. आगामी आर्थिक वर्षात त्याच्या कामकाजाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. तथापि, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मते, राज्य सरकारने हे अत्यंत स्तुत्य पाऊल उचलले आहे आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा परिवर्तनाचा वारसा सांगणारा महाराष्ट्र पुढाकार घेऊन हे काम करीत आहे आणि संपूर्ण देशात एक अनुकरणशील उदाहरण यातून उभे राहील, असा विश्वास समितीला वाटतो.