ह.भ.प. देवदत्त परुळेकर -
आकाशात मेघ दाटू लागले की, महाराष्ट्रातील शेतकर्याच्या मनाला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. शेतात पेरणी करायची आणि मग विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या वाटेला लागायचे. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा आजही लाखो वारकर्यांना एकत्र आणते. आषाढी आणि कार्तिकी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा प्राण आहे.
समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी म्हटले आहे, “वारीला येणार्या लोकांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र.” साने गुरुजींनी पंढरपूरला ‘महाराष्ट्राचे हृदय’ म्हटले आहे. या दोन विधानांत वारीचे संपूर्ण महत्त्व सामावलेले आहे. महाराष्ट्रातील विविध जाती, धर्म, भाषा, व्यवसाय, आर्थिक स्तर आणि विचारधारा असलेले लोक एकत्र येतात, एकाच रस्त्यावर चालतात, एकाच नामाचा गजर करतात आणि एकमेकांच्या चरणी लोटांगण घालतात. जगात लोकांना विभाजित करणार्या गोष्टी अनेक आहेत; परंतु लोकांना जोडणार्या परंपरा फार थोड्या आहेत. पंढरीची वारी ही अशा जोडणार्या परंपरांपैकी एक आहे.
आज वारीची लोकप्रियता वाढत आहे. लाखो नवयुवक वारीकडे आकर्षित होत आहेत. सोशल मीडियामुळे तिची व्याप्ती जगभर पोहोचली आहे. परंतु या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच एक प्रश्न उभा राहतोकी, वारकरी, संतांनी जपलेली मूलभूत मूल्ये आपण जपत आहोत का? की केवळ बाह्य स्वरूप शिल्लक राहिले आहे? या प्रश्नाचा विचार करणे आज अत्यंत आवश्यक आहे.
वारकरी तत्त्वज्ञानाचा गाभा : समता
वारकरी संप्रदायाचा पाया आहे संत ज्ञानेश्वरांनी मांडलेला चिद्विलासवाद. या तत्त्वज्ञानानुसार संपूर्ण विश्व त्या एका चैतन्याचा विलास आहे. प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू, प्रत्येक अस्तित्व हे त्या एकाच परम सत्याचे रूप आहे.
ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
हे विश्वचि माझे घर।
ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर।
आपण जाहला ॥
तसेच ते म्हणतात,
नारायणे विश्व कोंदिले॥
जेव्हा सर्व विश्व एकाच चैतन्याने भरलेले आहे, तेव्हा जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा किंवा संपत्ती यांच्या आधारे श्रेष्ठ-कनिष्ठपणा मानण्याला काहीच जागा उरत नाही.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत।
कराल ते हित सत्य करा॥
कोणाही जिवाचा न घडावा मत्सर।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव।
सुख दुःख जीव भोग पावे॥
‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ ही ओळ वारकरी तत्त्वज्ञानाचे सार सांगते. जो भेद निर्माण करतो तो वारकरी असू शकत नाही.
वारकरी परंपरा : सर्वधर्मसमभावाची परंपरा
आजच्या काळात धर्माच्या नावावर द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसतात. अशा वेळी वारकरी संतांचा इतिहास आपल्याला महत्त्वाचा धडा शिकवतो.
वारकरी संतांनी कधीही कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. उलट त्यांनी प्रत्येक धर्मातील चांगुलपणा स्वीकारला. त्यांच्या दृष्टीने देवाचे नाव बदलले तरी देव बदलत नाही.
संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात अत्यंत सुंदर शब्दांत म्हटले आहे,
अल्ला देवे अल्ला दिलावे।
अल्ला दारू अल्ला खिलावे॥
अल्ला बिगर नाही कोय।
अल्ला करे सोई होय॥
या काही ओळींमध्ये तुकोबा एक मोठा संदेश देतात. परमेश्वराला कोणी अल्ला म्हणो, राम म्हणो, विठ्ठल म्हणो किंवा हरि म्हणो, सत्य एकच आहे.
वारकरी परंपरेत संत कबीर, शेख महंमद, लतीफशाह यांसारख्या मुस्लीम संतांना सन्मानाचे स्थान आहे. तुकोबा “पवित्र ते कुळ पावन तो देश” या अभंगात म्हणतात,
कबीर मोमीन लतीफ मुसलमान।
सेना न्हावी जाण विष्णुदास॥
तुकोबांच्या या एका ओळीत धार्मिक सहिष्णुतेचा संपूर्ण इतिहास सामावलेला आहे.
संत शेख महंमद तर म्हणतात,
शेख महंमद अविंध।
त्याचे हृदयी गोविंद॥
जन्माने मुसलमान असूनही शेख महंमद वारकरी परंपरेतील अग्रगण्य संत बनतात. कारण, वारकरी परंपरेत जन्माला नव्हे, तर भक्तीला महत्त्व आहे.
आज जर कोणाच्या धर्माबद्दल द्वेष निर्माण केला जात असेल, तर तो वारकरी संतांच्या शिकवणीच्या पूर्ण विरोधात आहे.

संतांची मांदियाळी : समतेचा जिवंत पुरावा
वारकरी संप्रदायाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने भक्तीची दारे सर्वांसाठी खुली केली.
तुकाराम महाराज म्हणतात,
पवित्र ते कुळ पावन तो देश।
जेथे हरिचे दास जन्म घेती॥
आणि पुढे ते विविध समाजघटकांतील संतांची नावे घेतात,
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार।
धागा हा चांभार रोहिदास॥
कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू।
भजनी अभेद हरिचे पायी॥
चोखामेळा बंका जातीचा महार।
त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी॥
हा अभंग म्हणजे, सामाजिक समतेचा जाहीरनामा आहे.
