दिलीप अरळीकर - 9422468413
आंतरजातीय व सत्यशोधकी विवाह लावणे, हा ‘अंनिस’च्या अनेक उपक्रमांपैकी एक यशस्वी उपक्रम आहे. लातूर ‘अंनिस’ शाखेने 275 विवाह गेल्या अनेक वर्षांत लावले आहेत.
कोरोना पाश्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात साहजिकच अशा विवाहांचे (खरं तर सर्वच प्रकारच्या पारंपरिकसुद्धा) प्रमाण कमी राहिले, तरी लातूर ‘अंनिस’ने असे आंतरजातीय व सत्यशोधकी पाच विवाह या काळात सर्व सरकारी व सामाजिक बंधने पाळून लावले.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन पूर्वी, 19 मार्चला एकाच दिवशी दोन विवाह लावले.
विवाहासंबंधी माहिती आपण आपल्या व्हॉट्स अॅप ग्रुपला टाकली. बरोबर सनातन संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन, शिवाजीनगर, लातूर येथे अर्ज देऊन याला अडथळा आणला. पोलिसांनी अतितत्परतेने पावले उचलून हा विवाह लावणे बेकायदेशीर आहे, असे म्हणून आपण जिथे लग्न लावतो, त्या हॉटेल अंजनीला नोटीस दिली; तसेच साध्या वेशातील पोलीस तिथे ठेवले.
त्या दिवशी लातुरात एक हजार लग्ने होती व ती सर्व यथायोग्य पार पडली. यावेळेस लातूर ‘अंनिस’चे जिल्हाध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे यांनी अशी भूमिका घेतली की, आपण लग्न खासगी जागेत लावू शकतो. त्यानुसार अॅड. गोमारे यांच्या खासगी जागेत ते दोन विवाह लावण्यात आले. यावेळेला ‘अंनिस’ची सर्व टीम कार्यरत होती.
लॉकडाऊन कडक झाल्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवरच मर्यादा आल्या. त्यामुळे दोन महिने विवाह होऊ शकले नाहीत. जुलैमध्ये आम्ही एक आंतरजातीय विवाह लावला. हा विवाह सनसनाटी होता. मुलीच्या नातेवाईकांनी तिला परगावी पाठविले होते. पण मुलगा व मुलगी यांनी हिमतीने लातूरला येण्याची हिंमत दाखविली. आम्ही त्यांचा विवाह गावाबाहेर, मुलाच्या नातेवाईकांच्या शेतात लावला. मुलीच्या नातेवाईकांनी मुलगी मिसिंग असल्याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार नांदेडचे पोलीस तिच्या शोधार्थ लातूरला आले. त्यांचा आमच्याशी संपर्क झाला. मुलगा-मुलगी आमच्या घरीच होते. तेव्हा नांदेडचे पोलीस, मुलगा-मुलगी, मुलाचे नातेवाईक व ‘अंनिस’चे कार्यकर्तेव वकील सुरेश सलगरे अशी मीटिंग झाली. आम्ही सर्व कागदपत्रे पोलिसांना दाखविली. पोलिसांनी मुलाचा जबाब घेतला. काहीही बेकायदेशीर नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला; तसेच आई-वडिलांना कळविले. या प्रकरणात ‘अंनिस’चे प्रकाश घादगिने, रुक्साना मुल्ला, सुधीर भोसले, रामकुमार रायवाडीकर यांनी सहभाग नोंदविला. माधव बावगे यांचे मार्गदर्शन होतेच. वरील सर्व विवाहात सुनीता अरळीकर यांचा सहभाग होता.
पुढची दोन लग्ने या महिन्यात लावली. सर्व काही आपल्या विचाराने, पद्धतीने, शारीरिक अंतर पाळून, सरकारी नियम पाळून पार पडली. पाहुण्यांना सॅनिटायझर वापरणे; तसेच वधू-वरांकडून उपस्थित असलेल्या पाहुण्यांना मुखपट्टी भेट देण्यात आली. यावेळी लातूर ‘अंनिस’चे शहराध्यक्ष हॉटेल अंजनीचे मालक बबु्रवान गोमसाळे यांचे खूप सहकार्य लाभले. पाचही लग्नांत ‘अंनिस’चे सर्व कार्यकर्तेसक्रिय होते.
– दिलीप अरळीकर कार्यवाह, मिश्रविवाह विभाग मअंनिस