-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तासगाव शाखेच्या वतीने वासुंबे (ता. तासगाव) येथील महिला सुलोचना सुदामा माळी यांना अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जटमुक्त केले. या महिलेस गेल्या दहा वर्षांपासून चार फूट लांबीच्या जटा निर्माण झाल्या होत्या. त्याचा भयंकर त्रास त्यांना होत होता, पण देवीच्या कोपाच्या भीतीने त्या जटा काढायला तयार नव्हत्या. अंनिस कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन, समुपदेशन करून त्यांना जटामुक्त केले.
वासुंबे गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असणारे रणजीत ठाकूर यांनी तासगाव अंनिसचे कार्याध्यक्ष अमर खोत यांना वासुंबे गावातील एका महिलेचे जटेमुळे आरोग्य बिघडले असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच अमर खोत आणि प्रा. वासुदेव गुरव यांनी महिलेच्या घराला प्रत्यक्ष भेट दिली. अंनिस कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन व समुपदेशन केले. डोक्यात आलेली जट आणि देवी यांचा काहीही संबंध नाही, असे सांगितले. अंनिसच्या महिला विभागात धडाडीने काम करणार्या सुजाता म्हेत्रे, नूतन परीट, ऋतुजा खोत व रेखा गुरव यांनी महिलेला जटमुक्त केले. या वेळी रामचंद्र माळी, सागर माळी, प्रमोद म्हेत्रे, वासुदेव गुरव, अमर खोत उपस्थित होते.
