-

भोर अंनिसकडून 78 कुटुंबांना धान्य व भाजी वाटप
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा भोर यांच्या वतीने दि. 28 मे 2020 रोजी हरदेवनगर झोपडपट्टी, महाड नाका, भोर या ठिकाणी लॉकडाऊनमुळे वंचित झालेल्या 78 कुटुंबांना जीवनावश्यक धान्य व भाजी वाटप करण्यात आले. यामध्ये हरदेवनगर झोपडपट्टीतील 40 व वैशाली टॉकीजसमोरील झोपडपट्टीतील 38 भटक्या व विमुक्त; तसेच आदिवासी समाजातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. जीवनावश्यक धान्य व भाजीच्या किटमध्ये 4 किलो गहू, 1 किलो साखर, 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो गोडेतेल, 1 किलो बटाटे, 1 किलो कांदे, पाव किलो लसूण व 5 लिंबे यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. विद्या कदम, ‘अंनिस’चे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, फुले-शाहू आंबेडकर विचार प्रचारक मंडळाचे देविदास जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘अंनिस’ भोरचे कार्याध्यक्ष धनंजय कोठावळे यांनी स्वागत, डॉ. अरुण बुरांडे यांनी प्रास्ताविक, डॉ. आनंद कंक यांनी सूत्रसंचालन केले. तसेच कार्यक्रमाचे शेवटी लाभार्थ्यांच्या वतीने कावेरी तानाजी शिंदे यांनी आभार मानले.
राजेंद्र जाधव यांनी ‘कोविड-19’बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव व तहसीलदार अजित पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धान्य व भाजीचे किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रचारक मंडळाचे प्रा. रवींद्र भालेराव, सुनंदा गायकवाड, दादा गायकवाड, नीलेश घोडेस्वार, हरदेवनगर मधील सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे व तानाजी शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ‘अंनिस’ भोरचे सुरेश शाह अध्यक्ष, अमन मुल्ला सचिव, कॉ. ज्ञानोबा घोणे, डॉ. ए. सी. बिराजदार, डॉ. इम्रान खान, विवेक पोळ, संतोष देशमाने, सुरेश सुतार, अधिकराव सुतार, सविता कोठावळे, सुजीत चव्हाण, संतोष दळवी यांनी प्रयत्न केले. शेवटी भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रम संपला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सॅनिटायझर, मास्क, शारीरिक अंतर या तत्त्वांचे पालन करण्यात आले.

