मुनीर शिकलगार -

उठाओ समशेर, कर दो वार,
होगा दुश्मन का संहार,
तेज तर्रार, होगी धार,
औजार चमकायेगा शिकलगार!!
इतिहास व पार्श्वभूमी
अशी एके काळी राजेराजवाडे, संस्थानिक, सेनापतींकडे राजाश्रय असलेली ही शिकलगार जमात. ही लोखंडी वस्तूशी संबंधित लोहार समूहातील जात आहे. शस्त्रांना धार लावणे, हत्यारांची निगा राखणे, युद्धकाळात अवजारांना सज्ज ठेवणे अशी कामे शिकलगार जमातीकडे होती. ही जमात सतत भटकंती करीत असली, तरी स्वत:ला राजपूत वंश व घराण्याशी संलग्न समजत असते. त्यानंतर राणा प्रताप, आदिलशाही, निजामशाही, मुघल, बरीदशाही, कुतुबशाही, मराठे, पेशवे, टिपू सुलतान, हैदराबादचे निजाम व इतर वतनदार यांच्या पदरी होते. हिंदू, शीख या धर्मात असलेल्या जमातीने इस्लामप्रणीत राज्यकर्त्यांमुळे इस्लाम कबूल केला.त्यामुळे ही जमात सध्या तिन्ही धर्मात आढळते. जरी धर्म बदलले तरी जात व काम तेच राहिले. दैन्यावस्था तशीच राहिली.
पानिपत युद्धकाळात दख्खनेतून उत्तरेकडे मराठा, पेशवे सैन्याबरोबर शिकलगार होते, असा उल्लेख आढळतो. परंतु इंग्रज, पोर्तुगीज व डचांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर पारंपरिक तलवार, भाले, बरची, वाघनखे, सुरा अशी हत्यारे कमी होऊन त्या जागी दूर पल्ल्यावरून मारा करण्यासाठी तोफ, बंदूक, दारूगोळा, हातबॉम्ब, स्फोटके यांचा वापर होऊ लागला. तेव्हा या शिकलगारांचा राजाश्रय संपला. त्यानंतर १८५७ चे बंड, राजे उमाजी नाईकांची चळवळ, तंट्यामामा भिल्ल तसेच इतर छोट्या मोठ्या सशस्त्र आंदोलनाला मदत केल्याने व सहभाग घेतल्याने समस्त शस्त्रे बनवणार्या घिसाडी, लोहार, कट्यारी, शिकलगारांच्या मागे इंग्रजांचा ससेमिरा लागला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये सामील झाल्याने सांगली, सातारा जिल्ह्यातील काही शिकलगार जमातीच्या कार्यकर्त्यांना कारावास भोगावा लागला होता. त्यामुळे कारवाईच्या भयापोटी समस्त कारागीर समूह देशभरात मिळेल त्या ठिकाणी व अनुकूल असलेल्या जागी परागंदा झाला.
जीवनशैली
१८७१ च्या सराईत जमाती कायद्यामुळे तर शिकलगार समूह अधिकच भेदरला. त्यामुळे पूर्वी समूहाने, गटागटाने राहणारा हा समूह सुटा, एक-एकटा कुटुंब करून राहू लागला व चरितार्थ चालवू लागला. त्यानंतर शेती अवजारे, घरगुती वस्तू तयार करणे, अवजारांना पाणी देणे, शेवटणे व धार लावणे अशी गावगाड्यातील बलुतेदारीची कामे करू लागला. त्याचबरोबर हजामतीची कात्री, वस्तारा, कापडाची कैची, कातडे कापण्याची रापी, मटणाचा सत्तूर, सुरी, चाकू, दगड फोडण्यासाठी पहार, छिन्नी यांना धार लावण्याचे काम सुरू केले. हळूहळू औद्योगिकीकरण व शहरीकरण होऊ लागल्याने बर्याच शिकलगार कुटुंबांनी मुंबई, पुणे येथे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिक पद्धत अनुभवातून शिकून घेतली. त्यामुळे वेल्डिंग, ग्राईंडिंग, ड्रिलिंग या मशिनद्वारे लोखंडी वस्तू तयार करणे, बांधकाम संबंधित कामे, शेती अवजारे अशी कामे सुरू केली. कोणतेही प्रशिक्षण, पदवी न घेता फक्त अनुभव, हुशारी व चिकाटीने ही फॅब्रिकेशन व्यवसाय भरभराटीला आणला. त्यानंतर या ज्ञानामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करून सजावटीसाठी वस्तू, फर्निचर, द्राक्षबागेत लागणार्या कातर्या, कापडाची कैची, बैलगाडी तयार करणे, शेती मशागतीची साधणे, चारा कटर, कूलर, देवाच्या पालख्या तयार करून आपला ब्रँड तयार केला.
