अंनिवा -
या गावचे सरपंचपद स्वीकारले की मृत्यू होतो, ही तिथे खोलवर रुजलेली अंधश्रद्धा. यापूर्वी एकदा नाही, तर तब्बल चार वेळा असे घडल्याने ती गावातल्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून गावचे सरपंचपद रिक्त आहे. नुकतीच गावची निवडणूक झाली, सरपंचनिवडीचा कार्यक्रमही जाहीर झाला. गावातील या भीतीतून हे पद वीस वर्षांनंतरही पुन्हा रिक्त राहणार, असे वाटत असतानाच एक महिला सदस्य पुढे आली आणि तिने या अंधश्रद्धेला छेद देत सरपंचपद स्वीकारण्याचे धाडस दाखवले. महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावची ही कहाणी, तर या अंधश्रद्धेला मूठमाती देणार्या महिला सदस्याचे नाव आहे, शीतल विकास राजपुरे! पाचगणीजवळील राजपुरी या गावात मागील पाच कार्यकारिणीच्या कालखंडात तब्बल वीस वर्षे हे पद रिकामे आहे. या काळात सरपंचपदाची माळ गळ्यात पडलेल्या चारही सरपंचांचा पदावर असताना मृत्यू झाला. या घटना सलग झाल्याने या पदावर गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी भीतीच या गावात खोलवर रुजलेली आहे. यामुळे गेली वीस वर्षे हे सरपंचपद रिकामे आहे. गावचे उपसरपंचच या काळात गावचा कारभार सांभाळतात.
नुकतीच राजपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक पुन्हा झाली. सदस्यांची निवडही झाली. या वेळीही हे सरपंचपद स्वीकारण्याबाबत कुणीही तयार होत नव्हते. परंतु या अंधश्रद्धेबाबत गावातील तरुण एकत्र आले. त्यांनी या भीतीला मूठमाती देण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी प्रथम गावात बैठका घेत ग्रामस्थांच्या मनातील भीती घालविली. मग निवडून आलेल्या सदस्यांचेही मनोबल वाढवत या पदासाठी पुढाकार घेण्यास प्रोत्साहित केले. दरम्यान, यंदा गावचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे ही लढाई यंदा अधिक अवघड होती. मात्र या लढ्यात शीतल राजपुरे या महिला सदस्य धाडसाने पुढे आल्या आणि त्यांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यांच्या या पुढाकारास सर्व सदस्य, गावकर्यांनी पाठिंबा दर्शवला आणि तब्बल वीस वर्षांनंतर राजपुरी गावाला सरपंच मिळाला! तर उपसरपंचपदी शंकर आनंदा राजपुरे यांची निवड झाली आहे. राजपुरे यांची सरपंचपदी निवड होताच गावात जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. गेली वीस वर्षे गावात रुजलेल्या अंधश्रद्धेला मूठमाती देत या महिलेने दाखवलेल्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील या लढ्याची माहिती समजातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी देखील या गावास भेट देऊन संबंधित महिला सरपंचांचे कौतुक केले.