-
सातारा ‘अंनिस’चा पुढाकार, सामंजस्याने समेट
जवळपास दशकभरापासून सामाजिक बहिष्काराच्या आगीत होरपळणार्या कुटुंबाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारामुळे या जाचातून मुक्तता झाली आहे. हा तिढा सोडविण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यात पीडित कुटुंब व संबंधित समाजातील प्रमुख यांच्यात बैठक होऊन सामंजस्याने समेट घडवून सामाजिक ऐक्याची भूमिका घेतली गेली.
याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा येथील मध्यवर्ती कार्यालयात 20 जानेवारी 2022 रोजी तक्रार अर्ज आला होता. त्या अर्जास अनुसरून मंगळवारी मेढा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत अर्जदार संपत गणपत सपकाळ व संदीप संपत सपकाळ यांनी आपल्यावर 2010 पासून होत असलेल्या बहिष्कारवजा प्रसंगांची कैफियत कथन केली. त्यानंतर रांजणी गावाचे रहिवासी सुनील दशरथ सपकाळ, चंद्रकांत शंकर सपकाळ, दिलीप तुकाराम सपकाळ, राजेंद्र तुकाराम सपकाळ, राजाराम शिवराम सपकाळ, महेंद्र चंद्रकांत सपकाळ यांनी मवाळ भूमिका घेतली.
दोन्ही बाजूंच्या प्रमुखांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून अमोल माने यांनी यापूर्वीच्या गैरसमजामुळे निर्माण झालेला तणाव दोन्ही बाजूच्या जाणकारांनी मान्य करून सामाजिक ऐक्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले. या आवाहनास ग्रामस्थ विजय बालाजी सपकाळ, पोलीस पाटील किरण जंगम यांच्यासह सर्व उपस्थितांनी संमती दर्शवली व गावाचे ऐक्य अबाधित राहील, याची ग्वाही दिली. बैठकीत ‘म. अंनिस’चे आंतरजातीय सलोखा समितीचे सदस्य शंकरराव कणसे, सातारा शहर कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने यांनी सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यातील तरतुदी सर्वांना समजावून सांगत प्रबोधन केले, ज्यामुळे सामंजस्य होणे सुलभ झाले. राज्य बुवाबाजी संघर्ष समितीचे सदस्य भगवान रणदिवे व ‘म. अंनिस’चे राज्य विधी समिती सदस्य अॅड. हौसेराव धुमाळ यांनी ऐनवेळी उद्भवणारी तणावाची परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली. ‘म. अंनिस’च्या जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने यांनी सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. दरम्यान, रांजणीचे पोलीस पाटील किरण जंगम यांनी पेढे वाटून सर्वांचा आनंद द्विगुणीत केला.