प्रतीक सिन्हा -
जातीय विद्वेषाला खतपाणी घालणारे संदेश, एखाद्या राजकीय नेत्याबद्दल कोणतीही खातरजमा न करता पाठवण्यात येणारी चारित्र्यहनन करणारी छायाचित्रे किंवा राजकीयदृष्ट्या प्रेरित खोटे किस्से यांचा समाजमाध्यमांवर सुळसुळाट झाला आहे. घराघरांत मोबाईल पोचल्याने इंटरनेटचा महाकाय दरवाजा सताड उघडा झालेला असताना आपल्यापर्यंत येणारी कोणती माहिती खरी आणि कोणते छायाचित्र खोटे या जंजाळात आपण सारेच कधी ना कधी अडकत असतो. खोट्या संदेशांचा वापर करून समाजमन भडकावणे, एखाद्या राजकीय किंवा सामाजिक घटकाविरोधात जनमत तयार करणे आणि थेट दंगल पेटवून निरपराध जनतेचा बळी जाणे इथवर हे सर्व पोचले आहे. या सार्याच्या विरोधात ‘सत्य’
शोधण्यासाठी Alt News ही वेबसाईट साधारण 2017 पासून काम करत आहे. एखादा संदेश, फोटो किंवा विधान सत्य आहे कि नाही याचे ’फॅक्ट चेक’ ही वेबसाईट करते.
खरी बातमी आणि खोटी बातमी यातला फरक लोकांना सांगितला पाहिजे व त्याला समर्पित वेबसाईट सुरू करावी, असा विचार आपल्या मनात कधी आला?
‘फॅक्ट चेकिंग’ ज्याला आपण म्हणतो, ते मी 2013 मध्ये सुरू केले होते. माझे वडील दिवंगत डॉ. मुकुल सिन्हा गुजरात हायकोर्टात वकील होते. त्यांनी गुजरातमधील ‘फेक एन्काऊंटर’ तसेच 2002 गुजरात दंगलीसंबंधीच्या केसेस लढवल्या होत्या. मार्च 2013 मध्ये मी भारतात परत आलो. त्यापूर्वी मी व्हिएतनाममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होतो. या क्षेत्रात मी जवळपास 13 वर्षे नोकरी केली. त्याच सुमारास इशरत जहाँन ‘फेक एन्काऊंटर’ केसमध्ये दुसरे आरोपपत्र सादर झाले व गुजरातमधील काही मोठ्या राजकारण्यांचे नाव त्यात गुंतले होते, हे समोर आले. मी माझ्या वडिलांना म्हणालो की, तुमच्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती आहे, ती आपण एका वेबसाईट टाकूया. ‘ट्रुथ ऑफ गुजरात’ नावाने एक वेबसाईटवर सुरू केली. या वेबसाईटची प्रसिद्धी व्हावी, ती अधिकाधिक लोकांनी बघावी, यासाठी सोशल मीडियावर तिचा प्रचार करण्याची जबाबदारी मी घेतली आणि मी बराच काळ सोशल मीडियावर राहू लागलो. माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागले की, येथे अनेक गोष्टी लिहिल्या जातात, फोटो असतात; जे माझ्या मते चुकीचे होते, खोटे होते. त्या वेळेस डॉ. सुब्रमण्यम स्वामी (सध्याचे शंखनाद) या नावाने एक पेज कार्यरत होते. त्यावर 2013 मध्ये एक ‘पोस्ट’ होती, ज्यात लिहिले होते की ‘बघा, बांगलादेशमध्ये हिंदूंना कसे मारले जात आहे.’ मी जेव्हा ते ‘गुगल रिव्हर्स इमेज’मध्ये जाऊन शोधले, तेव्हा मला कळले की, तो फोटो बांगलादेशमधील राजकीय हिंसाचाराचा असून हिंदूंना मारण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. याचाच संदर्भ घेऊन 2013 सुमारास मी काही लेख लिहिले. पण त्या वेळेस भारतातील इंटरनेटची क्षमता कमी असल्याने व्हिडिओ फारसे नव्हते. त्यामुळे काही फोटोजना घेऊन छोट्या प्रमाणात मी काम सुरू केले होते.
इंटरनेटची बॅण्डविड्थ वाढणे आणि ‘फेक न्यूज’ अधिक पसरू लागणे, याचा काही परस्परसंबंध आहे का?
