गजानन जाधव - 8888669436

लॉकडाऊनच्या काळात मी सोशल मीडियावर वेळ घालवीत असताना ‘शेअरचॅट’वर श्री स्वामी समर्थ केंद्र या नावाने असणार्या अकाऊंटवरून शे-दोनशे राशिभविष्याच्या प्रचाराचे पोस्टर होते. आणि त्यात लिहिलेलं होतं – महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषकार असून विवाहविलंब, मनासारखा वर-वधू मिळणे, लग्न जुळून मोडणे, पती-पत्नीत वादविवाद होणे, संतान सुखात बाधा येणे, शिक्षणात, नोकरीत समस्या, व्यवसायात अडचण, मंगळदोष, कालसर्प योग, ग्रहणदोष, प्रेमभंग, गृहकलह, पितृदोष यांसारख्या सर्व समस्यांचे मार्गदर्शन व उपायासाठी आम्हाला संपर्क करा, म्हणून नंबर दिला होता. मग मी अचूक भविष्य सांगणार्या ‘त्या’ ज्योतिषाकडून आपलेही भविष्य जाणून घ्यावे म्हणून त्याला फोन केला. माझे वय 33 वर्षं झाले, तरीही लग्न जमत नाही, हे सांगितल्यावर ज्योतिषांनी माझा फोटो व जन्मकुंडली पाहूनच अचूक भविष्य सांगता येईल व काय समस्या आहेत ते समजेल आणि त्यावर काय उपाय करता येईल ते कळेल, असे सांगितले. मग मी माझी जन्मपत्रिका ज्योतिषांना पाठवली. त्यावर अभ्यास करून दुसर्या दिवशी फोन आला – लग्नाचा योग तर दिसतच नाहीत; चंडाल भद्रया योग, कालसर्प योग, पितृदोषासह राहू-केतू, शनी, मंगल जणू काही सर्व आकाशगंगाच माझ्या कुंडलीत येऊन बसल्यासारखे ज्योतिष सांगू लागले. महाराजांना जराही संशय न येऊ देता माझा संवाद सुरूच होता. माझे लग्न होऊन मला दोन मुले आहेत, हे त्या ‘प्रसिद्ध’ ज्योतिषकाराला माझी पत्रिका पाहून कळालं नाही. माझा लग्नाचा योग नाहीच; पण माझ्या आयुष्यात फार मोठं संकट येणार आहे, अशी भीती घालून त्यांच्या नियमित ‘ग्राहका’प्रमाणे माझ्याकडूनही काही पैसे काढण्याचा आटापिटा सुरू होता. उपाय म्हणून ‘21 दिवसांची पूजा, होमहवन, राशीतील ग्रहांना मंत्र-तंत्राने श्रीफलात बांधून ठेवावे लागेल आणि यासाठी 8 ते 10 हजारांपर्यंत खर्च येईल. पूजा सुरू करायची असल्यास मला लवकर कळवा व त्यासाठी लागणारे पैसे माझ्या अकाऊंट वर पाठवा,’ असे सांगून महाराजांनी फोन कट केला.
दुसर्या दिवशी सकाळीच महाराजांनी फोन केला आणि म्हणाले, ‘तुमची पूजा सुरू केली आहे.’ मी म्हणालो, ‘पाठवेन; पण तुम्ही सांगितलेले भविष्य खरे आहे का? आणि 21 दिवसांची पूजा घातल्यावर माझे लग्न जमेल का?’ त्यावर महाराजांनी आपली भविष्यवाणी 100 टक्के खरी असल्याचे सांगितले. पूजेचे 21 दिवस संपताच पुढील 11 दिवसांत विवाह स्थळ चालून येईल, असे भाकीत ऐकून मी शांतपणे म्हणालो, ‘महाराज, माझे लग्न 9 एप्रिल 2009 साली झाले असून मला एक मुलगा, एक मुलगी आहे आणि माझा संसार सुखा-समाधानाने चालला आहे. तुम्ही तुमच्या मनानेच माझ्या कुंडलीत ग्रह-तारे आणून बसवलेत. तुम्हाला माझ्या भूतकाळात झालेले लग्न व वर्तमानकाळातील माझी पत्नी व मुले आणि भविष्यकाळातील कुटुंबाचा सुखी असणारा संसार तुम्ही पाहू शकला नाहीत. ते तुम्हाला कळलेही नाही.’ त्यावर महाराजांनी काही शाब्दिक चकमकी सुरू केल्या; पण मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असल्याचे सांगून मी म्हणालो, ‘तुम्ही थोतांड भविष्याचे भांडवल करून लोकांना फसवीत असल्याची मला माहिती मिळाली, म्हणून मी तुम्हाला पुराव्यानिशी पकडण्यासाठी ही योजना आखली.’ हे ऐकून महाराज थंडगार झाले. महाराजांनी माफी मागून ‘यापुढे अशी फसवेगिरी करणार नाही, ग्रह-तार्यांची भीती दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करणार नाही. भविष्य वगैरे काही नसतं. हा एक व्यवसाय आहे आणि हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय चालत आला आहे आणि मीही तोच व्यवसाय करून कुटुंब चालवतो. तरी यापुढे अशी चूक होणार नाही,’ म्हणून महाराजांनी माफी मागितली.