मधुकर अनाप -

माळी ही महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्टीने लवकर जागृत झालेली जात आहे. संतपरंपरेत मोठे नाव असणारे संत सावता माळी आणि क्रांतिकारी विचारांचे कृतिशील समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे माळी जातीचे. संत सावता माळी हे कर्ममार्गी संत होते. कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तीमार्ग शिकवण देणारे ते संत होते, हे त्यांच्या अभंग रचनेतून त्यांनी सांगितले.
आमची माळियाची जात शेत लावू बागाईत॥
आम्हां हाती मोट नाडा पाणी जाते फुलझाडा॥
शांती शेवंती फुलली प्रेम जाईजुई व्याली।
सावताने केला मळा विठ्ठल देखियला डोळा॥
संत सावता माळी हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अंत:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. आपले कर्म करत केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे. अशी त्यांची धारणा होती. प्रत्येक पीक, भाजीपाल्यात त्यांनी ईश्वराचे रूप पहिले.
‘कांदा मुळा भाजी।
अवघी विठाबाई माझी’
‘लसूण मिरची कोथंबिरी।
अवघा झाला माझा हरि ॥’
माळी जातीतील या संताचा आदर्श माळी समाजाला पुढे नेण्यासाठी नेहमी आदर्शवत, अनुकरणीय ठरला आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे माळी समाजातील एक थोर क्रांतिकारी समाजसुधारक. त्यांनी केवळ माळी जातीसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. ‘शेतकर्याचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथांमधून त्यांनी शेतकरी आणि कष्टकर्यांच्या व्यथा, सावकार आणि पुरोहितशाहीचे जुलमी वर्चस्व, स्त्री मुक्तीविषयी मांडलेले विचार आणि प्रत्यक्ष कार्यातून स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी तसेच समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा यातून बाहेर काढण्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक रोष पत्करून केलेल्या कार्यातून बहुजन समाजाचा आणि स्त्रियांचा उद्धार करण्याचे प्रयत्न झाले, असे ज्योतिराव आणि सावित्रीबाई हे माळी समाजासाठी आदर्श आहेत.
माळी जात आणि समाज….
माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता आणि अजूनही करतो. मळे करणारा म्हणजे बागायती शेती करणारा माळी. बागायत शेती जिथे असते त्याला ‘मळा’ म्हणतात. माळी उत्तर भारतात, पूर्व भारतात तसेच नेपाळमध्ये, महाराष्ट्रात आणि तराई प्रदेशात आढळतात.
सर्व माळी जातींचा मूळ उगम, संस्कृती, इतिहास किंवा सामाजिक स्थितीत समानता नाहीये. हा समाज काही ठिकाणी क्षत्रिय म्हणून ओळखला जातो. जो परकीय आक्रमणामुळे विस्थापित होऊन शेती करायला लागला. लढाऊ असल्यामुळे या समाजाने हवे ते करायचे निवडले आणि पूर्वी शेती करणारा त्यातल्या त्यात बागायती शेती करणारा समाज हा सर्वांत जास्त आत्मनिर्भर असल्यामुळे या लढाऊ समाजाने बागायती शेती केली. आज या समाजाचे जे वंशज आहेत त्या सर्वांच्या शेती ह्या नदीजवळ किंवा गावाशेजारीच आहे. पण परकीय आक्रमणानंतर जी वर्ण व्यवस्था भारतीय समाजात लागू झाली त्या व्यवस्थेला हा समाज देखील बळी गेला आणि सध्याच्या परिस्थितीत एक मागासवर्गीय जात (ओबीसी) म्हणून राहिला.
देशात माळी समाजाची संख्या सुमारे दहा ते पंधरा कोटी तर राज्यात सुमारे दीड कोटी आहे. म्हणजे देशात आणि राज्यात लोकसंख्येचे प्रमाण साधारणपणे १० ते १२% आहे, ज्यामुळे ते निवडणुकीत एक महत्त्वाचा घटक ठरतात.
माळी समाजातील काही प्रमुख पोटजाती :
फुलमाळी, क्षत्रिय माळी, वनमाळी, पानमाळी, डांगमाळी, हळदीमाळी, जिरेमाळी, गासेमाळी, काशी माळी, काचमाळी, कोसरे माळी, मरार माळी, पहाड माळी, लोणार माळी, पंचकळसी, चौकळशी, आगारी माळी, लिंगायत माळी. उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोळंकी, चव्हाण, पवार, कविटकर, वाघेला ही मूळ मराठा व राजपूत जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले. अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली, म्हणून त्यांना ‘माळी’ असे संबोधण्यात येऊ लागले. त्यातून ‘क्षत्रिय माळी’ ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे -: सैनी माळी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, माला, कच्छी, दासी, बागवान, राऊत, तडस, सागर, आहार, अहेरी, अंध, अंदी, मैना कहार, खैरा, वाघेलवाल आदी. मुस्लीम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते.
विवाह संबंधांविषयी :
माळी समाजात एकाच पोटजातीत लग्न करण्याची प्रथा आहे, परंतु अलीकडे इतर पोटजातीतही विवाह होत आहेत. आता अनेक माळी कुटुंबांमध्ये इतर समाजातील व्यतींसोबत आंतरजातीय विवाहास सामाजिक मान्यता मिळत आहे. सत्यशोधकी विवाह आणि रजिस्टर विवाहांना मान्यता मिळत आहे. हुंडा पद्धती समाजात बर्यापैकी कमी झाली आहे. असे असले, तरी आजही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले आणि नसलेले सुद्धा श्रीमंती थाटात केवळ प्रतिष्ठा म्हणून लग्नसमारंभ करण्यात, खोटी प्रतिष्ठा मिळविण्यात धन्यता मानतात.