साधारण 2016, नोव्हेंबरच्या दरम्यान ‘जिओ’चे आगमन झाले. ‘जिओ’ येण्याच्या आधीच इतर मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणार्या कंपन्यांनी त्यांचे रेट कमी केले होते. त्याच सुमारास मोबाईलचे दर देखील कमी झाले होते. अगदी 5 ते 6 हजारांपर्यंत स्मार्टफोन मिळू लागला; म्हणजेच स्वस्त फोन आणि स्वस्त इंटरनेट. सांख्यिकी माहिती काढली, तर मे 2016 ते मार्च 2017 या केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत भारतातील इंटरनेट वापर साडेसहा पट वाढला. हे अभूतपूर्व आहे. जगात असे फार कमी देश आहेत, जेथे इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढला. याच काळात अधिकाधिक माहिती लोकांकडे येऊ लागली. मात्र त्या वेळेस त्यांच्याकडे खरे काय आणि खोटे काय, हे शोधण्याचे कोणतेही मार्ग, शिक्षण व ज्ञान नव्हते. एक प्रकारे माहितीचा विस्फोटच या काळात झाला होता. त्या वेळेस मी आणि आणि माझे सहकारी मोहम्मद झुबेर यांनी असा विचार केला की, सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आमच्याकडे काही विशेष कौशल्य आहे, जे इतर पत्रकारांकडे नाही. त्यात काही फार विशेष असे नव्हते; पण एक महत्त्वाची समस्या होती, ती म्हणजे पारंपरिक पत्रकारिता, ‘खोट्या बातम्या’ अशी समस्या आहे, हेच मान्य करत नव्हती. मी ‘ट्रुथ ऑफ गुजरात’ चालवत होतो; तर झुबेर ‘अनऑफिशिअल सुब्रमण्यम स्वामी’ चालवत होता. त्याला जवळपास 5 लाख ‘फॉलोअर्स’ ‘फेसबुक’वर होते, तर मला जवळपास दोन ते अडीच लाख होते. आम्ही विचार केला की, आम्हाला तयार वर्ग आहे, जे फार कमी ठिकाणी असते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना काही चांगले देता येईल का, असा विचार आम्ही केला; म्हणजे असे बघा की, भारताला आपण तंत्रज्ञानाचे माहेरघर म्हणतो; पण अजूनही आपण मैला उचलणार्या लोकांनी ते काम करू नये, म्हणून कोणतेही तंत्रज्ञान शोधलेले नाही. ‘अल्ट न्यूज’ सुरू करण्यामागची आमची हीच भावना होती.
एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला ‘फेक न्यूज’ म्हणजे काय, हे कसे समजावून सांगता येईल?
मी ‘फेक न्यूज’ हा शब्द वापरत नाही. मी वापरतो ते शब्द म्हणजे दिलेली ‘खोटी माहिती’ म्हणजे ‘मिसइन्फॉर्मेशन’ (misinformation) आणि जाणीवपूर्वक दिलेली खोटी माहिती म्हणजे डीसइन्फॉर्मेशन (disinformation) पहिल्या प्रकारातील लोकांची संख्या अधिक आहे दुसर्यापेक्षा. या गटाला माहिती नाही की, ते पुढे ढकलत असलेली माहिती खोटी आहे किंवा त्यांच्याकडे साधने देखील नाहीत की ज्यांचा वापर करून ते खरे-खोटे शोधू शकतील. त्यामुळे जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवणार्या गटाला ते बळी पडतात. भारतीयांच्या संदर्भात विचार केला तर ‘डिसइन्फॉर्मेशन’ पसरवणारे लोक बहुतेककरून राजकीय फायद्यासाठी करतात. त्यात ते अल्पसंख्याकांना लक्ष्य करतात. केवळ मुस्लिम जनतेमुळेच देशाला बेरोजगारी, गरिबी असे प्रश्न भेडसावत आहेत; म्हणजे 2017 मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली, तेव्हा आत्यंतिक हिंसेचे व्हिडिओ आम्ही बघितले, ज्यावर दावा असायचा की, हे मुसलमानांनी केले आहे म्हणून. शोध घेतल्यावर समजायचे की, हे व्हिडिओ भारताबाहेरचे आहेत किंवा यातील खरा आरोपी तर हिंदूच आहे; म्हणजे जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ लागला. अजून एक प्रकार म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या खोटी माहिती पुरवणे. कोणतेही औषध कोणत्याही रोगावर परिणामकारक आहेत, असे दावे करणे. त्याचसोबत माध्यमांकडून येणारी चुकीची माहिती, जेव्हा खुद्द माध्यमेच सत्यता न पडताळता किंवा जाणीवपूर्वक अशी माहिती पुढे ढकलतात. हे प्रकार अधिकांश वेळेस वाहिन्यांवर होतात, ना की, वर्तमानपत्रात. चौथा प्रकार म्हणजे वैयक्तिक बदनामी करण्यासाठी पसरवली जाणारी खोटी माहिती; म्हणजे शेहला रशीदने कथुआ बलात्कार केसमध्ये पैसे खाल्ले किंवा गुरमेहर कौर दारू पिऊन पार्टी करते वगैरे बातम्या पसरवायच्या. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या ‘मिसइन्फॉर्मेशन’ना आपल्याकडे एकत्रित ‘फेक न्यूज’ असे म्हटले जाते आणि बहुतांश ठिकाणी राजकीय फायद्यासाठी त्याचा शस्त्र मानून वापर होतो.
