कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव व रोजगाराची उपलब्धता

प्रभाकर नानावटी -

तंत्रज्ञानाचा विकास

२१ व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (Aartificial Intelligence AI) सर्वात जास्त उत्सुकता दाखविली जात आहे. सर्व प्रकारच्या माध्यमामध्ये याची चर्चा होत असल्यामुळे हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, त्याचे परिणाम (व दुष्परिणाम) काय आहेत व विशेष करुन त्याचा रोजगारावर नेमका काय परिणाम होणार आहे हा एक जगभर चर्चिला जाणारा विषय ठरत आहे.

माणसांनी आपल्यातील बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फ्रीज, फॅन, मायक्रोवेव्ह, इ. आपल्या दैनंदिन सोयी-सुविधांमध्ये; रेडिओ, चित्रपट, टीव्ही, वॉकमन, व्हीसीआर इ. ऐषारामी जीवनाला पूरक अशा मनोरंजन साधनामध्ये; टेलीफोन, स्मार्टफोन इ. संवाद साधण्यासाठींच्या यंत्रणेमध्ये; ट्रॅक्टर, नांगरणी, पेरणी इत्यादीसाठी शेतकी अवजारामध्ये; शेतीपूरक बी-बियाणे, खत, कीटकनाशके इ. या मूलभूत गोष्टी कृषीक्षेत्रामध्ये; एक्स रे मशीन्स, डायलॅसिस यंत्रणा, एम आर आय यंत्रणा, रोग प्रतिबंधक औषध, लशीकरण, इ. आरोग्य क्षेत्रामध्ये; कार्स, रेल्वे, विमान, जहाज, स्कूटर्स, बाइक इ. जलद वाहतुकीच्या साधनांमध्ये; एनसी मशीन्स, सीएनसी मशीन्स, आटोमेशन इ. उत्पादनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. तंत्रज्ञानाची ही घोडदौड अशीच वाढत जाणारी आहे व त्यामुळे काळाच्या चक्राला उलटे फिरविणे अशक्यातली गोष्ट ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे हे उमगूनसुद्धा तो नाश रोखण्यासाठी पुन्हा एकदा आपण तंत्रज्ञानालाच शरण जात आहोत, अशी आजची परिस्थिती आहे.

यंत्रमानव

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात अकुशल कामासाठी यंत्रमानव तंत्रज्ञानाचा (रोबोटिक्स) विकसित देशामध्ये उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होत गेला. त्या देशातील लोकसंख्या मुळातच कमी असल्यामुळे यंत्रमानवाच्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळाले. यंत्रमानवाविषयीचे तंत्रज्ञान पूर्णपणे मानवाच्या शारीरिक क्षमतेस पर्यायी व्यवस्था म्हणून विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक बिनडोक, स्वतंत्र निर्णय न घेणारा पण पूर्ण आज्ञाधारक, तंतोतंत, बिनचूक काम करणारा व मानवापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या यंत्रमानवाची रचना करून मानवाचे शारीरिक श्रम व वेळ वाचवण्यास मदत होत आहे. अभियांत्रिकी व प्रगत विज्ञान ह्यांमधील अतिविकसित तंत्रज्ञानाची फलश्रुती म्हणजे यंत्रमानव. वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी, कामाच्या स्वरूपानुसार प्रत्येक यंत्रमानवाची रचना करावी लागते. त्यामुळे यंत्रमानवाच्या क्षमतेवर व त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास मर्यादा पडतात.

वेगवेगळ्या प्रकारची कामे हाताळणार्‍या बुद्धिमान यंत्रमानवासाठी कार्यप्रणालीची रचना करताना प्रत्येक क्षेत्रासाठी असलेल्या सर्व नियमांचा समावेश करावा लागतो. त्यापासून कुणालाही इजा होता कामा नये व कुठलेही मोडतोड वा नुकसान होता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. आपल्या नित्य जीवनातील साध्या वाटणार्‍या व्यवहारज्ञानाच्या कित्येक गोष्टींमध्ये नियमांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. शिवाय जगाचे व्यवहार अशा प्रकारे ठराविक नैसर्गिक नियम व किंवा नीतिनियमाने बंधित करणे फार अवघड असते. कारण गतिमान असलेल्या ह्या जगामध्ये आजचे नियम उद्याच्या जगासाठी लागू होतीलच ह्याची शाश्वती नसते. त्यामुळे कार्यप्रणालीत समावेश केलेल्या चौकटीवर मर्यादा येतात व बुद्धिमत्ता अकार्यक्षम ठरण्याची शक्यता असते.