प्रयोग
हे उपजत कौशल्य जोपासत असताना खुले आर्थिक धोरण, औद्योगिकीकरण व बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली. टाटा, गोदरेज, किर्लोस्कर, मेनन, कल्याणी, इतर फौंड्री उद्योग यामुळे फॅब्रिकेशन, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग वर्कशॉप्सला उतरती कळा लागली. एकेका गावात चार ते पाच युनिट असल्याने उत्पन्न स्रोत कमी झाले. परंतु उपक्रमशील व प्रयोगशील शिकलगार जमातीने त्यांना असलेल्या भटके विमुक्त जमातींचे (छढ-इ-२१) आरक्षणाचा लाभ घेतला. यामुळे शिक्षण, नोकरीतील प्रमाण वाढले. आज समाजात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, महसूल विभाग, बँक, शिक्षक, शासकीय सेवा, खाजगी कंपन्या, कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी मिळाली आहे. वकील, डॉटर, प्राध्यापक, इंजिनिअर, सी. ए., पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधक, पत्रकार असे अनेक या जमातीचे लोक आहेत.
या जमातींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. यामुळे विचार, दृष्टिकोन व जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला. शहरीकरणामुळे व्यापक संपर्क व संबंध निर्माण झाले. याच कारणांमुळे पूर्वी शिकलगार जमातींमध्ये अंतर्गत होणारे रोटी-बेटी व्यवहार तांबोळी, अत्तार, शेख, मणेर, सुतार, पटवेगार, सतारमेकर अशा इतर आडनावांत होऊ लागले.
धार्मिक जोपासना
इस्लाममध्ये जातिव्यवस्था नाही असे मानले जाते. परंतु भारतामध्ये शिया व सुन्नी हे पूर्वीचे भेद असताना पुन्हा अश्रफ, अजलफ व अर्जल अशी जात, जमात, बिरादरी, वर्णाची उतरंडीची भर पडली. भारतातील बहुसंख्य मुस्लीम हा मूलनिवासी बहुजन समाजातील असल्याने त्याने धर्मांतर केले, तरी त्याची जन्माधारित जात कायमस्वरूपी चिकटली आहे. त्यामुळे मुस्लिमांमध्ये ते आतापर्यंत कट्टरतेने पाळले जात होते. मुस्लिमांमध्ये मशीद, प्रार्थनास्थळे व रोटी व्यवहारात जातीयता पाळत नसले, तरी बेटी व्यवहार मात्र निषिद्ध मानले जात होते. ग्रामीण भागात याबाबत अजूनही उदारमतवाद, लवचिकता दिसून येत नाही.