बर्याच वेळेस बघितले आहे की, खर्या बातमीपेक्षा अधिक वेगाने खोटी बातमी पसरते. हे नक्की घडते कसे?
जसं मी म्हणालो की, एका छोट्या गटाकडून ही जाणीवपूर्वक पसरवायची खोटी माहिती तयार केली जाते आणि अतिशय मोठा गट ती खोटी माहिती खरी समजून स्वीकारतो व पुढे ढकलतो. जो गट या खोट्या बातम्या तयार करतो, त्यांना हे ठाऊक असते की, कोणती बातमी समाजाच्या भावनांशी खेळू शकते. जेव्हा आपण म्हणतो की, एखादी पोस्ट ‘व्हायरल’ झाली, त्याचा अर्थच असतो की, समाजाच्या एका वर्गाच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. बर्याच खोट्या बातम्या या हिंसेशी जोडलेल्या असतात. हिंसा बघितल्यावर मनुष्याला वस्तुनिष्ठ किंवा तार्किक विचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे एखादा हिंसेचा व्हिडिओ घेतला जातो आणि त्यावर चुकीची ओळ लिहिली जाते. ज्या दुभंगलेल्या समाजात आपण राहात आहोत, तेथे अतिशय कट्टर मते झाली आहेत. त्यामुळे साहजिकच तो व्हिडिओ इतरांना पाठविला जातो. बर्याच वेळेस सांगितले जाते की, ‘ही माहिती मीडिया सांगणार नाही किंवा मीडिया सत्य सांगणार नाही. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की, हा व्हिडिओ पुढे इतरांना पाठवा.’ म्हणजे प्रथम तुम्हाला भावनिकदृष्ट्या भडकवले जाते, खरे-खोटे समजायचा विवेक गळून पडतो आणि मग आवाहन केले जाते की, तुमच्यात हे सत्य सगळ्यांना सांगायचे आहे. पूर्वी निवडणुकीच्या आधी दंगली व्हायच्या आणि जनमत दुभंगायचे. आता दिवसातून तीन-चार असे मेसेज पाठवून लोकांना विभागले जाते.
फक्त एकाच विचारसरणीच्या लोकांकडून खोट्या बातम्या पसरवल्या जातात का?