कार्यप्रणालीला जेव्हा एखादी नवीन माहिती मिळेल तेव्हा ती माहिती व स्वत:जवळील ठोकताळ्यांच्या आधारावरून सुसंगत विचारप्रक्रिया कार्यप्रणाली करून दाखवता येईल असे वैज्ञानिकांना वाटते. अशाप्रकारे ही कार्यप्रणाली नवीन माहितीचे संकलन व पृथक्करण करत स्वतःची क्षमता मानवाच्या मेंदूसारखे काम करण्यापर्यंत वाढवू शकेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता

यंत्रमानवातील उणीवा हेरून माणसासाऱखे त्यांच्यातही थोड्याफार प्रमाणात बुद्धिमत्ता असलेला यंत्रमानव हा या तंत्रज्ञानातील पुढचा टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात आजचे तंत्रज्ञ आहेत. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात शोधलेल्या इंटरनेट, आय सी (Integrated Circuit) चिप्स, वेगवेगळे अ‍ॅप्स, सेन्सर्स, क्लाउड सर्वर्स इत्यादी तंत्रज्ञानामुळे व त्यासाठी लागणार्‍या कार्यप्रणालीमुळे हे शक्य होत आहे, असे या तंत्रज्ञांना वाटत आहे. त्याचे प्रयोग होत असून काही प्राथमिक स्वरूपातील बुद्धिमान यंत्रमानवांची चाचणी घेतली जात आहे.

यासाठी मुळात पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करावा लागेल. काही प्रमाणातील प्राथमिक स्वरूपातील बुद्धिमत्ता स्मार्ट फोन, टीव्ही, इंटरनेटची जोडणी असलेले संगणक इत्यादीसारख्या ठिकाणी केली जात आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच. एखादी जाहिरात वा माहिती शोधल्यास तशाच प्रकारच्या इतर जाहिराती वा पूरक माहिती स्क्रीनवर दिसू लागतात. ही एका प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असते. यासाठी कुठलाही माणूस तेथे नेमलेला नसतो. आधार कार्ड व पॅन कार्ड यांचे लिंकिंग, अमेझॉन वा फ्लिपकार्टवरील विक्री व्यवहार, गूगलपे, फोनपे, पेटियम, रुपीपेसारखे साधे आर्थिक व्यवहार अशा प्रकारची बिनडोक कामे कार्यप्रणालीवरून सहज करता येऊ शकतात व मोठ्या प्रमाणात मानवी तास वाचू शकतात.

स्मार्ट फोनवरील गेम्ससुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे. फोनवरील मदतनीस ‘अलेक्सा’सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचेच फलित आहे. संगणकांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सरकारी व खासगी कागदपत्रे व आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु हे तंत्रज्ञान अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे आहे असे तंत्रज्ञांना वाटते. एकाच प्रकारची पण बुद्धिकौशल्याची कामे ही कृत्रिम बुद्धिमत्ता हाताळेल. पण निर्दिष्ट केलेल्या चौकटीबाहेर जाऊन ते काम करू शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानात कार्यप्रणालीची रचना करताना विशिष्ट क्षेत्र, क्षेत्रासाठी आखून घेतलेली चौकट व क्षेत्रास लागू पडणारे सर्व नियम व नियमांची अचूक व्याख्या ह्यांना फार महत्त्व आहे.

