-
हिंदू धर्मात जात हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या जातिव्यवस्थेविरोधात अगदी चार्वाक, बुद्ध, नानक, कबीर, बसवेश्वर, तुकाराम यांच्यापासून आधुनिक काळातील म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी अथक प्रयत्न करूनही हिंदू समाजातील बहुसंख्य व्यक्ती आधुनिक काळाच्या वेगवेगळ्या कालखंडातील सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थित्यतरानंतरही जातीशी अतिशय घट्टपणे जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचे सामाजिक व्यवहार त्यांच्या जातीशी घट्टपणे बांधले गेलेले आहेत. या बांधिलकीचे वाईट परिणाम आज अनेक जातसमाजांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मागासलेपणात भोगावे लागत आहेत. पण त्याविरोधात जातिअंतर्गत विवेकी चिकित्सा करत विधायक व कृतिशील संघर्ष करून डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मानणारा समाज निर्माण व्हावा असे मानणारे अनेकजण आहेत. त्यापैकी धनगर, नाभिक, परीट, आगरी, माळी, शिकलगार समाजाच्या कार्यकर्त्यांची मनोगते आम्ही या परिसंवादाच्या निमित्ताने देत आहोत. त्यांनी आपल्या मनोगतात समाजाला असलेला पुरोगामी वारसा आणि त्या बाबतची आजची परिस्थिती, विवाह, जन्म, मृत्यू, सामाजिक बहिष्कारासंदर्भात जात्यांतर्गत पाळल्या जात असलेल्या अन्यायी रूढी, चालीरीती, परंपरा यांना केलेला विरोध व त्यांना दिलेले कालसुसंगत पर्याय, आंतरजातीय विवाह, पोटजातीतील परस्पर संबंध, जातिअंताच्या दिशेने केलेले प्रयत्न, स्त्रियांचे स्थान या संदर्भात चर्चा केलेली आहे. – संपादक मंडळ