तसं नाही. सर्वच राजकीय पक्षांत असे लोक आहेत; पण संख्येत मात्र प्रचंड फरक आहे. भाजपला मदत करणारी खोटी माहिती इतरांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात आहे. ‘तबलिगी जमाती’चेच उदाहरण घ्या. केवढ्या मोठ्या प्रमाणात वाट्टेल ते मेसेज येत होते; पण शेवटी उच्च न्यायालयांनी देखील तसे काही नसल्याचे सांगितले आहे. मी असे नाही म्हणणार की, ‘तबलिगी’बद्दल लिहिणे चुकीचे आहे. कारण जेव्हा सार्या जगात कोरोनासारखा रोग पसरला होता, तेव्हा एखादा धार्मिक कार्यक्रम करणे आणि त्यानंतर सार्या देशभर पसरणे, याबद्दल लिहिलेच पाहिजे. दक्षिण कोरियाचे उदाहरण घ्या. तिथल्या ‘सुपर स्प्रेडर’ चर्चबद्दल खूप लिहिले गेले; पण इथे हाच मुद्दा जवळपास 20 दिवस मुख्य मुद्दा बनवला गेला. जेव्हा त्यांनाच ‘टेस्ट’ कराल, तेव्हा साहजिकच त्यांचे रुग्ण अधिक येणार. वृत्तवाहिन्यांवर ‘ग्राफिक्स’ केले गेले. यातून संदेश दिला गेला की, मुसलमान कोरोना पसरवत आहेत. त्यानंतर एक व्हिडिओ आला, ज्यात नोट तोंडाला लावली जात आहे व ‘अल्लाह का कहर’ असे म्हणत आहे. ‘अल्ट न्यूज’मध्ये आम्हीच चार बातम्या केल्या, ज्यात अशा खोट्या व्हिडिओचा भांडाफोड आम्ही केला. गुजरात, मध्य प्रदेश येथे खिशातून पैसे पडल्याचे व्हिडिओ ‘व्हायरल’ झाले आणि मुसलमान नोटांद्वारे रोग पसरवत आहेत, असा मेसेज दिला गेला. काही ठिकाणी मौलवी होते, जे सांगत होते की, चीनमध्ये मशिदीत गेलेल्यांना कोरोना झाला नाही. आम्ही नुकतीच सुदेश ठाकूर नावाच्या एका उजव्या विचारसरणीच्या माणसाची मुलाखत घेतली. दिल्ली दंगलीच्या वेळेस त्याने एक ‘फेसबुक व्हिडिओ’ केला व दावा केला की, त्याने एका मुसलमानाला कायमच स्वातंत्र्य दिले. आम्ही जवळपास 5-6 तास बोललो त्याच्याशी. तो जे सांगत होता, ‘आम्हाला ते केवळ व्हॉट्सअॅपवर आलेले संदेश होते.’ तो म्हणाला की, ‘मी ‘सुदर्शन न्यूज’ बघतो. हे सगळं प्रचारतंत्र आहे, प्रपोगंडा आहे, ज्याचा अत्यंत खोल परिणाम समाजावर होत आहे, ज्यातून द्वेष, कट्टरता आणि दुभंगलेला समाज तयार होत आहे.
पत्रकारितेचे मूलभूत तत्त्व ‘खात्री करा आणि दाखवा’ हे आहे. जर ते खरोखर पाळले गेले तर ‘फॅक्ट चेक’ करण्याची वेगळी गरजच पडणार नाही, असे तुम्हाला वाटते का?
खोटी माहिती मुख्य प्रसारमाध्यमांतूनही येते, तशीच सोशल मीडियावरून देखील. त्यामुळे ‘फॅक्ट चेकर’ची गरज तुम्हाला लागणारच आहे. अगदी ज्या देशात मीडिया प्रामाणिकपणे काम करतो, तेथेदेखील ती आहे. अमेरिकाच बघा. तेथे सर्व काही असून देखील खोटी माहिती पसरतेच. आपण अशा जगात राहात आहोत, जेथे माहितीचा विस्फोट झाला आहे. सध्या माध्यमांचे लोकशाहीकरण जरूर झाले आहे; पण ती दुधारी तलवार आहे. त्यातून अनेक वेळा चुकीची माहिती देखील सांगितली जाते. माध्यमात येणारी खोटी माहिती ही डिजिटल व वृत्तवाहिन्यांत अधिक आहे वर्तमानपत्रांपेक्षा. तेथील व्यावसायिक मॉडेल देखील असे आहे की, त्यांना जास्तीत जास्त दर्शक खेचण्यासाठी त्यात ‘मसाला’ टाकावा लागतो; म्हणजे तुम्ही घाईत फेरतपासणी तर करत नाहीच; पण त्याचबरोबर ते अधिक खळबळजनक करण्याचा प्रयत्न करता. बातम्या दाखवणार्या वाहिन्यांची स्पर्धा मालिकांसोबत झाली आहे. सुशांतसिंह राजपूत केसमध्ये ज्या अफवा किंवा गप्पाटप्पा रोमांचक मालिकेच्या भाग झाल्या असत्या, त्या बातम्या म्हणून समोर आल्या आहेत. ही केवळ इथलीच समस्या नाही. जेव्हा सर्वच लोकशाही व्यवस्था कोसळतात, तेव्हा तो लोकशाहीसमोरच समस्या निर्माण होते. आपली मूल्यव्यवस्थाच इतकी कोसळू लागली आहे की, आपण काहीही चुकीचे केले तरी सुटू, ही भावना बळावत चालली आहे.
बर्याच वेळेस असे सांगितले जाते की, ‘हा मेसेज तर चांगला आहे, निरुपद्रवी आहे. खोटा असला तरी काय झाले?’ याला उत्तर कसे देणार?
