-

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पर्यावरणपूरक उपक्रम
मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातील शाखा ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबवित आहेत. आता ‘विसर्जित गणेश मूर्ती दान करा’ या उपक्रमाप्रमाणे या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा पर्यावरणपूरक उपक्रम आता सार्या महाराष्ट्रभर अनेक मंडळे, संस्था, शाळा, गृहनिर्माण सोसायट्या ‘अंनिस’ च्या सहकार्याने किंवा स्वतंत्रपणे राबवत आहेत. त्यातील काही उपक्रमाचे वृत्तान्त आम्ही देत आहोत.
पालघर
माझं संविधान माझा अभिमान, पालघर आणि महाअंनिस, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने
होळी करा लहान, पोळी करा दान
एकीकडे गल्लीगल्लीत अगणित लाकडांच्या होळ्या धडाधड पेटत होत्या, तर दुसरीकडे पालघर अंनिसचे कार्यकर्ते गरजूना पोळ्या वाटत होते. हे दृश्य होते पालघर येथे माझं संविधान माझा अभिमान, पालघर आणि महा अंनिस, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने होळी करा लहान, पोळी करा दान ह्या उपक्रमातील!
या उपक्रमांतर्गत २ लेबर कॅम्प (र्नीवळे ीळींश, आरोग्यम्च्या समोर व वळण नायावर नशपळींह कशळसहीीं ीळींश) येथील कामगार आणि त्यांच्या लहान मुलांना पुरणपोळींचे वाटप करण्यात आले. तसेच टेंभोडे फुले नगर येथील रहिवाशांच्या घराघरात पुरणपोळ्यांचं वाटप करण्यात आलं. याशिवाय नृत्यांगण डान्स अकॅडमीच्या राहुल तांडेल यांच्या माध्यमातून मुलांसाठी आणलेल्या कपड्यांचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पत्रकार नरेंद्र पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पोळीचे दान करण्याच्या आव्हानाला लोकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एकूण ३५६ पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहर्यावर आनंदाचे हास्य फुलले. हा उपक्रम पालघरमध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आला.
राजगुरूनगर
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने, राजगुरूनगरमध्ये होळीत नैवेद्य म्हणून टाकून जाळल्या जाणार्या शेकडो पोळ्या वाचवून त्या, राजगुरूनगर नजिकच्या कातकरी वस्तीवर नेऊन वाटल्या.
‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा पर्यावरणपूरक लोकप्रिय उपक्रम गेली २७ वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राजगुरूनगरच्या वतीने राबवला जातो आणि त्याला शहरामधील पर्यावरणप्रेमी नागरिक उत्साहाने प्रतिसाद देतात. शहरातील तिन्हे वाडी रोडवरील लक्ष्मी नगर, स्वामी समर्थ कॉलनी, तोरणा सोसायटी, शिवनेरी रायगड सोसायटी, अमिरा प्रॉपर्टी इ. सोसायटीमधील बाळासाहेब बोराडे, शामराव बडगीर, बाळासाहेब तांबडे, शिवाजी वाळुंज, रामदास लोकरे, अतुल घुमटकर, श्रीकांत दगडे, विजय बावके, बिपिन गुजराती, विठ्ठल राऊत, कुलदीप नांगरे, सिद्धार्थ नागदिवे, हृषीकेश सैद, उल्हास चांभारे, अॅड. साधना बाजारे, अलका जोगदंड, डॉ. शीतल पवार, पौर्णिमा देव्हारकर, दीपक मोरे, शीतल श्रीमाली, जयाशेठ बलदोटा, नवनाथ लोंढे इत्यादी कार्यकर्त्यांनी दिवसभर फिरून ५०० पेक्षा जास्त पोळ्या ज्या होळीत टाकल्या जाणार होत्या त्या गोळा केल्या. त्याचबरोबर २० किलो गूळ, तीन किलो जिलेबी जमा केली आणि ते सर्व खाद्यपदार्थ रात्री नऊ वाजता कातकरी वस्तीवर नेऊन दिले, तेव्हा ताटातील जिलेबी, पुरणपोळ्या, गूळ, ताट भरून गोडधोड अन्न पाहून कातकरी बांधवांच्या चेहर्यावर पौर्णिमेच्या चंद्रासारखंच समाधान झळकलं ते पाहून आनंद वाटला. यापुढे दरवर्षी दिवाळीत कपडे आणि फराळ वाटप करण्याचा निर्णय कार्यकर्त्यानी घेतला आहे. तसेच राजगुरुनगरच्या आसपास वृक्षारोपण करून झाडं जगवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी एकमताने व्यक्त केला.
