मुक्ता दाभोलकर -

अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यांमधील ३१४ गावांचा भाग मेळघाट या नावाने ओळखला जातो. येथे प्रामुख्याने ‘कोरकू’ हा आदिवासी समाज राहतो. येथील विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. या दुर्गम जंगलभागात राहणारे आदिवासी उपजीविका, आरोग्य, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांशी निगडित समस्यांना तोंड देत जीवन जगतात. येथील बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न गेली सातत्याने चर्चेला येत असतो. शासन, अनेक स्वयंसेवी संस्था मेळघाटातील गुंतागुंतीच्या प्रश्नांवर काम करतात.

येथील लोकांवर भुमका म्हणजे भगत किंवा मांत्रिकाचा प्रभाव आहे. आरोग्याच्या समस्यांसाठी लोक भुमकाकडे जातात. लहान मुले आजारी पडल्यावर कुटुंबीय जेव्हा त्यांना भुमकाकडे घेऊन जातात तेव्हा भुमका स्वतः त्यांच्या पोटावर डागण्या देण्याचा अघोरी उपचार करतात किंवा अशा डागण्या देण्याचा सल्ला देतात व त्यानुसार बाळाची आई, आजी किंवा घरातील इतर व्यक्ती आजारी बाळाच्या पोटावर डागण्या देतात. याला डंबा देणे, असे म्हणतात. या उपचाराला कोणताही शास्त्रीय आधार नाही. आरोग्य व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचण्यातील अडचणी, गरीबी या सोबतच अज्ञान, अंधश्रद्धा आणि भुमकाचे लोकांच्या मनावरील अधिराज्य यामुळे डंबा देण्याचा हा अघोरी उपचार आजही सर्रास चालू आहे. दरवर्षी डंबा देणे या अघोरी उपचाराने एखाद्या बाळाचा मृत्यू झाल्याचे प्रसारमाध्यमांमधून समोर येते, तेव्हा त्याबद्दल चर्चा होते व कालांतराने ती विरून जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी या अघोरी प्रथेविरुद्ध सातत्याने प्रबोधन करण्याचा व आवश्यक तेथे कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्याचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला आहे. त्यासाठी अंनिसने ‘डागण्या(डंबा नको) औषधोपचार देऊया’ ही मोहीम हाती घेतली आहे.
दिनांक १७ मार्च २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमरावती येथून ‘डागण्या(डंबा नको) औषधोपचार देऊया’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, वर्धा जिल्हा शाखेचे नरेंद्र कांबळे व इतर अनेक समविचारी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. या मोहिमेला शासनाचे सहकार्य लाभले असून शासनाच्या वतीने अमरावतीच्या मा. तहसीलदारांनी या प्रबोधन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. दिनांक १७ मार्च ते ७ एप्रिल २०२५ असा मोहिमेचा पहिला टप्पा असून या टप्प्यात नंदिनी जाधव, भगवान रणदिवे व श्रीकृष्ण धोटे हे अंनिस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
पुढील अंकात मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे अनुभव मांडण्यात येतील.
– मुक्ता दाभोलकर