यातून काही वाईट होत नाही, हे बोलणेच चुकीचे आहे. जेव्हा थाळ्या वाजवायला सांगितल्या, तेव्हा वरवर निरुपद्रवी वाटले असेल; पण लोक तर अनेक ठिकाणी जथ्थ्याने निघाले. त्यातून रोगाचा प्रसार झाला नसेल का? अशा मेसेजमधून ‘मेंदूबंद’ समाजाच्या निर्माणाची प्रक्रिया होते. डॉक्टर आणि नर्स पगाराची मागणी करताना विमानातून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करणे, यातून एकच गोष्ट सध्या होते, ती म्हणजे लोकांचे लक्ष मुद्द्यांपासून वळवले जाते.
सत्याची बाजू घेऊन लढताना तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागला का?
खरं सांगू का, मला एवढ्या काही धमक्या आलेल्या नाहीत. खर्या पत्रकाराला, जो सत्य उघड करतो किंवा करते, त्यांना सध्या जशा धमक्या मिळतात, त्या आम्हाला नाही मिळत. आमचे प्रश्न वेगळे आहेत. एक म्हणजे आम्हाला खूप हिंसा बघावी लागते. एखादी ‘क्लिप’ आम्हाला सतत बघावी लागते. कारण त्यातील सत्य शोधायचे असते. समाजाच्या एका काळ्या बाजूकडे सतत बघावे लागते. त्याचा मानसिक ताण अधिक येतो. दुसरे म्हणजे ‘ऑनलाईन’ शिव्या. मला एक फोन आला होता धमकीचा. माझ्या सहकार्यावर एक खोटी केस झाली आहे. माझ्या मते, खरा धोका इंग्रजीमध्ये न लिहिणार्या छोट्या शहरांतील पत्रकारांना अधिक आहे.
खोटी माहिती पसरवणार्या व्यक्तींच्या विरोधात कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते?
माझ्या मते, कायदेशीर कारवाई होऊ नये. भारतात तसा कोणताही कायदा नाही, सिंगापूर व जर्मनीमध्ये काही कायदे झाले आहेत. भारतातील सध्याच्या परिस्थितीमध्ये कायदा धोकादायक ठरू शकतो. तुम्ही खोटी माहिती हा गुन्हा ठरवला, तर माहिती हा देखील अप्रत्यक्षपणे गुन्हा ठरू शकतो. कारण ही माहिती खोटी आहे, असे कोण ठरवणार? सरकारच्या हातात जर का तशी सत्ता दिली गेली, तर त्याचे पहिले बळी पत्रकार ठरतील. सध्या ज्या प्रकारचे सरकार अस्तित्वात आहे, त्यांना जर का आपण कायदेशीर अधिकार दिले, तर उद्या प्रत्येक बातमी त्याच चष्म्यातून बघितली जाईल आणि खोटी ठरवून पत्रकारांनाच दोषी ठरवले जाऊ शकते. केंद्र सरकारने सध्या PIB Factcheck नावाचे एक अकाउंट सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात पायी गेलेल्या मजुरांच्या मृत्यूवेळी या अकाउंटने ते मृत्यू दीर्घकालीन आजारामुळे झाल्याचे सांगितले. आम्ही चारजणांच्या कुटुंबाशी बोललो. आम्हाला त्या कुटुंबांनी सांगितले की, असा कोणताही आजार त्या मजुरांना असल्याचे त्यांना माहीत नाही. दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे फौजदारी कायद्यात तुम्हाला हेतू सिद्ध करावा लागतो. तो तुम्ही इथे कसा सिद्ध करणार? मुद्दाम केले की, चुकून किंवा गैरसमजातून? जर एखादी व्यक्ती नव्यानेच इंटरनेट वापरू लागली असेल आणि खरे व खोटे यातील फरक कसा ओळखावा, याचे ज्ञान तिला नसेल तर ती व्यक्ती जे वाचले आहे, ते खरे समजून एखादा मेसेज पुढे पाठवू शकते; मग तुम्ही हेतू कसा ठरवणार? सध्याच्या काळात एखादी माहिती कुठून उगम पावली आहे, हे ठरवणे जवळपास अशक्य आहे. मग अशा वेळेस पोलीस कोणाला तरी पकडतील. कारण त्यांना कागदावर काहीतरी दाखवावे लागेल. मूल पळवणार्या टोळीचा मेसेज एखादी व्यक्ती काळजीने देखील इतरांना पाठवू शकते. तुम्ही हेतू ठरवणार कसा? या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे.