या प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये मूलभूत नियमांच्या काही ठोकताळ्यांचा अतंर्भाव केला आहे. (ह्या ठोकताळ्यांची संख्याच जवळ जवळ १० लाखांपेक्षा जास्त आहे!) कार्यप्रणालीला जेव्हा एखादी नवीन माहिती मिळेल – अशी माहिती इंटरनेटसारख्या सुविधांमधून आजकाल सहज उपलब्ध होत आहे – तेव्हा ती माहिती व स्वत:जवळील ठोकताळ्यांच्या आधारे संगणकीय कार्यप्रणाली सुसंगत विचारप्रक्रिया करून दाखवेल, असे वैज्ञानिकांना वाटते. अशाप्रकारे ही कार्यप्रणाली नवीन माहितीचे संकलन व पृथक्करण करत स्वतःची क्षमता मानवाच्या मेंदूसारखे काम करण्यापर्यंत वाढवू शकेल. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला यंत्रमानव — बुद्धिमान यंत्रमानव – हा या तंत्रज्ञानाचे अंतिम ध्येय असेल. यात यंत्रमानवाचा तथाकथित मेंदू उपलब्ध माहितीवरून शिकत राहील व परिस्थितीनुसार बदल घडवत निर्णय घेत पुढील कामं करत राहील. गंमत अशी आहे की हे सर्व पूर्ण होईपर्यंत माणूस थांबणार नाही. त्यामुळे हळू हळू जसजसे तंत्रज्ञान उपलब्ध होत राहील तसतसे या गोष्टी बाजारात येतील व त्यांचा प्रत्यक्ष परिणाम रोजगारावर होऊ शकेल असे काही समाजशास्त्रज्ञांना वाटत आहे.

बुद्धिमान यंत्रमानव

काही वैज्ञानिकांनासुद्धा हा बुद्धिमान यंत्रमानव स्वप्नवतच असेल असे वाटत आले आहे. बुद्धिमान यंत्रमानवासाठी उद्देश (purpose) व प्रेरणा (motivation) या जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून घेता येईल. तहान लागल्यावर पाण्यासाठी, भूक लागल्यावर अन्नासाठी धडपडणे अशा अवस्थांचे सदृशीकरण (simulation) केल्याशिवाय बुद्धिमान यंत्रमानव स्वयंप्रेरित वर्तन करू शकणार नाही. तहान, भूक या सारख्या संवेदनांची जाणीव नसल्यामुळे संबंधित संप्रेरके उत्तेजित होणार नाहीत. अशा उत्तेजनाशिवाय शारीरिक वर्तनाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल.

कुठल्याही प्राण्याचे वर्तन बाह्य परिस्थितीच्या उत्तेजनाचे फलित असते. इंद्रियाद्वारे ज्ञान व त्यानुसार वर्तन या गोष्टी एकाच वेळी घडत असतात. बुद्धिमान यंत्रमानवामध्येसुद्धा बाह्य परिस्थितीची जाणीव व त्याप्रमाणे वर्तन करण्यास उद्युक्त करणारी यंत्रणा असावी लागते. बाह्य जगाचे पूर्ण ज्ञान व त्यानुसार वर्तन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये हवी.

आजच्या यंत्रमानव-तंत्रज्ञानामध्ये एका कामासाठी अनेक यंत्रमानवांचा उपयोग करून सामूहिक प्रयत्नाने काम करण्यास वाव नाही. बुद्धिमान यंत्रमानवामध्ये अशा प्रकारची क्षमता निर्माण करण्यासाठी माहितीच्या देवाणघेवाणीसाठी संभाषण व संभाषणासाठी भाषाज्ञानाची आवश्यकता आहे. संभाषण साधण्यासाठी काही तरी उद्देश असावा लागतो. संवेदना हे काम करू शकेल. पण प्रणयचेष्ठा, गोंधळलेली मनःस्थिती, लाजणे ह्यासारख्या संवेदनांचे सदृशीकरण करणे सोपे नाही व अशा प्रकारच्या संवेदनांची जाणीव असल्याशिवाय बुद्धिमान यंत्रमानव परिपूर्ण असणार नाही.

परंतु माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व यशामुळे बुद्धिमान यंत्रमानव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याचे दिवस लांब नाहीत, असे भविष्यवेत्त्यांना वाटत आहे. जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींना आश्चर्याचा धक्का देणार्‍या, कार्यप्रणालीच्या मदतीविना स्वतःहून संवाद साधणार्‍या चॅटजीपीटीसारख्या (Chat GPT) स्वयंशिक्षित भाषायंत्रांचा विकास कृत्रिम बुद्धिमत्तेचे पुढचे पाऊल असे समजले जात आहे. कदाचित पुढील एक-दोन दशकात बुद्धिमान यंत्रमानव मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास पुढील कालखंडाला चौथ्या औद्योगिक क्रांतीचा कालखंड असे समजले जाईल.

