-
रयत शिक्षण संस्थेच्या संजयनगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. ७ मे रोजी ‘शून्य सावली दिवस’ (Zero Shadow Day) या दुर्मीळ खगोलीय घटनेचा रोमांचक अनुभव घेतला. खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या वेळी विद्यार्थ्यांना सूर्य पृथ्वीच्या नेमक्या डोक्यावर आल्यामुळे काही क्षण वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी कशी होते, याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली. शाळेच्या परिसरात विविध वस्तू उभ्या करून विद्यार्थ्यांनी शून्य सावलीची घटना अनुभवली. या अनोख्या वैज्ञानिक प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली.
डॉ. निटवे यांनी विद्यार्थ्यांना शून्य सावली दिवसामागील वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत समजावून सांगितली. पृथ्वीची अक्षावरील कलती स्थिती, सूर्याची प्रत्यक्ष स्थिती आणि उष्ण कटिबंधातील भागांमध्ये वर्षातून दोन वेळा ही घटना कशी घडते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमावेळी अंनिसच्या आशा धनाले, त्रिशला शहा, शाळेचे पर्यवेक्षक तसेच विज्ञान विभाग प्रमुख हुसेन मगदूम, शिक्षिका संगीता सरगर, पूजा पाटील, रेश्मा मुल्ला यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान शिकण्याची संधी मिळाल्याने उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