पुणे शहर
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम पुणे शहर शाखेतर्फे दोन ठिकाणी राबविण्यात आला. पुणे रेल्वे स्टेशन येथे ५०० पोळ्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, वसंत कदम, शीला परळीकर, रोहित एरंडे, नागेश कवडे, आनंद कांबळे, प्रकाश सोनावणे इ. कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच कर्वेनगर येथे पोळ्या गोळा करून त्या सिंहगड रोड येथील झोपडपट्टीत वाटण्यात आल्या. यात अनुराधा काळे, अनिल वेल्हाळ, अनिल तिकोनकर हे कार्यकर्ते सहभागी झाले होते. वर्तमानपत्रांनी आपल्या कार्याची दखल घेऊन त्यास चांगले प्रसिद्धी दिली.
डोंबिवली
महा. अंनिस, डोंबिवली शाखेच्या वतीने यंदा ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा सुंदर उपक्रम राबवण्यात आला. परंपरेनुसार अनेकजण होळीच्या ज्वाळांमध्ये पुरणपोळ्या नैवेद्य म्हणून अर्पण करतात. मात्र, त्याऐवजी त्या गरजू लोकांच्या पोटात जाव्यात, त्यांना सणाचा आनंद मिळावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी विद्या मंदिर येथे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने ५०० हून अधिक पुरणपोळ्या गोळा करण्यात आल्या. याच वेळी विद्यार्थ्यांना वृक्षतोडीचे दुष्परिणाम समजावून सांगत, होळी फक्त पालापाचोळा, भंगार आणि कचर्यानेच करावी, हा संदेश दिला. दुसर्या दिवशी, या पुरणपोळ्या टिटवाळा येथील अनाथाश्रम, कल्याणमधील डंपिंग ग्राउंड परिसरातील कचरा वेचक आणि बांधकाम मजुरांच्या वस्त्यांमध्ये वाटल्या. सणादिवशी गोडधोड खायला मिळाल्याने तिथल्या लोकांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. काही ठिकाणी रस्ता नसल्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पायी जाऊन गरजूंपर्यंत पोळ्या पोहोचवल्या. त्यांचे आभार मानताना डोळ्यात पाणी आले.
या कार्यात श्रीप्रसाद खुळे, विनोद जगताप, राजेश माने, प्रज्ञा वाघमारे, किरण तोंडवळकर, राजा पवार या कार्यकर्त्यांनी व इतर सर्व स्वयंसेवकांनी अतिशय मोलाचे काम करत मोठे योगदान दिले. असा उपक्रम दरवर्षी राबवला जावा हीच सदिच्छा या सर्व कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवकांनी व्यक्त केली.
रहिमतपूर
होळीनिमित्त काल गावामध्ये ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या ठिकाणी पोळी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा रहिमतपूरतर्फे बॉस ठेवण्यात आले होते. हा उपक्रम गेले बारा वर्षांपासून राबवला जातो. ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ या उपक्रमाला गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेळी पोळी गोळा करताना आलेला अनुभव असा की काही कारणामुळे पोळी गोळा करण्याचे बॉस उशिरा ठेवले गेले तर गावातील विविध भागातील लोकांनी फोन करून बॉस का ठेवला नाही, याची चौकशी केली. बॉस ठेवल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ६०० ते ७०० पोळ्या गोळा झाल्या व त्या गावातील गरजू घटकांना वाटण्यात आल्या.
या वेळी प्रबोधनात्मक माहिती देण्यासाठी आपले कार्यकर्ते प्रवीण माने यांची कन्या नायरा माने हिने होळी जवळ गेल्यावर पोळी गोळा करताना लोकांना सांगितले की, आपण पर्यावरणपूरक होळी साजरी केली पाहिजे, झाडांची वृक्षतोड करून होळी करण्यापेक्षा आपल्या शेजारची स्वच्छता करून कचरा गोळा करून पेटवून ही होळी साजरी केली, तर दोन फायदे होतील. एकतर आपला परिसर स्वच्छ होईल आणि दुसरे, आपल्याला हा सण साजरा करण्याचा हेतूही साध्य होईल आणि ही जी पोळी आगीत जाऊन राख होण्यापेक्षा ती जेव्हा एखाद्या गरजूला मिळाली तर तो घटक किती खूश होतो आणि त्याच्या चेहर्यावरचे हसू हे भरपूर आनंद देणारे असते. नायरा माने ही ४ थी मध्ये शिकते व गेली ३ वर्षे आमच्याबरोबर या कामात आम्हाला मदत करत असते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी शिंदे, शंकर कणसे, प्रवीण माने, मोहसिन शेख, नायरा माने, भगवान माने, मधुकर माने, नाना राऊत सर, युवा नेते गणेश माने, झाकिर आत्तार या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.