तंत्रज्ञानावर मात

अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर मात करत माणूस गेली कित्येक वर्षे रोजगार कमवत आहे. उदाहरणार्थ, बैलगाडी गेल्यावर घोडागाडी, घोडागाडी गेल्यावर रिक्षा, स्कूटर, बाईक कार्स/टॅक्सी (व आता उबेर/ओला), नांगर गेल्यावर ट्रॅक्टर, रेडिओ नंतर टीव्ही, जुन्या लँडलाईनचा काळ संपल्यावर मोबाईलची विक्री व दुरुस्ती असा हा रोजगाराचा प्रवास आहे. त्यामुळे बुद्धिमान यंत्रमानवात घाबरण्यासारखे काही नाही. योग्य प्रकारचे प्रशिक्षण व त्याच्या हिताचे रक्षण करणारे कायदे कानून असल्यास या स्वयंचलित व उच्च तंत्रज्ञानाचा बाऊ करण्यात अर्थ नाही. काहींना मात्र माणसाची जागा संगणकीय कार्यप्रणाली (अल्गॉरिदम) व स्यंयचलित यंत्रे घेतील असे वाटत आहे. एक मात्र खरे की येऊ घातलेल्या बुद्धिमान यंत्रमानव असलेल्या पुढील कालखंडात औद्योगिक व्यवस्थापनामध्ये बुद्धिमान यंत्रमानवामुळे आरोग्य व्यवस्था, शिक्षण, शेती, मिलिटरी यासारख्या क्षेत्रात फार मोठा बदल होणार आहे हे मात्र नक्की.

अनेकांना हे तंत्रज्ञान रोजगारावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकेल असे वाटत आहे. परंतु काही तज्ञ मात्र यापूर्वीच्या तंत्रज्ञानाच्या इतिहासाचे दाखले देत कुठलेही तंत्रज्ञान काही रोजगारांना कमी करतात व काही नवीन रोजगारांना जन्म देतात यावर भर देत आहेत. व हे या अगोदरही घडले आहेत व यानंतरही घडणार आहे. त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असे त्यांचे म्हणणे आहे.

आरोग्य क्षेत्र

एक्स रे वा एम आर आय चे स्कॅनिंग करून कर्करोगासारख्या रोगांच्या अचूक निदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. स्मार्ट फोन वापरून मेंदूतील विकारांच्या निदानासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही कार्यप्रणाली वापरून रोगग्रस्तांचा ठावठिकाणा, त्यांचे वैद्यकीय पूर्वेतिहास, विकारांची नोंद अशा गोष्टीसाठीसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. ठराविक प्रश्नोत्तरातून माहिती मिळविण्याचे कामसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता बिनचूक करू शकते यावर डॉक्टरांचा विश्वास आहे.

रुग्णाने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यानंतर संगणकातील कार्यप्रणालीत प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात सर्व माहिती घेऊन ती डॉक्टरांना व सर्जनना पोहोचवल्यास ती माहिती योग्य निर्णय घेण्यास फार उपयोगी पडते व डॉक्टरांचा बहुमूल्य वेळ वाचतो. त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक वरदान ठरत आहे. काही ठिकाणी अतिशय क्लिष्ट अशा ऑपरेशनच्या वेळी यंत्रमानवाची मदतही घेतली जाते. परंतु ही मदत डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून बुद्धिमान यंत्रमानवाच्या हातात स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरी दिल्याचे ऐकीवात नाही.

एक मात्र खरे की कुठलाही संवेदनशील रुग्ण आपणहून बुद्धिमान यंत्रमानवाच्या हाती आपला जीव धोक्यात घालून उपचार करून घेणार नाही. त्यामुळे डॉक्टर्स, सर्जन्स, नर्सेस, वैद्यकीय यंत्रणा वापरणारे कर्मचारी, रुग्णांची शुश्रूषा करणारे कर्मचारी इत्यादींची हकालपट्टी करून यंत्रमानवाच्या हातात वैद्यकीय व्यवस्थापन देणे कदापि शक्य होणार नाही. त्यामुळे या रोजगारांना पर्याय नाही. वस्तूंची जाहिरात करणार्‍या विक्री प्रतिनिधीची जागा बुद्धिमान यंत्रमानव घेऊ शकेल, मात्र वैद्यकीय उपचारासंबंधीच्या कुठल्याही कर्मचार्‍यांची कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हकालपट्टी होणार नाही, हे मात्र निश्चित. कारण रुग्ण (व त्याची काळजी घेणारे नातेवाईक) समोर काय चालले आहे हे प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाहीत. कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ-मोठ्या हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन, नियोजन, निर्णय प्रक्रिया, इत्यादीसाठी होऊ शकेल. परंतु वैद्यकीय उपचाराच्या गाभ्याशी संबंधित असलेल्या गोष्टींना कृत्रिम बुद्धिमत्ता हात लावू शकणार नाही.

