मुक्ता दाभोलकर -
लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या, वारकरी संप्रदायातील विवेकी विचारांचे विवेचन करणार्या दोन पुस्तिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित होत आहेत. त्या निमित्त अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी या दोन पुस्तिकांचा घेतलेला मागोवा…
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणार्या मीमांसक समीक्षक डॉ. तारा भवाळकर या गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत आहेत. साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड उभा राहिलेला आहे.
लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अभ्यास व संशोधनासाठी प्रा. भवाळकर यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. अनेक विद्यापीठांच्या विविध समित्यांवर तज्ज्ञ म्हणून काम केले. अमेरिका व इंग्लंड येथील विद्यापीठातील साहित्यविषयक चर्चासत्रात आपली भूमिका मांडली. मराठी विश्वकोश, वाङ्मयकोश, ग्रंथकोश, समाज विज्ञान कोश, चरित्रकोश अशा विविध संदर्भग्रंथांच्या लेखनात सहभाग दिला. दिवंगत डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासोबत त्यांनी ‘महामाया’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. जानेवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांचे समग्र लेखन हे वस्तुनिष्ठता, यथार्थ चिकित्सक दृष्टी आणि सैद्धान्तिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे.
प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ आणि ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ या दोन पुस्तिका अंनिसच्या वतीने प्रकाशित होत आहेत, ही आनंदाची बाब आहे.
‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ या पुस्तिकेत तारा भवाळकर यांनी संतांच्या मानवतावादी व चिकित्सक विचाराचे विविध पैलू अभंगांचे दाखले देत स्पष्ट केले आहेत.
भक्ती चळवळीच्या उगमाची सामाजिक पार्श्वभूमी, स्त्री-शूद्रादी दास्यपीडित समाजाला त्यातून मिळालेला दिलासा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या व्यक्तित्वाचा संक्षिप्त आढावा, शूद्र समजल्या जाणार्या जातीत जन्मलेल्या संतांना प्रत्यक्ष जीवनात सोसावा लागलेला त्रास यांची मांडणी करून संतांचे विचार समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी प्रा. डॉ. तारा भवाळकर आरेखित करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल संतांचे विचार सांगताना, वैराग्याचे सोंग आणून ढोंगीपणा करणारे साधू, नवस, अघोरी उपासना, सोवळे-ओवळे, कर्मकांड, मरणोत्तर मुक्ती, प्रपंच व परमार्थ, जातिभेद, पाप आणि पुण्याच्या व्याख्या, गुरुपद, स्त्रीचा रजोधर्म अशा विविध मुद्यांबद्दलच्या संत रचना सांगून त्यावर भवाळकर यांनी भाष्य केले आहे. वारकरी संतांबरोबरच बसव संप्रदायाबद्दलची थोडक्यात माहिती देखील या पुस्तिकेत आहे. भक्तीतील समतेचा उद्गार करताना वर्णवर्चस्वाला आव्हान देण्यासंदर्भातील मर्यादांचा उल्लेख देखील लेखिकेने केला आहे.
दुसरी पुस्तिका ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ या मध्ये त्यांनी मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई, बहिणाबाई या व इतर काही संत कवयित्रींच्या स्थूल चरित्र कथा सांगितल्या आहेत, तसेच त्यांच्या काही रचनांचे दाखले देऊन त्या रचनांचे विश्लेषणही केले आहे.
‘उपाधी सोडणे हीच साधूची खरी समाधी आहे’ असे सांगणारी मुक्ताई, श्रम करणारी ग्रामीण स्त्री स्वतःला जिच्या रचनांमध्ये पाहते अशी जनाई, नायकिणीची मुलगी असलेली कान्होपात्रा, स्वतःला प्रिय असलेल्या भक्तिमय वातावरणाचा सासरी अभाव असल्याने सासर त्यागून आलेली नागरी उर्फ नागी, तिसर्या वर्षी तीस वर्षांच्या बिजवराशी लग्न लागलेली व सतत नवर्याची हिंसा सोसणारी बहिणाबाई वाचकांना या पुस्तिकेत भेटतील.
स्वत्व नाकारून नवरा, मुले, सासर यांच्या छायेत जगणे हाच पारंपरिक स्त्रीत्वाचा आदर्श मानला जात असताना स्त्रीविषयक पारंपरिक कल्पनांना छेद देणारे, आत्मनिष्ठा ठळकपणे व्यक्त करणारे संत कवयित्रींचे आत्मप्रगटीकरण लेखिका या पुस्तिकेतून उलगडते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संत आणि समाजसुधारकांच्या विवेकी विचारांचा वारसा पुढे चालवत आहे.’ सदर बाब या दोन्ही पुस्तकांच्या वाचनातून अधोरेखित होते.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील कार्यकर्ते, तसेच हा विचार समजून घेण्याची व पुढे नेण्याची इच्छा असलेल्या सर्वांना या दोन पुस्तिका प्रेरणादायी व उपयुक्त वाटतील असा विश्वास वाटतो.
-मुक्ता दाभोलकर
पुस्तकाचे नाव : 1- अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान 2- वारकरी परंपरेतील महिला संत लेखिका : प्रा. डॉ. तारा भवाळकर स्वागतमूल्य : प्रत्येकी ३० रुपये प्रकाशक : अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र पुस्तकासाठी संपर्क : सुहास – ९९७०१७४६२८

