विजय खरात -
‘जेवढा पुरावा तेवढा विश्वास’ या बाण्याने विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटनेमागील सत्य-असत्याचा शोध घ्यावा. असे प्रतिपादन बेलापूर-नेरूळ शाखेच्या शहीद भगतसिंग वतृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी मुक्ता दाभोलकर यांनी केले.
“आज-काल प्रसारमाध्यमांतून फेक न्यूजद्वारे समाजात अवैज्ञानिक, अंधश्रद्ध, असत्य गोष्टी पसरवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जशास तशा न स्वीकारता आपली बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करत पुरावा शोधला पाहिजे व जेवढा पुरावा तेवढाच विश्वास या बाण्याने सत्य-असत्य घटनांचा शोध घेतला पाहिजे”, असे उद्गार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारी समितीच्या सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी काढले. त्या नेरूळ येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्या भवन शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर-नेरूळ शाखा आयोजित शहीद भगतसिंग वतृत्व स्पर्धेतील बक्षीस समारंभात विजेत्यांना बक्षिसे दिल्यानंतर बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ हे होते.
शहीद भगतसिंग वतृत्व स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. या वर्षी या स्पर्धेत नवी मुंबईतील १२ शाळांतून ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात नेरूळ, नवी मुंबई येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्याभवन शाळेतील अझीझ पटवेगार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १०७ तुर्भे गाव येथील पियुष हिप्परकर याचा आला व तृतीय क्रमांक ज्ञानदीप सेवा मंडळाच्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील अश्वजीत तथागत मुनेश्वर याचा आला. उत्तेजनार्थ पारितोषिके प्रणाली प्रसन्नकुमार कांबळे व श्रावणी हनुमंत बुरुंगले यांना देण्यात आली. सर्व विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना पुस्तके व प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या सहीचे प्रमाणपत्र देण्यात आले. पारितोषिक वितरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रमेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांसमोर ‘चमत्कारामागील विज्ञान’ हा कार्यक्रम दाखवला ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या कार्यकर्त्या रेखा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर विजय खरात यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रशांत भोर, जाधव सर व राजीव देशपांडे हे बेलापूर-नेरूळ शाखेचे शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यात भास्कर पवार, त्रिशीला कांबळे, संजय उबाळे, आनंद किर्ते, संगीता नेहते, श्रद्धा जाधव, लेखा नवरे, अर्चना शिंदे या कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला.
-विजय खरात