शैक्षणिक क्षेत्र

कोविडच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन शिक्षण घेण्यावर बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी भर दिला होता. मुळात तो एक आपत्कालीन उपाय होता. शिक्षकांना व विद्यार्थ्यांनासुद्धा यात पूर्ण समाधान नव्हते. खरे पाहता शाळा-कॉलेजमध्ये विषय समजून घेण्यासाठी काही मर्यादित प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यापूर्वीही करण्यात येत होता. आपण शिकविलेला पाठ विद्यार्थ्यांना समजला आहे की नाही हे त्यांच्या देहबोलीवरून, त्यांनी विचारलेल्या प्रश्नावरून व उपस्थित केलेल्या शंकामधून शिकविणार्‍यांना कळत असते. नेमका त्याचाच अभाव ऑनलाईन क्लासेसमध्ये असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणासाठीचा वापर विपरीत परिणाम घडवू शकतो असे काही शिक्षणतज्ञांचे मत आहे.

शिक्षणतज्ञांच्या मते बुद्धिमान यंत्रमानवसुद्धा हाडाच्या शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. कारण समोर असलेल्या विद्यार्थ्याचा कल बघून शिक्षक शिकविण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करू शकतो. कदाचित कितीही प्रयत्न केले तरी यंत्रमानवाला हे जमेल की नाही याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

फार फार तर शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी कनिष्ठ आर्थिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी बुद्धिमान यंत्रमानव शिकवेल. परतुं उच्च वर्गातील पालक मात्र आपल्या पाल्यांसाठी मानवी परस्पर संवादासाठी योग्य शिक्षकांनाच पसंत करतील. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील केंद्रबिंदू असलेल्या शिक्षकाला मरण नाही. प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, हजेरी घेणे, स्कूल-कॉलेजचे व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे शिक्षणव्यवस्थेतील शिक्षणबाह्य कामे यंत्रमानवांवर सोपविले जातील. परंतु प्रत्यक्ष शिक्षणासाठी शिक्षक/शिक्षिका हव्याच. त्यातही एका शिक्षकामागे कमीत कमी विद्यार्थ्यांची संख्या असल्यास आणखी उत्तम.

सेवाक्षेत्र

कॉल सेंटर्स : जागतिकीकरणानंतर ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कॉल सेंटर्सची (मदत केंद्र) उभारणी करण्यात आली. या सर्व कॉल सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणात काही तुरळक प्रशिक्षणानंतर कामगारांची भरती करण्यात येते. आपल्या देशातील या सेवाकेंद्राबद्दल न बोललेले बरे अशी अवस्था आहे. परंतु इतर देशातील या सेवा केंद्रात वा इतर देशासाठी काम करणार्‍या आपल्या देशातील सेवा केंद्रात काम करणार्‍यांना फोनवरून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी असते. मुळात फोन करणारे वैतागलेले असतात. कदाचित भावनेच्या भरात अद्वा तद्वा बोलणारे असतात. त्यामुळे समोर न दिसणार्‍या व्यक्तीच्या संभाषणामधून त्याची/तिची मनस्थिती ओळखून डोके शांत ठेऊन तक्रार निवारण करण्याची कसरत त्यांना करावी लागते. जर त्यात थोडीशी चूक झाली तरी नोकरीवर गदा येण्याची शक्यता असते. काम करणार्‍यांच्या प्रत्येक हालचालीवर व वापरलेल्या प्रत्येक शब्दावर निगा ठेवली जाते. अशा केंद्रावर बुद्धिमान यंत्रमानवाला काम करण्यास सांगितल्यास समोरच्या न दिसणार्‍या व्यक्तिच्या केवळ संभाषणावरून त्याची भावनिक मनस्थिती ओळखणे यंत्रमानवाला न पेलणारे ठरू शकेल. कदाचित या क्षेत्रातील रोजगारावरही हे तंत्रज्ञान निरुपयोगी ठरू शकेल.

