प्रा. प्रविण देशमुख - 9820498560
देशभरात सध्या उसळलेला जाती-धर्माचा उन्माद व जनसामान्यांच्या जगण्याच्या प्रश्नांसंबंधीचे असंतोषाचे वातावरण या पार्श्वभूमीवर देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन पार पडला. ज्या भारतीय संविधानाने नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या संविधानाला जपण्यासाठी व त्याचे महत्त्व जनसामान्यापर्यंत पोेचवण्यासाठी अनेक पुरोगामी संघटना, संस्था आवर्जून संविधानाचा प्रचार आणि प्रसारासाठी देशभरात जाणीवपूर्वक कार्यक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 26 जानेवारी 2021 च्या पूर्वसंध्येला ठाकूर्ली येथील साईनारायण हॉलमध्ये ‘संविधान महोत्सवा’चे आयोजन केले होते. संविधानाचे महत्त्व समजावून सांगणे, त्याचबरोबर त्याच्या असण्याचा आनंद जल्लोषात सादर करणे, हा मुख्य कार्यक्रमाचा भाग होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान आणि सामाजिक चळवळ या विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ‘आंदोलन’चे संपादक डॉ. संजय मंगला गोपाळ यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानात अगदी घरातल्या छोट्या-छोट्या निर्णयांपासूनच संविधानाच्या मूल्यांची जोपासना कशी केली पाहीजे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, कामगार, शैक्षणिक; याचबरोबर पुरोगामी विचारांच्या चळवळीमध्ये सुद्धा काम करताना सर्वांच्या मतांचा आदर करून, सर्वांना सोबत घेऊन एकत्र काम करणे; त्याचबरोबर चुकीच्या गोष्टींना विरोध करणे, अन्यायाविरुद्ध कितीही दडपशाही झाली तरी आवाज उठवणे, म्हणजेच माणसाच्या संवैधानिक मूल्यांची जोपासना, संविधानाची जपणूक करणे होय, हे विचार त्यांनी आपल्या भाषणात ठळकपणे मांडले.
त्यांच्या भाषणानंतर सामाजिक चळवळीत आयुष्य वेचलेल्या अरुण रणदिवे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र जानेवारीच्या अंकाचे प्रकाशन सुद्धा डॉ. संजय मंगो, ‘अंनिस’ वार्तापत्र संपादक मंडळाच्या सदस्या मुक्ता दाभोलकर, वार्तापत्र व्यवस्थापक राहुल थोरात, ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदनाताई शिंदे, प्रा. प्रवीण देशमुख, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे नवनियुक्त ट्रस्टी गणेश चिंचोले यांच्या हस्ते करण्यात आले.
कुठल्याही चळवळीचे विचार समाजापर्यंत पोेचविण्याचे काम चळवळीचे मुखपत्र प्रभावीपणे करत असते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या वार्तापत्राचा 2021 या वर्षातला पहिला शतकवीर होण्याचा मान मिळवणारे प्रा. प्रवीण देशमुख यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
“गणेश चिंचोले म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लाभलेली लॉटरी होय,” हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विधान सत्य ठरविणारे व आयुष्यभर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला श्रम, वेळ आणि पैसा भरभरून देणारे गणेश चिंचोले यांची नुकतीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रच्या ट्रस्टी पदावर नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात ‘सामान्य कार्यकर्ता ते ट्रस्टी’पर्यंत झालेला त्यांच्या आयुष्याचा प्रवास एका चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला.
त्यानंतर त्यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. हा आनंद गणेश चिंचोले परिवाराने ‘गोकुळाचा रंग’ हा संगीताचा कार्यक्रम सादर करून साजरा केला व उपस्थितांची मने जिंकली. ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे संस्थापक व संगीताचे जाणकार राज आसरोंडकर यांनी फिल्मी गीतंसुद्धा सामाजिक आशय कशाप्रकारे देऊ शकतात, याची झलक उपस्थितांना दाखविली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन एका चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. त्याचबरोबर ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्या शुभेच्छासुद्धा चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्या. त्यानंतर ‘अंनिस’ परिवारातील साथींचा ‘संविधान जल्लोष’ हा कार्यक्रम झाला.
यामध्ये अनेकांनी कविता, गझल, गाणी सादर करून, तर काहींनी अनुभव मांडले. यामध्ये सहभागी होणार्यांची संख्या एवढी होती की, त्यांना सामावून घेताना निवेदकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.
कार्यक्रमाच्या शेवटी आकाश पवार, ऐश्वर्या पवार व राजू कोळी, अण्णा कडलासकर यांच्या साथीदारांनी सादर केलेला संविधानाचं महत्त्व अधोरेखित करणारा ‘शाहिरी जलसा’ या कार्यक्रमाला एका उंचीवर घेऊन गेला.
राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली विनायक, जगदीश सदाशिव यांनी लीलया पार पाडले.
चिंचोले परिवारातर्फे आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर तब्बल साडेचार तास रंगलेला संविधान जल्लोषाचा हा सोहळा मनात साठवून सर्व साथी तृप्त मनाने मार्गस्थ झाले.
या कार्यक्रमाला राजकीय कामगार व सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते पुणे, सांगली, सातारा, पनवेल, नाशिक, ठाणे, मालाड, घाटकोपर, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मोहने अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून कार्यकर्ते सहभागी झाल्याने हा राज्यव्यापी संविधान जल्लोष ठरला…!
या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादिका मुक्ता दाभोलकर, व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात, ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, पुणे येथील डॉ अरुण बुरांडे, श्रीराम नलावडे, डॉ. नितीन अण्णा, मोहना शाखेचे डी. जे. वाघमारे, बी. एच. गायकवाड, के. पी. गायकवाड, पालघरहून अण्णा कडलासकर, अरुण रणदिवे (इगतपुरी), देवानंद शिरसाट (नाशिक), ज्येष्ठ पत्रकार बापू राऊत, ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे राज आसरोंडकर, नितीन शेठ, डॉ. नितीन जोशी, ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि पहिल्या महिला संबळवादक सुलभा सावंत, ‘अंनिस’ कायदा विभागाच्या पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्या अॅड. तृप्ती पाटील, ‘शिक्षक भारती’च्या मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे, अंबरनाथ शाखेचे किसन वराडे सर, अरुण तायडे, बबन सोनवणे, अशोक वानखडे, राष्ट्र सेवादलाचे अविनाश रत्नपारखी, कल्याण शाखेच्या अनिता सरदार, सचिन शिर्के, ठाणे शाखेच्या अक्षता पाटील, घाटकोपर शाखेच्या निर्मला माने, मालाडच्या सुनीता देवलवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
-प्रा. प्रवीण देशमुख, डोंबिवली
संपर्क – 98204 98560