राजीव देशपांडे -

‘तुम्ही कुठल्याही दिशेला वळा, जात हा असा महाकाय राक्षस आहे की तो तुमच्या मार्गात आडवा येणारच. या राक्षसाचा खात्मा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा करता येऊ शकणार नाही, आर्थिक सुधारणा करता येऊ शकणार नाही…’
–डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१९३६ साली लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रकृती बरी नसतानाही आमंत्रण स्वीकारले. जातपात तोडक मंडळाच्या या निमंत्रणामागील उद्देश जातिसंस्था ज्यावर उभी आहे त्या धार्मिक जाणिवांचा नाश केल्याशिवाय जाती निर्मूलन शक्य नाही, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी समजून घेणे हा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानववंशशास्त्र, इतिहास, साहित्य, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शरीरशास्त्र, मानसशास्त्र, संस्कृती, भाषा अशा सर्वांगीण अंगाने जातिव्यवस्थेचा धांडोळा घेत जातीची व भेदभावाची मानसिकता घडविणार्या विषमतेचा पुरस्कार करणार्या धार्मिक ग्रंथांना नकार हाच खरा जाती नष्ट करण्याचा मार्ग आहे, हे आपल्या भाषणात मांडले. पण वेद हे अपौरुषेय व पवित्र मानणार्या आर्यसमाजी जातपात तोडक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील हिंदू धर्माचा त्याग, हिंदूंच्या पवित्र ग्रंथाच्या नैतिकतेबाबतची शंका हे भाग वगळावे, अशी सूचना केली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे जातपात तोडक मंडळाने ते भाषणच रद्द केले, जे Annihilation of Caste (जातिव्यवस्थेचे निर्मूलन) या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसिद्ध केले. हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर त्यावर महात्मा गांधी यांच्यासकट अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातव्यवस्थेच्या केलेल्या सडेतोड चिकित्सेमुळे जातिअंताचा मुद्दा सामाजिक सुधारणांच्या केंद्रस्थानी आला. सहभोजने, मंदिरप्रवेशाचे लढे, आंतरजातीय लग्ने या उपायांच्या मर्यादा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जरी दाखवून दिल्या, तरी त्यामुळे जातीव्यवस्थेला किंचितसे धके बसतीलच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत दलित जनतेच्या प्रगतीसाठी केलेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनात्मक तरतुदी जातिअंताच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल होते. तसेच स्वातंत्र्याच्या गेल्या ७५ वर्षांत डाव्या विवेकवादी आणि पुरोगामी संघटनांनी हे संवैधानिक अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी लढवले गेलेल्या सामाजिक, आर्थिक लढ्यांनीही जातजाणिवेची धार कमी केलेली आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर राबविल्या गेलेल्या आर्थिक धोरणातून उद्भवलेल्या इतर मागासवर्गीय जातीतील दारुण आर्थिक परिस्थितीचे प्रतिबिंब मंडल आयोगाच्या अहवालातून उमटले व केवळ राजकीय लाभासाठी मंडल आयोगाची केली गेलेली अंमलबजावणी व त्या अंमलबजावणीला राजकीय लाभासाठीच केला गेलेला विरोध यामुळे प्रत्यक्षात पदरात काहीच न पडता जातीय अस्मितांना मात्र उधाण आले. त्यातच नवउदारवादी कॉर्पोरेट भांडवली आर्थिक धोरणांच्या आक्रमक अंमलबजावणीचा परिणाम पिढ्यान्पिढ्या एकच व्यवसाय करणार्या कोणतेच आधुनिक कौशल्य, शिक्षण नसणार्या जातीवर होत त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त होत आहेत. त्यांच्यात असुरक्षितता आणि अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला, जो आज जातअस्मितेच्या राजकारणाला पोषक ठरत आहे. हजारो वर्षे मागास असलेल्या जातीत स्वत:बद्दलची जाणीव निर्माण होणे ही सकारात्मकच गोष्ट आहे. सुधारणेसाठी ऊर्जा देणारीही आहे. पण संधिसाधू राजकारणी त्या अस्मितेचा वापर केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात तेव्हा त्याचा जनतेला काहीच फायदा होत नाही आणि हेच आजच्या परिस्थितीत घडत आहे.
आज या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत हिंदुत्ववादी संघ-भाजपच्या सत्तेच्या पंखाखालील सनातनी व बाजारू शती या जातजाणिवेच्या अस्मितेला अंधश्रद्ध, अन्यायी, भ्रामक रूढी, परंपरा, अवैज्ञानिक चालीरीती, जात पंचायत, भपकेबाज सणसमारंभ, ऐतिहासिक घटनांचे द्वेषपूर्ण उदात्तीकरण यात गुंतवून ठेवत जात अस्मितेला खतपाणी घालत आहेत. पण या रूढी, परंपरांच्या विरोधात जातीअंतर्गत विधायक आणि कृतिशील संघर्ष करत त्याला कालसुसंगत पर्याय देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारलेला समाज निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार्या व्यती, संघटनाही आहेत. त्यांचे हे संघर्ष अगदी छोटे जरी असले, तरी आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत जातिअंताच्या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्याच्या दृष्टीने त्याला महत्त्व आहेच. म्हणूनच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन विशेषांकाच्या निमित्ताने हे संघर्ष ‘अंनिवा’च्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
मुखपृष्ठकारा विषयी
या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन विशेष अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र मुंबईचे प्रसिद्ध तरुण चित्रकार विक्रांत भिसे यांचे आहे. त्यांचे चित्रकलेचे शिक्षण मुंबई येथील एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे झाले.
जातीप्रभुत्वामुळे जमीन, स्वातंत्र्य आणि श्रम यावर होणाऱ्या अन्यायी परिणामाविरोधाच्या संघर्षात अग्रभागी असणाऱ्या विक्रांत भिसे यांच्या चित्रकलेतून आंबेडकरी जाणिवेतच अंतर्भूत असलेल्या क्रांतिकारी जाणिवेची पुनरावृत्ती पाहावयास मिळते. त्यांच्या चित्रातून त्यांच्या सामाजिक न्यायाबद्दलच्या बांधिलकीच्या प्रखर भावना, आंदोलनातून निर्माण होणाऱ्या चिरस्थायी सुधारणांबद्दलचा ठाम विश्वास, जात, वर्ग आणि लिंग या आधारे होणाऱ्या अन्यायाविरोधाची गडद जाणीव व्यक्त होताना दिसते.
२०१८ मध्ये ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या विक्रांत भिसे यांची चित्रे नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, कोची, कैरो, लॉस एंजिलेस येथील चित्रप्रदर्शनात प्रदर्शीत झाली आहेत. -संपादक मंडळ