अंनिवा -

(शहादा) ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी भाज्या चिरू नये; त्याचप्रमाणे काही खाऊ नये, पाणी पिऊ नये, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आजही मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या सर्व अंधश्रद्धांना झुगारून येथील अनेक महिला, तरुणी यांनी ही सर्व कामे जाहीरपणे करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न केला. ‘कुलकर्णी रुग्णालया’च्या छतावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. अलका कुलकर्णी, ‘अंनिस’चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्यध्यक्ष रवींद्र पाटील, शाखा उपाध्यक्ष संगीता पाटील,अशोक पाटील, अॅड. साजिद शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हे आधुनिक युग मानले जाते, तरीही समाज मात्र अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांच्या आहारी गेलेला आपल्याला आढळून येतो. त्यातील सूर्यग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा आजही पाळल्या जातात. ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी भाज्या, फळे न चिरणे, चिरल्यास ओठ फाटलेले बाळ जन्माला येते, अंघोळ न करणे, पाणी न पिणे, पाणी न भरणे, जेवण न करणे, झोपले तर कूस न बदलणे अशा एक ना अनेक अंधश्रद्धा समाजात प्रचलित आहेत.
या सर्व अंधश्रद्धांना फाटा देण्यासाठी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहादा शाखेच्या वतीने सूर्यग्रहण बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सौरचष्मे उपलब्ध करून देण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी वरील अंधश्रद्धा मोडीत काढून प्रत्यक्ष कृती करून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
यात अंकिता जाधव, गायत्री महाजन, पूजा महाजन, रेवती बोधरे, समीरा सावळे, सानिया सावळे, विनया सावळे, नूपुर पाटील यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल गवळे, हितेश ईशी, हिम्मत चव्हाण, प्रदीप केदारे, विजय बोधरे, राजेंद्र निकुंभे, श्रीकांत बाविस्कर, शंकर महाजन आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.