समाजातील विचारवंत, अभ्यासक, सुशिक्षित वर्ग समाजापासून दूर असल्याने त्यांची उणीव, गैरहजेरी मूलतत्त्ववादी, पुराणमतवादी, दैववादी, मुल्ला-मौलवी भरून काढत आहेत. त्यांनी गोरगरीब, कष्टकरी सर्वसामान्य लोकांना ७२ हूर, जन्नतचे आमिष व दोजकची भीती दाखवून कर्मकांडात अडकवून ठेवले. त्यांना पुरते प्रतिगामी बनवून ठेवले आहे. समाजात आधुनिकता, नवविचार, धर्मचिकित्सा, विवेकवाद याकडे अगदी संथ गतीने वाटचाल आहे. समाज विज्ञानाची सृष्टी अनुभवत आहे, उपभोग घेत आहे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
सांस्कृतिक
शिकलगार जमातींमध्ये पारंपरिक रमजान ईद, बकरी ईद, मोहरम, पैगंबर जयंती (मिलाद), शब्बे बारात हे साजरे केले जातात. त्याचबरोबर ग्यारवी, कुंडे ईद, स्थानिक पीर उर्स असे काही ऐच्छिक सण साजरे होतात. अलीकडे हैदराबाद व मुंबई येथे असलेल्या सुफी संत नुरी शाह जिलानीचे शिष्य गावोगावी आपापले धार्मिक व आध्यात्मिक प्रवचन करून दरबार भरवत आहेत.
पूर्वी बकरी ईदची कुर्बानी, उमरा व मका मदिना हज यात्रा फक्त शहरातील तालेवार, मालदार व श्रीमंत लोक करीत होते. परंतु अनुकरण व प्रतिष्ठेपोटी आता ग्रामीण, निम्न स्तरातील कुटुंब आर्थिक गोळाबेरीज करून हा विधी पार पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी वचित कुठे तरी दिसणारा नकाब, बुरखा, दाढी, टोपी, कुर्ता आता खेड्यापाड्यात, वाडी-वस्तीवर दिसून येत आहे. पूर्वी गावागावात सामोपचाराने व उत्साहाने केला जाणार्या ग्रामदैवत पिराचा उरूस याला मिळणारा बहुजन समाजाचा प्रतिसाद आता जातीयता व सामाजिक तणावामुळे घटत चालला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शिकलगार जमातीचे कुलदैवत म्हणून लाल शहाबाज कलंदर, लेंगरे, राजेबागेस्वार, कटगुण, दावलमलिक, वेजेगाव, गायकवाडसाहेब, चिंचणी असे सुफी संत पीर आहेत तर गौसपाक, निपाणी, मिरासाहेब, मिरज, कबीरबाबा, नांद्रे, वलीबाबा, आवाटी व मर्दाने गैबी पीर, कागल या तीर्थक्षेत्रावर शिकलगार जमातीची श्रद्धा आहे.
पूर्वी मुस्लीम म्हटले की, सुन्नी संप्रदाय हा एकमेव असलेले प्रमाण तबलिगी व अहलेहदिस (सलफी) या जमातीमुळे कट्टरतेकडे वाटचाल होत आहे.
परंपरा
पूर्वी पाच दिवस चालणारे विवाहसमारंभ आता धावपळीच्या युगात तीन दिवसांवर आले आहेत. यामध्ये हळद, मेहंदी, निकाह, रंगपाणी व वलिमा (न्याज) एवढ्यावर सीमित झाला आहे. तर पूर्वी मरणानंतर चाळीस दिवसांपर्यंत असणारे सुतक (दुखवटा) आता तिसरा (जिआरत) दिवस झाल्यावर संपुष्टात आले आहे.
आता मुलाच्या जन्मानंतर खतना (सुंता) व नामकरण (हकीका) एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जातात. वराकडून दहेज प्रथा कमी झाली असली, तरी वधूला देण्यात येणारी मेहेरच्या रकमेत घसघशीत वाढ झाली आहे.
शिक्षणाचे प्रमाण व कायद्याचा धाक यामुळे जरी बालविवाह कमी झाले तरी झोपडपट्टी, स्थलांतर, गरिबी व निम्न स्तरात आजही बालविवाह घडत आहेत. त्या प्रमाणात तलाक व दुबार लग्ने वाढत आहेत.