शिक्षण :
माळी समाजात अलीकडे अनेक पुरोगामी विचारवंत आणि चळवळीमुळे परिवर्तन होऊन शैक्षणिकदृष्ट्या समाज प्रगत असल्याचे दिसते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षमता येऊन जातिभेद, अंधश्रद्धा समाजात कमी होण्यास मदत झाली आहे.
राजकीय सक्षमीकरण :
देशात आणि राज्यात सुमारे दहा ते बारा टके माळी समाजाचे प्रमाण असल्याने आणि समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम झाल्याने राजकारणात राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत आहे.
संघटन आणि चळवळ :
माळी समाजाला एकत्र आणून त्यांच्या हकांसाठी आवाज उठवण्यासाठी संघटन आणि चळवळी उपयुक्त ठरतात. त्यातूनच महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ, अखिल भारतीय माळी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, ओबीसी संघटनांच्या माध्यमातून समाज संघटित होऊन आज न्याय्य हकांसाठी पुढे येत आहे.
सामाजिक न्याय :
रूढी-परंपरावादी विचारसरणी आजही काही प्रमाणात पाळल्या जातात. असे असले, तरी माळी समाजात फुले, शाहू, आंबेडकर विचार चांगल्या प्रकारे रुजविण्याचे काम पुरोगामी विचारवंत आणि चळवळींनी केले आहे. त्यांच्या विचारांनी सामाजिक न्यायासाठी प्रेरणा दिली आहे..
जन्म आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म…
शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला माळी समाज अद्यापही ग्रामीण आणि शहरी भागात काही प्रमाणात पुरोहितशाहीच्या प्रभावाखाली असल्याचे दिसते. जन्म-मृत्यूच्या वेळी योग्य की अयोग्य वेळ आहे यासाठी ब्राह्मणांकडून पूजाअर्चा करणे, मृत्यूनंतरचे विधी ब्राह्मण सांगेल त्याप्रमाणे करणे. दशक्रिया, तेरावा, वर्षश्राद्ध, गरुड पुराण व काही पूजाअर्चा यामध्ये समाज भीतीपोटी अडकलेला आहे. तथापि सत्यशोधक समाज, माळी महासंघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महात्मा फुले समता परिषद या पुरोगामी चळवळीच्या प्रबोधनातून यावर बर्यापैकी अलीकडच्या काळात समाज बाहेर येताना दिसत आहे. अल्प प्रमाणात का होईना, चळवळीत समाजाचा सहभाग दिसतो. मी स्वतः वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील काही व्यतींचा विरोध डावलून मृत्यूनंतरची क्रियाकर्मे न करता सामाजिक संस्थांना वडिलांचे स्मरणार्थ मदत केली. मी आणि माझ्या पत्नीचे मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. जवळचे नातेवाईक आणि मुलांना याची कल्पना दिली आहे.
यासोबत सातत्याने व्यक्तिगत पातळीवर आणि चळवळीच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम चालू आहे. समाजाला हे पटू लागले आहे, तरीही सामाजिक दबाव आणि भीतीपोटी काही प्रमाणात लोक बळी पडतात. त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम करणे हे आव्हान आहे.
स्त्री शिक्षण आणि स्त्री–पुरुष समानता
माळी समाज चांगल्या प्रकारे शिक्षित असल्याने स्त्रियांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाते. सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर असून राजकीय क्षेत्रातही त्यांना मानाचे स्थान दिले जात आहे. अनेक रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धेत इतर समाजाप्रमाणेच माळी समाजातील स्त्तिया अडकलेल्या असल्या, तरी शिक्षण आणि पुरोगामी विचारातून स्त्रियांना अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धेतून मुक्त करण्यात समाजाला बर्यापैकी यश आले असले, तरी अजूनही शिक्षित स्त्रिया अनिष्ट प्रथा, परंपरा, व्रत-वैकल्यात अडकलेल्या दिसतात. पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव अजूनही समाजात दिसतो. त्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.
सारांश
संत सावता माळी, क्रांतिकारी समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा वारसा असलेल्या माळी समाजातील सिने नाट्य, वकिली, वैद्यकीय, हॉटेल धंदा, चित्रपटगृहे, आधुनिक उद्योग, संशोधन, व्यासंग, कलाक्षेत्र, राजकारण यातील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे पाहिल्यावर माळी समाजात कर्तृत्ववान व्यक्ती तयार होत असल्याचे लक्षात येते. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम केले तरी त्यात माळ्याच्या शेतीसारखी मेहनत, नेमकेपणा आणि नेटकेपणा दिसतो. भांडवल निर्मितीमध्ये माळी वेगाने पुढे सरकताना दिसतात. त्यामुळे नव्या भांडवल संचयाचा राजकारणावर परिणाम होऊ लागेल, त्या वेळी माळी समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सहभागाला नवे परिमाण निर्माण झालेले दिसेल.
– मधुकर अनाप, सात्रळ, राहुरी
संपर्क : ९८५०१ ४४७०९