अंनिवा -

विजयवाडा येथील नास्तिक परिषद
विवेकवादी, नास्तिकवादी आणि मानवतावादी विचारच समाजाचे भले करू शकतो, असे प्रतिपादन गॅरी मॅकलेलँडल यांनी नास्तिक केंद्र, विजयवाडा, आंध्र प्रदेशच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्ताने 11 व्या जागतिक नास्तिक परिषदेचे उद्घाटन करताना केले. या नास्तिक परिषदेचे आयोजन दि. 4, 5 जानेवारी 2020 दरम्यान केले गेेले होते.
परिषदेमध्ये अनेक ठराव मंजूर करण्यात आले. त्यातील ठळक पुढीलप्रमाणे-
1) नास्तिक, मानवतावादी, विवेकवादी, मुक्तचिंतक यांचे विचारांचा आदर करण्यात यावा. त्यांच्यावरील हिंसाचार आणि अनाठायी तुरुंगवास बंद व्हावा.
2) धर्म आणि जात यामुळे होणारे अन्याय, अत्याचार बंद व्हावेत.
3) विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आधारित शिक्षण मिळावे.
4) खर्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित करण्यात यावी.
5) बालक, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक यांचे हक्क सुरक्षित राहतील, याची खबरदारी घ्यावी.
6) जागतिक पर्यावरणाचा होणारा र्हास लक्षात घेऊन पर्यावरणपूरक विकासनीती अवलंबली जावी.
7) सर्वांचा जन्म माणूस म्हणून झाला असल्याने सर्वांना समान वागणूक मिळावी.
8) वैज्ञानिक दृष्टिकोन हा मूल्य विचारसरणीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे, त्याची जपणूक करावी.
9) देवाला न मानण्याचा अधिकार हा धर्म आणि जाती विरहित असावा.
10) विज्ञान आणि छद्मविज्ञान यांची सांगड घालू नये.
– प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, नाशिक
यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजयराव धाडसे यांचा 75 वा वाढदिवस पुस्तके वाटून साजरा
यवतमाळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजयराव धाडसे यांचा 75 वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने दिनांक 1 ऑक्टोबर 2019 ला यवतमाळ येथील अमृत गार्डनच्या भव्य सभागृहात अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ‘महाराष्ट्र अंनिस’ चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा, सरचिटणीस कॉ. तुकाराम भस्मे, वर्कर्स फेडरेशनचे माजी सचिव कॉ. पी. पी. घाडगे, ‘आयटक’ चे नेते कॉ. एस. ए. जाधव आणि वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय सदस्य कॉम्रेड व्ही. व्ही. ठाकरे उपस्थित होते.
“यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी, एवढेच नव्हे, तर विदर्भातील बर्याच भागात फिरत असताना आम्हाला विजयराव यांची साथ लाभली व अजूनही त्यांचे सहकार्य मिळते,” असे प्रतिपादन अविनाश पाटील यांनी केले. यानंतर कॉम्रेड मोहन शर्मा यांनी यवतमाळ जिल्ह्यातील व विदर्भातील कम्युनिस्ट चळवळीत विजय धाडसे यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे सांगितले.
यावेळी उपस्थितांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे ‘ठरलं डोळस व्हायचं’ आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ ही दोन बहुमूल्य वैचारिक पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.
–किशोर पारटकर, यवतमाळ.
अंनिस नांदेडचा कुटुंब मेळावा संपन्न
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांचा सहकुटुंब मेळावा 26 जानेवारी रोजी नांदेडजवळील कासारखेडा येथील लक्ष्मीबाई चंद्रकांत सावळे यांच्या शेतात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा प्रथम टप्पा परिचयाचा होता. यावेळी परिचयाची अभिनव पद्धत वापरण्यात आली. आपण आपला परिचय न देता, प्रत्येकाने आपल्या जोडीदाराचा किंवा कुटुंबातील सदस्याचा त्याच्या आवडीनिवडी सहीत सखोल परिचय दिला. जेवणानंतर गीत गाण्याचा कार्यक्रम झाला. बलून फोडण्याचा खेळ घेण्यात आला. बादलीमध्ये बॉल टाकण्याचा खेळ जोडीदारांसाठी तसेच एकट्यासाठी ही रंगतदार ठरला. लहान-मोठ्या सर्वांनी या खेळात भाग घेतला.
या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व चंद्रकांत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त) यांनी स्वीकारले होते. या मेळाव्यासाठी एकूण 22 कुटुंब व 15 व्यक्तींनी सहभाग नोंदविला.
–सम्राट हटकर, नांदेड
कोमल व योगेश यांचा सत्यशोधक विवाह
महाराष्ट्र अंनिस शाखा लातूरचे प्रधान सचिव बाबा हलकुडे यांची कन्या कोमल हिचा सत्यशोधक विवाह योगेश विजयकुमार स्वामी यांच्याशी नुकताच संपन्न झाला. या लग्नसोहळ्याचे प्रास्ताविकपर मनोगत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे सरांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी सत्यशोधक विवाहाचा थोडक्यात इतिहास सांगितला. लातूर शाखेने लावलेल्या आंतरजातीय सत्यशोधकी विवाहाच्या संदर्भात माहिती दिली. लग्न लावण्याची सर्व प्रक्रिया लातूर शाखेचे खंदे कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांनी पार पाडली. विवाहाचे सूत्रसंचलन अनिल दरेकर यांनी केले, महाराष्ट्रातील थोर सामाजिक विचारवंत अॅड. मनोहरराव गोमारे आणि प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार सरांनी मनोगत व्यक्त केले. तर सर्व उपस्थितांचे अतिशय प्रेमपूर्वक आभार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातूर जिल्ह्याचे प्रधान सचिव सुधीर भोसले यांनी मानले आणि हा अनोखा व आनंददायक विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर उपस्थितांतून अनेकांनी या सत्यशोधकी विवाहाचे कौतुक केले.
–प्रा. डॉ. दशरथ भिसे, लातूर