आपण संतांना पुन्हा जातीत विभागत आहोत का?
वारकरी परंपरेने संतांना जातीच्या चौकटीतून मुक्त केले. पण आज काही ठिकाणी संतांना पुन्हा जातीय चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न होताना दिसतो.
चोखामेळा फक्त एका समाजाचे नाहीत. जनाबाई फक्त स्त्रियांच्या नाहीत. गोरा कुंभार फक्त कुंभार समाजाचे नाहीत. शेख महंमद फक्त मुस्लीम समाजाचे नाहीत. ते सर्व महाराष्ट्राचे आणि मानवतेचे संत आहेत.
जर दिंड्या, धर्मशाळा, नेतृत्व आणि संतांची स्मृती या सर्व गोष्टी जाती आणि धर्माच्या आधारावर विभागल्या गेल्या, तर ती वारकरी परंपरेची प्रगती नसून अधोगती ठरेल.
स्त्रीसंतांचा गौरव आणि आजची आव्हाने
मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई, निर्मळाबाई, कान्होपात्रा या संत स्त्रियांनी वारकरी परंपरा समृद्ध केली.
अशा परंपरेत काही ठिकाणी महिलांना कीर्तन करण्यास, वीणा धरण्यास किंवा नेतृत्व करण्यास विरोध होतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
ज्या परंपरेने सातशे वर्षांपूर्वी स्त्रियांना आध्यात्मिक समानता दिली, त्या परंपरेत आज असमानतेला स्थान असू नये.
पंढरीची वारी : एक तपश्चर्या
वारी म्हणजे केवळ चालणे नाही. ती आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे.
संत जनाबाई म्हणतात,
विवेकाची पेठ।
उघडी पंढरीची वाट॥
वारीत चालताना प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवे,माझा राग कमी झाला का? लोभ कमी झाला का? दुसर्या धर्माबद्दल, जातीबद्दल, विचारांबद्दल असलेला द्वेष कमी झाला का?
जर उत्तर “होय” असेल तरच वारी यशस्वी झाली, असे म्हणता येईल.
बाजारयुगातील वारी
आज वारीला मोठी प्रसिद्धी मिळत आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण प्रसिद्धीबरोबर बाजारही येतो.
भजनापेक्षा सेल्फी, साधनेपेक्षा प्रदर्शन, नामस्मरणापेक्षा प्रसिद्धी यांना महत्त्व मिळू लागले तर वारीचा आत्मा धोक्यात येईल.
वारीची लोकप्रियता वाढावी; पण तिचा साधेपणा, सामूहिकता आणि आध्यात्मिकता टिकली पाहिजे.
कीर्तन : भक्ती की व्यापार?
संतांनी कीर्तनाला समाजप्रबोधनाचे माध्यम मानले.
तुकाराम महाराज म्हणतात,
देती घेती नरका जाती।
संत एकनाथ महाराज सांगतात,
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी। इतरा न कराव्या॥
कीर्तनातून भक्ती, विवेक, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री-पुरुष समानता आणि बंधुभाव यांचा प्रचार व्हायला हवा.
जर कीर्तनातून धर्मद्वेष, जातीय द्वेष किंवा अंधश्रद्धा पसरवल्या जात असतील, तर ते संतविचारांच्या विरोधात आहे.
भक्ती म्हणजे काय?
ज्ञानेश्वर माउली भक्तीची अत्यंत सुंदर व्याख्या करतात.
जे जे भेटे भूत।
ते ते मानिजे भगवंत।
हा भक्तियोग निश्चित।
जाण माझा॥
ही व्याख्या अत्यंत क्रांतिकारक आहे. समोर भेटणार्या प्रत्येक जीवामध्ये देव पाहणे, त्याच्याशी प्रेमाने वागणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणेहीच खरी भक्ती.
वारकरी मूल्यांच्या पुनर्जागराची गरज
आज समाजात जातीयता, धार्मिक ध्रुवीकरण, अंधश्रद्धा, उपभोगवाद आणि स्पर्धा वाढताना दिसते. अशा काळात वारकरी संतांची शिकवण अधिकच महत्त्वाची ठरते.
समता, बंधुभाव, सर्वधर्म समभाव, स्त्री-पुरुष समानता, विवेक, श्रमप्रतिष्ठा, साधेपणा आणि करुणा ही वारकरी परंपरेची खरी ओळख आहे.
वारी टिकवायची असेल तर तिचे केवळ बाह्य स्वरूप जपून चालणार नाही. तिचा आत्मा जपावा लागेल. संतांचे अभंग गाण्याइतकेच त्यातील मूल्ये जगावी लागतील.
आज गरज आहे ती वारकरी मूल्यांच्या पुनर्जागराची.
संत तुकाराम महाराजांचा संदेश आजही तितकाच समर्पक वाटतो,
वर्ण अभिमान विसरल्या जाती।
एकमेका लोटांगणी जाती॥
आणि संत ज्ञानेश्वर माउलींची प्रार्थना आजही मार्गदर्शक ठरते,
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात॥
तसेच तुकोबांची ही ओळ आपल्याला पुढील वाट दाखवते.
एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ॥
हीच वारकरी परंपरेची ओळख आहे.
हीच पंढरीच्या वारीची खरी शिकवण आहे.
आणि हाच वारकरी मूल्यांच्या पुनर्जागराचा मार्ग आहे.
-ह.भ.प.देवदत्त दिगंबर परुळेकर
संपर्क : ९४२२०५५२२१
