संजीव चांदोरकर -

देशातील ७०-८० टके कुटुंबांना सतत कोणत्या ना कोणत्या भौतिक प्रश्नांची चिंता भेडसावत असते. वित्त भांडवलाच्या युगात अशा प्रश्नांचे देखील मॉनिटायझेशन झाले आहे. त्याचा अर्थ असा की, प्रत्येक प्रश्नाचे आणि त्याच्या उत्तराचे मूल्य रुपयातच काढले जाते. प्रश्नाची उत्तरे पुन्हा दोन प्रश्नाच्या रूपातच पुढे येतात… किती पैसे लागणार आहेत आणि ते नकी कुठून उभे करायचे? हा काही मूठभर दुर्दैवी व्यक्तींचा प्रश्न असता तर त्यावर एवढी चर्चा करण्याची गरज नव्हती. आजूबाजूला नजर टाकली की कळते. गावात, वस्तीत अनेकजण जवळपास तशाच परिस्थितीत अडकलेले आहेत. असे असून देखील अशा बहुतांश वंचित, पीडित व्यक्ती त्यावर विचार मात्र एकेकट्या करतात, दिवसरात्र चिंताग्रस्त असतात. अनेक कारणे कारणीभूत आहेत. व्यतिकेंद्री तत्त्वज्ञानाचा झालेला अतिरेक, राहणीमानाची लागलेली स्पर्धा, कमकुवत झालेले कौटुंबिक आणि कम्युनिटी बंध इत्यादी. प्रौढ व्यक्ती, शरीराने राहतात कुटुंबात किंवा समूहात. पण मनाला अहोरात्र पोखरणार्या चिंता इतरांशी फारशा शेअर करत नाहीत. याबाबतीत स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे. तुलनेने स्त्रिया अशा गोष्टी इतर स्त्रियांपाशी , मैत्रिणींशी, शेजारणींशी शेअर करतात. पुरुष मंडळी आपले वित्तीय ताणतणाव, आपल्या डोक्यावरील कर्जाबद्दलच्या चिंता आपल्या बायकोशी देखील बोलत नाहीत असे दिसते. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मागे राहिलेल्या बायकांच्या मुलाखतीत वारंवार येणारे जर कोणते वाक्य असेल तर ते म्हणजे, मला यांनी कधीही डोक्यावरील कर्जाबद्दल सांगितले नव्हते. न झेपणार्या कर्जाचा प्रश्न गंभीर आहेच, पण त्याचा बोजा एकेकट्याने वाहणे तेवढेच गंभीर आहे.
वित्तीय ताणतणावातून जाणार्या व्यक्तींना, विशेषतः पुरुषांनी, त्यांचे मन किमान आपल्या कुटुंबीयांशी मोकळे केले पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन कुटुंबाच्या बाहेर समवयस्क, समपीडित मित्रांशी बोलले पाहिजे. कुटुंबाबाहेर अशा शेअरिंगसाठी अनौपचारिक वित्त चर्चागट स्थापन करण्याची गरज आहे. (वित्त गटाची संकल्पना पुढच्या प्रकरणात.)
सार्या कुटुंबाने एकत्र बसून निर्णय घ्यावेत…
‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ सारख्या प्रयत्नांमुळे देशात साक्षर लोकांचे प्रमाण नकीच वाढले. त्याच्या गुणवत्तेचा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू या. पण त्यामुळे अनेकांची किमान अक्षर आणि आकडे ओळख तर नकीच झाली. परिस्थिती स्थिर, साचलेल्या डबक्यासाखी देखील नाही राहिलेली. ती प्रवाही आहे. अनेक गरीब घरांतील मुले-मुली धडपडत शाळा, कॉलेजेसमध्ये जात आहेत. वेळ पडलीच तर पोटाला चिमटा काढून आई-वडील त्यांना शिकवीत आहेत. अर्धी लोकसंख्या ३५ वर्षांखाली असणार्या आपल्या देशात शाळा, कॉलेजच्या पायर्या चढल्या/उतारलेल्यांची, स्मार्टफोन, इंटरनेट वापरणार्यांची, इंग्रजी शब्दांची तोंडओळख झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. ती संख्या सतत वाढती आहे. आजचे तरुण विद्यार्थी पुरेसे अर्थ-वित्त-साक्षर नसलेल्या प्रौढ नागरिकांच्या पोटची मुले-मुली आहेत. बॉटम ऑफ पिरॅमिड कुटुंबांमध्येही एक मोठी पॉझिटिव्ह प्रक्रिया घडत आहे. त्याचे जनकेंद्री वित्त साक्षरतेच्या दृष्टिकोनातून विधायक अर्थ लावण्याची गरज आहे.
कुटुंबातील आई-वडील आपल्या कॉलेजमध्ये जाणार्याच नव्हे, तर वयात आलेल्या मुला-मुलींबरोबर घरातील पैशाचे व्यवहार, जमा-खर्च, डोक्यावरील कर्ज, कर्जाचे हप्ते, भविष्यातील खर्चाचे प्लॅनिंग याबद्दलच्या चर्चा करत असतीलच. नसतील करत तर आवर्जून केल्या पाहिजेत. अनेक कारणांमुळे हल्लीच्या अगदी १२-१४ वयोगटातील मुला-मुलींना, आपल्याला वाटते त्यापेक्षा, जगाची, व्यवहारांची बरीच माहिती असते. त्यांना विश्वासात घेतले की त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल. तरुणांनी वित्तीय क्षेत्रातील गुंतागुंतीच्या बाबी स्वतः समजून घेतल्या पाहिजेत. हे व्यवहार करण्यातील धोके काय असू शकतात हे आई-वडिलांना समजावून दिले पाहिजेत. आताची तरुण पिढी त्यांच्या पालकांपेक्षा अधिक शिक्षित असली, तरी ते आपोआप ‘वित्त-साक्षर’ होऊ शकत नाही. आजच्या इंटरनेट, गुगलच्या युगात माहितीचा तुटवडा नाही. पण धो धो कोसळणार्या या माहितीकडे नकी कसे बघायचे, त्याचे अन्वयार्थ कसे लावायचे हे प्रश्न शिक्षित तरुणांना देखील भेडसावणार आहेत. वेगाने बदलणार्या संदर्भात आपल्याला उपकारक किंवा कमी अपायकारक निर्णय घेण्यासाठी सक्षम होण्याची त्यांची आंतरिक इच्छा नकीच आहे. पण वाचन, अभ्यास, आपापसातील चर्चांना पर्याय नसेल.
प्रौढ आई-वडील आपले अनेक दशकांचे अनुभवाधारित शहाणपण चर्चांच्या टेबलवर आणू शकतात. तर कुटुंबातील तरुण सभासद इंटरनेट, स्मार्टफोन, इंग्रजी वाचनातून आलेली अंतर्दृष्टी वापरून बोलतील. त्या चर्चांवर आधारित घेतले गेलेले निर्णय कुटुंबासाठी अधिक हितकारक ठरतील. त्यातून विकसित झालेली शहाणीव आपसूकच पुढच्या पिढीकडे सुपूर्द होईल. हीच मुलं-मुली पुढच्या काही वर्षांत प्रौढ नागरिक बनून विविध क्षेत्रात अर्थार्जन करणार आहेत. संसार थाटून मुले जन्माला घालणार आहेत.
-संजीव चांदोरकर
ई-मेल : chandorkar.sanjeev@gmail.com