इतर प्रकारच्या सेवा : पर्यटन, विक्री वा हॉटेल इत्यादी सेवा पुरविणार्‍या व्यवसायामध्येसुद्धा यंत्रमानवांचा उपयोग करून घेणे शक्य होणार नाही. कारण यातही मानवी इंटरफेसला जास्त महत्व असते. ग्राहकाला पटवावे लागते, चांगली सेवा देण्याची हमी द्यावी लागते. नाराज ग्राहक आणखी चार ग्राहकांना नाउमेद करू शकतो, ग्राहक कोर्टात केस टाकल्यास कंपनीची बदनामी होऊ शकते. या सर्व शक्यता लक्षात ठेऊन ग्राहकांशी वर्तन करावे लागते. यंत्रमानव कितीही बुद्धिमान असला तरी या गोष्टी त्याला जमू शकतील याबद्दल तज्ञांच्या मनात प्रचंड शंका आहेत.

त्यामुळे या क्षेत्रातील रोजगारही कमी होण्याची शक्यता फारच कमी असेल.

कृषीक्षेत्र

शेतकी क्षेत्रातील अनेक घटकांना आटोमेशन करणे शक्य होणार नाही. आजचा शेतकरी हवामान अंदाज, टोळधाड, वा पिकावरील रोगासाठी करावे लागणारे उपाय इत्यादीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतच आहे. त्यामुळे यंत्रमानवाचा वा बुद्धिमान यंत्रमानवाचा वापर या क्षेत्रासाठी करुन शेती पद्धतीत बदल करणे जवळ जवळ अशक्य गोष्ट आहे.

चॅटजीपीटी वापरून विद्यार्थ्यापेक्षा अतिशय सुंदर मुद्देसूद निबंध लिहिता येईल. एखादी कविता लिहिता येईल. परंतु शेतातील अगदी प्राथमिक स्वरूपाची कामे होऊ घातलेल्या यंत्रमानवाकडून करून घेण्यासाठी फार मोठ्या स्वरूपात तंत्रज्ञीन विकसित करावे लागेल. काम करण्यातील लवचिकपणा, अचानकपणे उद्भवणारी कामे, जागेची अडचण यावर मात करणारे यंत्रमानव तंत्रज्ञान व त्यासाठी द्यावी लागणारी किंमत यामुळे शेतकरी कधीच या भानगडीत पडणार नाही.

कृषीक्षेत्र नेहमीच कालानुसार नवीन तंत्रज्ञान वापरत विकसित झालेले क्षेत्र आहे. त्यामुळे कृषीउत्पादनाला ग्राहकापर्यंत पोचवण्यासाठी त्याचे पॅकेजिंग, वाहतूक व्यवस्था, बाजाराच्या ठिकाणी त्याची मांडणी इत्यादीसाठी कदाचित यंत्रमानवाचा उपयोग करून घेता येईल. यामुळे कदाचित काही प्रमाणात रोजगार कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिलिटरी क्षेत्र

आपल्याला आवडो न आवडो, प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे २० टक्के खर्च करून हजारो — लाखो सैनिकांना पोसत असतो, दारू-गोळा युद्ध सामग्रींची जमवाजमव वा उत्पादन करत असते. युद्धाच्या खुमखुमीने पछाडलेले राष्ट्र शेजारच्या राष्ट्राशी सीमावाद उकरून वा अन्य कुठले तरी कारण पुढे करून आक्रमण करतात व आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत असतात. कदाचित संरक्षण क्षेत्र सामाजिक- आर्थिक (Socio – Economic) क्षेत्र म्हणून ओळखले जात असावे व त्यातून रोजगार निर्मिती होत असावी.