धुळे शाखेकडून प्रवासी मजूरांना क्षारसंजीवनीचे वाटप
महाराष्ट्र अंनिसच्या पंचसूत्रीनुसार विविध उपक्रमशील सामाजिक चळवळीत सहभाग याचा भाग म्हणून येथीत अंनिसच्या धुळे शाखेने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून आपआपल्या राज्यात परतणार्या स्थलांतरितांना ’ओआरएस’ म्हणजे क्षारसंजीवनीचे वाटप केले.
धुळे शहर हे दोन महामार्गांवर वसलेले आहे. त्यामुळे उत्तरेकडील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड येथील पुणे, मुंबई, औरंगाबाद व सुरत आणि इतर लहान-मोठ्या शहरांमध्ये विविध काम करणारे परप्रांतीय मजूर लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवल्यामुळे आपआपल्या राज्यात, गावी परत जात आहेत. जागोजागी अनेक दात्यांनी या लोकांसाठी प्रसिध्दीच्या माध्यमातून दूर राहत अन्नछात्रालये उभारली आहेत. भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील क्षार व पाणी कमी होते व उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून अंनिसने वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून ओ.आर.एस.चे वाटप केले. ‘गरज तशी खूप मोठी आहे, आभाळ फाटलंय, किती ठिगळ लावणार ?’
परंतु आपल्या आर्थिक क्षमतेनुसार धुळे शाखेने राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष अॅड. जे. टी. देसले, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुरेश बिर्हाड, जिल्हा प्रधान सचिव प्रा. डॉ. दीपक बाविस्कर, दिलीप खिंवसरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पाडला. याप्रसंगी शाखेचे कार्याध्यक्ष रणजित शिंदे, प्रधान सचिव दिनेश मोरे, जिल्हा बुवाबाजी संघर्ष समितीचे कार्यवाह नितीन बागूल, कार्यालयाचे पूर्णवेळ कार्यकर्तेनवल ठाकरे, संदीप देवरे व अन्य साथी उपस्थित होते. या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणार्या दात्यांचे आभार.
अंनिसचे कार्यकर्ते मेघराज गायकवाड यांनी आपल्या संपूर्ण पगारातून किराणा किट वाटप केले
अहमदपूर, जि. लातूर येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून मेघराज गायकवाड हे गेल्या वीस वर्षांपसून अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम आहेत. ते येथील पोस्ट कार्यालयात खातेबाह्य टपाल कर्मचारी म्हणून गेली 25 वर्षांपसून जनसामान्यांच्या सुख-दुःखाचा निरोप पोहोच करत आहेत. शासनाला निधी न पाठवता, आपण ज्या गावी राहतो, त्याच ठिकाणी अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांना थोडीफार मदत करण्यासाठी म्हणून यावर्षी या जागतिक महामारीच्या संकटात आपलंही समाजासाठी, राष्ट्रहितासाठी आपले काहीतरी योगदान असावे, म्हणून त्यांना महिन्याला मानधन 14931 रु. मिळते. त्यातून त्यांनी 60 गरजू कुटुंबीयांना धान्य वाटप केले.
समाजाच्या उन्नतीसाठी व समाजाच्या विकासासाठी ‘अंनिस’ ही सतत प्रयत्नशील राहणारी संघटना आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण बाजारपेठा बंद असल्यामुळे यात अहमदपूर शहरामध्ये परराज्यातील; तसेच परजिल्ह्यातील लोक अडकून पडले असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने गरजवंतांना अन्नधान्य वाटप करीत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अंनिस शाखांची कोरोना संकट काळात मदत
उस्मानाबाद जिल्हा शाखेसह मुरूम, कळंब, परंडा, कलदेव निंबाळा, उमरगा या विविध शाखांमधून गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या 190 किटचे, 550 मास्क व 130 सॅनिटायझरचे; तर काही ठिकाणी अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. काही पदाधिकार्यांनी व्यक्तिगत पातळीवर, तर डॉ. महेश मोटे यांच्या मुलीचा 9 एप्रिल रोजी वाढदिवस साजरा न करता 5000 रुपये ‘कोविड-19 मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ऑनलाईन पाठविण्यात आले. आपले पदाधिकारी हे बहुसंख्येने कर्मचारी असल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन याकामी देण्यात आले. श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम व ‘मअंनिस’, उस्मानाबाद जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवक-युवती मनोबल संवाद मोहीम’ सुरू करून 2427 विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक जनजागृती होण्यासाठी संदेश पाठविण्यात आला. या माध्यमातून 437 युवक-युवतींनी या मोहिमेअंतर्गत संवाद साधून समज-गैरसमज याविषयी चर्चा केली. जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने, अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, घरातच राहावे, अशा स्वरुपाचे प्रसार माध्यमांद्वारे आवाहन, ‘विझलेले दिवे आणि कोरोनाशी लढणारा माणूस’ या विषयावरील चर्चेत सहभाग आणि ‘अंनिस’ची भूमिका मांडली. जन्मतःच बाळ बोलले, जागे राहाल तर जगाल, अशा अफवांबद्दल व चुकीच्या माहितीबद्दल वृत्तपत्रातून आपली भूमिका मांडण्यात आली. सोशल मीडियावर भीतिदायक अफवा, गैरसमज पसरविणार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वृत्तपत्रांतून करण्यात आली. जिल्ह्यात मनोबल हेल्पलाईनद्वारे प्रा. किरण सगर, चंद्रकांत उळेकर, डॉ. महेश मोटे यांनी फोनद्वारे नागरिकांच्या शंका, समस्या व मानसिकता या विषयावर योग्य तो संवाद साधून नागरिकांचे मनोबल व मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. मुरूमच्या माधवराव पाटील महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ता. 14 मार्च 2020 रोजी ‘कोरोना स्तंभ’ भित्तिपत्रकाचे आयोजन करून विद्यार्थी व पालक यांच्यात कोरोना विषाणूविषयक जनजागृती केली. कळंब शाखेकडून 800 रुपये रकमेचे 20 किट गरजू कुटुबीयांना वाटप करण्यात येऊन या शाखेमार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंधश्रध्दा निर्मूलनविषयक उत्कृष्ट कार्यक्रम प्रा. बालाजी राऊत, प्राजक्ता पाटील, अरविंद शिंदे आणि त्यांच्या टीमने घेतल

पुणे अंनिस तर्फे ससून हॉस्पिटलला सेफ्टी किट भेट
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या वर्गणीतून ससून हॉस्पिटलमधील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांसाठी तीस सेफ्टी किटस् देण्यात आले. ससुनच्या तज्ञ डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी सुचविल्याप्रमाणे घेतलेले हे सेफ्टी किट त्यांच्याकडे पुणे शहर शाखेचे अध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी सुपूर्द केले. यावेळी अं.नि.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक गिरमे म्हणाले, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचा मृतदेहाशी प्रत्यक्ष संबंध येतो. त्यांचे कार्य अत्यंत धोकादायक असून त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन आम्ही त्यांना सुरक्षा किट दिले आहेत.
दीपक गिरमे, श्रीपाल ललवाणी, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, गोविंद काजरोळकर, वसंत कदम, माधव गांधी, अरुण जाधव, कुणाल शिरसाटे, डॉ. सचिन पाटील, सुरेश सपकाळ, आदिती भालेराव, राहुल माने, अशोक सागर या कार्यकर्त्यांनी या मदत कार्यात सहभाग घेतला.