प्रा. एल. बी. पाटील -

ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर बिंबिसार राजाच्या राजवटीत वसलेली ही जात किंवा समाज आगरी म्हणून येथे स्थिरावला असून तो आपल्या समाजाची इतर जातीपाती किंवा समाजापेक्षा काहीशा वेगळ्या रितीभातीत वापरून आपले वेगळेपण जपत आला आहे. त्याला आपण त्या समाजातील श्रद्धा किंवा तीच श्रद्धा त्या समाजाला अहितकारक वाटू लागली की अंधश्रद्धा मानतो.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे पार टोकाचे अंतर नसले तरी अंधश्रद्धेतून समाजाचे अहित अधिक होत असते असे अन्य समाजांना जाणवते. त्याचवेळी स्वतःच्या समाजाला ते अहित जरी काहींना जाणवत असले, तरी त्या अंधश्रद्धेला फेकत नसतात. उलट घट्ट धरून जपतात तर त्याच समाजातील काही जण समाजाला होत असलेले अहित लक्षात घेत आक्रमक बनून त्या अंधश्रद्धा तोडू पाहतात.
मागील १५ वर्षे आधीपासून मी ज्या अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवित आहे, त्याबद्दल येथे मी लिहिणार आहे. ती अंधश्रद्धा म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला विधवेला विद्रूप केले जाणे. हे फार पूर्वीपासून आहे हे निश्चित. पण ते चुकीचे असून योग्य आणि बरोबर केले जावे यासाठी माझा हा अतिशय लहान प्रयत्न आहे, जो अनेकांच्या टीकेला सामोरा जात आहे. गेली १५ वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही ही प्रथा समाजातून केवळ एक दोन टकेच कमी झाल्याचे मला जाणवते.
विधवेला विद्रूप केले जाते म्हणजे जी स्त्री पूर्वीची लग्नाआधी कुमारिका जिला लग्नविधीत गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, पायात चांदीची अंगठ्यात नि बोटात जोडवी, बोटात सोन्याची अंगठी, कपाळावर लाल कुंकू लावून सौभाग्यालंकारात मढविले जाते. याला नवर्या विषयीच्या गर्वाचे, स्वाभिमानीचे प्रतीक असे समाजात मानले जाते. त्यामध्ये पावित्र्य आहे अशीही समाजाची श्रद्धा असते. मग नवरा मेला, आता तिच्या अंगावरची आभूषणे उतरवा, ती देखील ओरबाडून! तिला विद्रूप करा! असे करताना मग तुमचे पावित्र्य, श्रद्धा कुठे गेली? पतीच्या मृत्यूपर्यंत ती जर सर्व अलंकारांनी सुंदर आणि पवित्रच असेल ती दुसर्या क्षणी अपवित्र का? आणि कशी? आभूषणे उतरवून एका सशत स्त्रीला समाज दुर्बल करतो आहे, असे सांगून ही समाजाची श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे, असे पटविण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
घरातील कुणालाही ते दुर्बल करणे आवडत नसते, पण इतरांनाच हवे म्हणून एखाद्या अन्य विधवेमार्फत किंवा नात्याव्यतिरित इसमाकडून ती आभूषणे उतरवून टाकली जातात. त्याला मी ओरबाडून काढणे मानतो. कारण प्रत्येक आभूषण काढताना ती रडत असते, किंचाळत असते, त्यालाच मी आभूषणे ओरबाडण्यातले दुःख किंवा वेदना मानतो. जी समाजाचे अहित असलेली अंधश्रद्धा असते. तिची सर्व शक्ती काही मिनिटांतच संपविली जाते ती केवळ अंधश्रद्धेमुळेच !
मी त्याबाबत काही ग्रामस्थ, ग्रामपंचायती, प्रतिनिधी, संस्थांना पत्रकांतून आणि भिंतीवर, पाईपलाईनवर ‘पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे सौभाग्यालंकार उतरवू नयेत’, अशी घोषवाये लिहून माझ्या विचारांचा प्रचार, प्रसार चालविलेला आहे.
माझ्या या अडखळणार्या धडपडीला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. भेंडखळ, पागोटे, सावरखार या गावी प्रतिसाद देणार्या घटना घडल्या आहेत. पत्रकार सूर्यकांत पाटील, कवी दीनानाथ पाटील (दोघेही पेणचे) यांनीही मला साथ देऊन सहकार्य केले आहे. एकमात्र खरे आहे की कुणीही आमच्या विचारांना प्रत्यक्ष समोरासमोर विरोध करीत नाहीत. मात्र, पुरुष मंडळी जाहीर संमती देत नाहीत किंवा आपल्या घरातील माणसांपुढे स्वतःची भूमिका मांडत नाहीत. त्यांनी जर अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली तर मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे. हा एक प्रयत्न आहे. प्राचीन रूढी विरुद्ध उभे राहणे एवढे सोपे नसते, पण मी ते करणार आहे.
– रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील (उरण)
संपर्क : ८८५०२ ८७४८६