काही तज्ञांच्या मते मिलिटरीतील गुंतवणुकीतील फार मोठा हिस्सा अद्यावत तंत्रज्ञानावर खर्च केला जात आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोण या क्षेत्रातही आलेले असल्यास नवल नाही. स्वयंचलित ड्रोन्स, रणगाडे, पाणबुडी, लढाऊ विमानं इत्यादीमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रवेश झालेला असला तरी कल्पनेपेक्षा तो फारच कमी आहे.

परंतु भविष्यकाळात हे बदलणार आहे. समुद्र वा हवेतील युद्धात योद्ध्यांची वाचण्याची शक्यता फारच कमी असल्यामुळे चालक नसलेले स्वयंचलित लढाऊ विमानं वापरण्यावर भर देत आहेत. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या क्षेत्रात अनिवार्य ठरत आहे. लढाऊ विमानात फायटर पायलटची गरज नसल्यास विमान जास्त हलके, जास्त वेगवान, जास्त दारू-गोळा घेऊन जाणारे, जास्त लवचिक व कमी खर्चिक होऊ शकतील.

काही तज्ञांच्या मते यानंतरच्या युद्ध प्रसंगात सेनाधिकारी युद्धाची पुढील दिशा न ठरवता बुद्धिमान यंत्रमानव ठरवेल. उपलब्ध माहिती व शत्रूंचे जास्तीत जास्त नुकसान करून मोहिम जिंकण्यासाठी लागणार्‍या रणनीतीची आखणी माणसापेक्षा यंत्रमानव जास्त कुशलतेने करू शकेल. या निर्णय प्रक्रियेमध्ये अत्यल्प प्रमाणात सेनापतींचा सहभागही असेल. परंतु जिवावर उदार होऊन लढण्यास सज्ज असलेला रणभूमिवरील सैनिक अशा यंत्रमानवाचे ऑर्डर्स स्वीकारतील का हा एक अनुत्तरित प्रश्न राहणार आहे. मुळात सैनिक हा काही रोबोसारखा संवेदनाविहीन नसणार. त्याच्या शौर्य-धैर्याबरोबरच दया, करुणा ही गुणवैशिष्ट्येही त्याच्यात असणार. यंत्रमानव रक्त-मांस-हाडे असलेल्या मानवी सैनिकांची जागा घेऊ शकणार नाही. त्यामुळे भविष्यकाळात सैन्यावरील खर्च वाढतही जाईल व सैन्यकपातीच्या गोष्टी फक्त बोलल्या जातील, प्रत्यक्षात सैन्यकपात होणार नाही, हे मात्र निश्चित.

इतर क्षेत्रातील स्थिती

२००० नंतर वस्तु उत्पादन क्षेत्रात आटोमेशनची लाट आली. त्यामुळे जगभरातील सुमारे १७ लाख कामगार बेकार झाले. कदाचित तशीच परिस्थिती कृत्रिम बुद्धिमत्ताच्या तंत्रज्ञानामुळे होईल की काय अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. यावेळी कामगारांपेक्षा व्हाईट कॉलर्सच्या रोजगारावर कुर्‍हाड कोसळणार आहे, असा अंदाज केला जात आहे. परंतु ती भीती अनाठायी आहे असे अनेक तज्ञ सांगत आहेत. बेकार होणार्‍या व्हाईट कॉलर्स व इतर वर्कर्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सल्लागार, कॉम्प्युटर प्रोग्रामर्स, संशोधन विश्लेषक, कायदे तज्ञांचे मदतनीस, शेअर बाजाराचे सल्लागार, ग्राफिक डिझायनर्स, पटकथा लेखक, चित्रपट व्यवसायातील दुय्यम कर्मचारी वर्ग, अनुवादक इत्यादी असण्याची शक्यता आहे. सामाजिक व स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्ते, कायदे तज्ञ, थेरापिस्ट, घरेलू कामगार, बांधकाम व्यवसायातील कामगार वर्ग, मानवी संसाधनाशी निगडित कर्मचारी वर्ग, सर्जनशील लेखक, कलाकार इत्यादींच्यावर या होऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम होणार नाही.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार या तंत्रज्ञानामुळे साडे आठ कोटी जण बेकार होतील असा अंदाज केला आहे. परंतु त्याच वेळी सुमारे १० कोटी नवीन रोजगार या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होतील, असेही त्यात म्हटले आहे. हेही नसे थोडके!

लेखक संपर्क : ९५०३३३४८९५


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]