-

गणपती महाराजांचे कार्य ऐकून मी सत्यपालसिंग राजपूत, अरविंद जोशी, विक्रांत बदरखे आम्ही अवाक् झालो. शंभर वर्षांपूर्वी एखादा माणूस इथल्या जातिव्यवस्थेला हादरे देणारे इतके धाडसी आणि क्रांतिकारी काम करू शकतो, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट होती.
या माहितीपटाचे स्वरूप कसे असावे? कुणाकुणाच्या मुलाखती घ्याव्यात? कोणकोणत्या मुद्द्यांची मांडणी करावी, यावर आम्ही सलग तीन दिवस चर्चा करत होतो. अरविंदने काही तांत्रिक बाबी आम्हाला समजावून सांगितल्या. संपूर्ण समता असलेला समाज अस्तित्वात येऊ शकतो का? जातिव्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे? सामान्य लोक जातिव्यवस्थेकडे कसे पाहतात? कर्मकांडांची जुनी व्यवस्था आणि प्रतीकं नाकारून कर्मकांडांची नवी प्रतीके आणि नवी रुपे अस्तित्वात कशी येतात? म्हणजे क्रांतीचं रूपांतर प्रतिक्रांतीत कसं होतं? जातिव्यवस्था, पितृसत्ताक ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचा नायनाट करण्याची प्रत्यक्ष प्रेरणा गणपती महाराजांनी कुठून घेतली? मूर्तिपूजेकडून निर्गुणाकडे त्यांचा प्रवास कसा झाला? अजात संप्रदायाला असलेला जनाधार कमी-कमी कसा काय होत गेला? गणपती महाराजांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची नऊ वर्षेएकांतात आणि मौनात का घालवली? त्यांच्या हयातीत व नंतर पंथीय भेद का व कसे निर्माण झाले? आजच्या अजात पंथाच्या अनुयायांपुढील नेमके पेच आणि आव्हाने कोणती? एखाद्या व्यक्तीच्या जीवनचरित्राचा शोध त्याने रचलेल्या कवितांमधून किती घेता येऊ शकतो? अशा अनेक बाबींचा विचार आम्ही करत गेलो.
महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर विदर्भाचा प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला; पण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, वैचारिक आणि सांस्कृतिक वारशावर पश्चिम महाराष्ट्राचीच पकड राहिली. त्यामुळे पुण्यातल्या पेठांमधल्या सुधारकांमध्ये झालेले लहान-सहान वैचारिक वादही इतिहासात दाखवले जातात; पण विदर्भातील एवढ्या मोठ्या घटनेची महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात नोंद होत नाही.
महाराष्ट्राला वारकरी संतपरंपरेचा वारसा आहे. वारीत, पंढरपूरच्या वाळवंटात, चंद्रभागेत स्नान करताना उच्च-नीचतेचा भाव या वारकर्यांच्या मनात नसतो; पण वारी गावात परत आल्यावर पुन्हा सगळे जातीय आणि वर्गीय रचनेत भेदाभेद आणि शोषणाच्या व्यवस्थेचे पालन करतात; गणपती महाराज मात्र येथे वेगळे ठरतात. गावातूनही भेदाभेद आणि शोषणाची व्यवस्था झुगारून द्यायचा मोठा लढा त्यांनी उभारला. आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत, त्यामुळे भेदाभेद पाळणे हा भ्रम होय, असा सिद्धांत आपली परंपरा सांगत होता; पण या सिद्धांताची प्रत्यक्षात व्यावहारिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न गणपती महाराजांनी केला. ब्राह्मणी वर्चस्ववादी धर्मव्यवस्थेला पुरजोर विरोध करून ‘अजात’ पंथाच्या रुपात नवा पर्याय गणपती महाराजांनी दिला, म्हणूनच प्रत्यक्ष चळवळ राबवून समाजपरिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करणारा हा वारकरी परंपरेतील संत ‘क्रांतिकारी’ ठरला…
गणपती महाराजांचे जीवनकार्य समाजासमोर यावे म्हणून आम्ही ‘अजात’ हा माहितीपट तयार केला.
अरविंद जोशी 81490 73103
सत्यपालसिंग राजपूत 92267 15838
गणपती महाराजांनी त्यांच्या अनुयायांना मृत्यूनंतर अजात संप्रदायात दफन करण्याचा संदेश दिला होता. अजात संप्रदाय मान्य असणारे दहन करीत नाहीत. कोणत्याही प्रकारचे ते सुतक पाळत नाहीत. कुठल्याही प्रकारचे श्राद्ध करायला गणपती महाराजांनी नकार दिला होता. भूतबाधा ही संकल्पनाच गणपती महाराजांनी नाकारली होती. महिलांची मासिक पाळी ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट असून त्यात अपवित्र काहीच नाही, अशी त्यांची मांडणी होती. गणपती महाराजांच्या सगळ्या कार्यक्रमात पहिली ओळ महिलांची बसविली जात असे, नंतर पुरुषांची ओळ असे. स्त्री -पुरुष समानता फक्त तोंडी नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून अंगीकारली होती .‘महिला कीर्तनकार’ ही संकल्पना सर्वप्रथम गणपती महाराजांनी निर्माण केली, त्यांच्या अनेक शिष्या कीर्तन करत असत.