समाजसुधारणा
शिकलगार जमातींमध्ये तीस-चाळीस वर्षांपूर्वी असलेली वैयक्तिक वाद, लग्न, सोयरीक, घटस्फोट, आर्थिक देवाणघेवाण, किरकोळ तक्रारींसाठी असलेली जातपंचायत आज संपलेली आहे. त्यामुळे आज छोट्या-मोठ्या तक्रारी थेट पोलीस व न्यायालयात दाखल होत आहेत.
दरवर्षी लेंगरे (ता. खानापूर) येथे मुस्लीम शिकलगार समाजाचे वार्षिक अधिवेशन आयोजित केले जाते. या वेळी गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कर्तृत्ववान लोकांचा गुणगौरव, समाजसुधारणा व प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित केला जातो. या वेळी समस्त राज्यातील समाज एकत्र येत असतो.
सध्या शिकलगार जमातीतील पालक शैक्षणिक बाबींवर खूप संवेदनशील झालेला आहे. त्यांना पुरते पटले आहे की शिक्षणामुळेच आपल्यामध्ये परिवर्तन घडून येऊ शकते. त्यामुळे सध्या एकही ६ ते १८ वयोगटातील बालक शाळाबाह्य अथवा निरक्षर राहिलेले नाही. विशेष म्हणजे, इतर भटया जमातीप्रमाणे शिकलगार समूह कोणत्याही अघोरी रूढी-परंपरा, जाचक कर्मकांडे, कालबाह्य प्रथा अडकून न पडता सतत काळाप्रमाणे बदल स्वीकारत आहे. तंत्रज्ञान व परंपरा यातून मध्यममार्ग काढून आपली कात टाकत आहे.
अखंड भटक्या विमुक्त जमातींपैकी एकमेव शिकलगार जमात सध्या उपजीविकेसाठी भटकंती बंद करून पूर्णपणे स्थिर झालेली आहे. तसेच पका निवारा, किरकोळ रोजगार, आवश्यक नागरिकत्व दाखले व शिक्षण सुविधा उपलब्ध असणारी जमात म्हणून उल्लेख करणे आवश्यक आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिकलगार जमातीचे काही प्रतिनिधी निवडून ग्रा. पं. सदस्य, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर एवढ्या पदापर्यंत मजल मारू शकले आहेत. परंतु अद्याप विधीमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही.
अनेक महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुरू केले आहेत, त्याचबरोबर छोटे व्यवसाय व स्टार्ट अप नावारूपाला आले आहेत.
काही सुशिक्षित तरुण एकत्र येऊन आपल्या पारंपरिक व्यवसायाला फाटा देऊन वेगवेगळ्या उद्योगांत यशस्वीपणे पदार्पण करत आहेत.
सध्या लोखंडी काम, फौंड्री उद्योग, ऑटोमोबाईल हब, स्टील उद्योग यामध्ये खूप मोठी संधी उपलब्ध आहे.
भविष्यवेध
फॅब्रिकेशन व मेकॅनिकल व्यवसायात शिकलगार समूहाला शास्त्रशुद्ध कौशल्य विकास प्रशिक्षण लाभले तर खूप मोठे तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक घडू शकतात.
या समाजात आता शहरीकरणामुळे सरमिसळ होत आहे. त्यामुळे जीवनशैली बदलून वैचारिक मंथन सुरू होत आहे. शिकलगार जमातींमध्ये मुलगा-मुलगी असा भेद न करता समसमान शैक्षणिक संधी मिळत आहे.
आज इतर मुस्लीम समाज व भटके विमुक्त जमाती यांना आदर्शवत ठरेल अशी प्रगती, प्रयोग व परिवर्तन शिकलगार जमातीने केले आहे. हे मागील शंभर वर्षांचे अवलोकन केल्यास दिसून येत आहे.
– मुनीर शिकलगार, विटा, जि. सांगली
संपर्क – ९०४९० ३७६८६