मग या समस्येवर उपाय काय?
इथे 100 टक्के उपाय नाही. आपल्याला सुरुवात करावी लागेल, मोठ्या प्रमाणावर जागरूकता अभियान सुरू करून. जगभरात अशा अभियानांचे परिणाम दिसून येत आहेत. तुम्ही अनेक गावांमध्ये गेलात, तर ‘फोटोशॉप’ नावाचे काही सॉफ्टवेअर आहे, हेच लोकांना माहीत नाही. जर फोटो ‘मॉर्फ’ करता येतो, हेच लोकांना ठाऊक नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये आलेला फोटो खोटा आहे, हे कसे काय कळेल? भारतात ‘लिंचिंग’ होत आहे; पण श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये होत नाहीये. शिक्षण, माहिती साक्षरता, जागरूकता वाढवणे, यांसारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण ‘फेसबुक’सारख्या माध्यमांचा विहारच अजून केलेला नाही. म्यानमारचे उदाहरण आपल्या समोर आहे. कंबोडियामध्ये एका बौद्ध भिक्खूवर महिलांशी लैंगिक संबंध केल्याचा आरोप ठेवल्याने व ‘फेसबुक’वरून तो आरोप पसरल्याने देश सोडायची वेळ आली. त्यामुळे खोटी माहिती पसरत असताना ‘फेसबुक’ किंवा ‘ट्विटर’सारख्या इतर माध्यमांच्या भूमिकेचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या ज्या बिझनेस मॉडेलबद्दल आपण बोललो, तेच मॉडेल यांचे देखील आहे. जितक्या अधिक जाहिराती तुम्ही बघाल, तेवढे अधिक पैसे त्यांना मिळतील. तुम्ही अधिक जाहिराती तेव्हाच बघाल, जेव्हा तुम्ही अधिक काळ त्या माध्यमांचा वापर कराल आणि त्यासाठी तुम्हाला त्या कंपन्या गुंतवून ठेवतात. ही लढाई साधी, सोपी नाही. आपण अजून सुरुवात सुद्धा केलेली नाही.
तुम्ही अनेक गावांमध्ये गेलात, तर ‘फोटोशॉप’ नावाचे काही सॉफ्टवेअर आहे, हेच लोकांना माहीत नाही. जर फोटो ‘मॉर्फ’ करता येतो, हेच लोकांना ठाऊक नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये आलेला फोटो खोटा आहे, हे कसे काय कळेल? भारतात ‘लिंचिंग’ होत आहे; पण श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये होत नाहीये. शिक्षण, माहिती साक्षरता, जागरूकता वाढवणे, यांसारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण ‘फेसबुक’सारख्या माध्यमांचा विहारच अजून केलेला नाही. म्यानमारचे उदाहरण आपल्या समोर आहे. कंबोडियामध्ये एका बौद्ध भिक्खूवर महिलांशी लैंगिक संबंंध केल्याचा आरोप ठेवल्याने व ‘फेसबुक’वरून तो आरोप पसरल्याने देश सोडायची वेळ आली. त्यामुळे खोटी माहिती पसरत असताना ‘फेसबुक’ किंवा ‘ट्विटर’सारख्या इतर माध्यमांच्या भूमिकेचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या ज्या बिझनेस मॉडेलबद्दल आपण बोललो, तेच मॉडेल यांचे देखील आहे. जितक्या अधिक जाहिराती तुम्ही बघाल, तेवढे अधिक पैसे त्यांना मिळतील. तुम्ही अधिक जाहिराती तेव्हाच बघाल, जेव्हा तुम्ही अधिक काळ त्या माध्यमांचा वापर कराल आणि त्यासाठी तुम्हाला त्या कंपन्या गुंतवून ठेवतात. ही लढाई साधी, सोपी नाही. आपण अजून सुरुवात सुद्धा केलेली नाही.
संपर्कासाठी पत्ता:
प्रतीक सिन्हा
प्रावदा मीडिया फौंडेशन, 2, स्वागत पॅलेस, शेल पेट्रोल पंप समोर,आंबली बोपल रोड, अहमदाबाद- 380058
ई मेल – pratik@altnews.in
www.altnews.in
(आर्थिक मदत करण्यासाठी वरील पत्यावर संपर्क साधावा)