श्रीपाल ललवाणी -

आपणा सर्वांना माहीतच आहे की, दि. २१, २२, २३ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात महाराष्ट्र अं.नि.स. ला पुस्तक विक्रीसाठी स्टॉल मिळाला होता. पुण्यातून आम्ही ७ कार्यकर्ते त्यासाठी दिल्लीला गेलो होतो. एका शब्दात सांगायचे तर हा अनुभव उत्साहवर्धक होता.
जसे दिल्ली येथे साहित्य संमेलन होणार असे जाहीर झाले तसे पुणे शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण जाधव यांनी आपण साहित्य संमेलनाला जाऊ, असा माझ्या मागे लकडा लावला. २०१७ साली पंजाबमधील घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाला ते गेले होते. तो अनुभव त्यांच्या गाठीशी होता. पुस्तक विक्रीसाठी स्टॉल मिळत असेल तर आपण नकी जाऊ असे मी त्यांना सांगितले. स्टॉलसाठी चौकशी केली तर स्टॉल शिल्लक नाही, एक महिन्यापूर्वीच सर्व स्टॉल बुक झालेत असे समजले. आमचा हिरमोड झाला व आम्ही संमेलनाला जाण्याचा विचार सोडून दिला. ही गोष्ट संमेलनाचे आयोजक, ‘सरहद’चे संजय नहार यांना समजल्यावर त्यांनी, ‘मी तुम्हाला स्टॉल देतो, तुम्ही माझ्याशी संपर्क साधा’, असा निरोप पाठवला. पण त्यांच्याशी संपर्क होतच नव्हता. ते अचानक अरुण जाधव यांना भेटले, तेव्हा जाधव सरांनी मला फोन करुन त्यांच्याशी संवाद साधून दिला. संजय नहार म्हणाले, “तुम्हाला स्टॉल नक्की मिळेल, तुम्ही दिल्लीला येण्याची तयारी करा.’ त्यांनी त्यांच्या चिनार पब्लिकेशनसाठी बुक केलेल्या स्टॉलपैकी एक स्टॉल दिला. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्टॉलचे पैसे भरले.
महाराष्ट्र अं. नि. स. परिवारातील ज्येष्ठ लेखिका ताराबाई भवाळकर यांची संमेलन अध्यक्ष म्हणून व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड होणे म्हणजे संमेलनावर पुरोगामी विचारांचा वरचष्मा राहणार ही गोष्ट अधोरेखित झाली.
आता दिल्लीवारीची लगीनघाई सुरू झाली. सुरुवातीला १० जण तयार झाले. पण ऐनवेळी काही जणांना शक्य न झाल्याने शेवटी आम्ही ७ जण तयार झालो. काहीही समस्या आली की ‘मै हूँ ना’ म्हणणारा अनिल वेल्हाळ, वैचारिक चर्चा करण्यापासून ओझे उचलण्यापर्यंत कोणत्याही कामास तयार असलेली जोडगोळी बाळकृष्ण लोंढे व नागेश कवडे, कधीही, कोठेही, कोणासमोरही चमत्कार प्रात्यक्षिक करण्यास तत्पर असलेला भारत विठ्ठलदास, सर्व माहिती काढून देणारे संजय मालती कमलाकर, ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण जाधव आणि मी अशी आमची मजबूत टीम तयार झाली. या सर्वांचे रेल्वे बुकिंग व दिल्लीतील निवासाची सोय हे ‘सरहद’च्या सहकार्यामुळे शक्य झाले.
यानंतर कोणती पुस्तके घेऊन जायची व कशी घेऊन जायची याचा खल सुरू झाला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांच्या विक्रीवर भर द्यायचा असे ठरले. यासाठी ‘राजहंस प्रकाशन’कडे जाऊन डॉक्टरांची सर्व पुस्तके घेतली. पुस्तके जर विकली गेली नाही तर परत घेणार का? अशी विचारणा त्यांना केली. ते म्हणाले, “पुस्तके घेऊन जा, उरलेली पुस्तके परत आणा. मगच पैशाचा हिशोब करू.” हा एक सुखद धक्काच होता. डॉ. हमीद दाभोलकर यांचे नाव सांगितल्यानेच हे सहकार्य मिळाले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तिकांचे ३० सेट आमच्याकडे होते, ते सर्व घेतले. नंतर ‘साधना प्रकाशन’कडे विचारणा केली. संपादक विनोद शिरसाट व त्यांच्या साहाय्यकांनी खूपच सहकार्य केले. डॉ. दाभोलकरांची व इतरही अनेक पुस्तके विकली न गेल्यास परत घ्यायच्या बोलीवर दिली. इतकेच नव्हे, तर तीन मोठ्या पिशव्यांमध्ये सर्व पुस्तके व्यवस्थित पॅक करून पुणे स्टेशनवर ट्रेनपर्यंत पोहचवली.
अशा प्रकारे सर्व जय्यत तयारी करून आम्ही १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पुणे स्टेशनवर पोहचलो. पुणे शहराध्यक्ष वसंत कदम निरोप द्यायला आले होते. आयोजकांतर्फे ढोलताशांनी सर्वांचे स्वागत करण्यात येत होते. संपूर्ण वातावरण उल्हासपूर्ण व उत्साहवर्धक होते. महाराष्ट्र शासनाचे मंत्री मा. उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी दिल्लीच्या दिशेने निघाली. मंत्री सामंत स्वतः अहिल्यानगरपर्यंत गाडीत होते. सगळ्यांशी ते संवाद साधत होते. भारत विठ्ठलदासने त्यांना एक चमत्कार प्रात्यक्षिकाचा प्रयोग करून दाखवला. त्यांनी भारावून जाऊन खाली वाकून विठ्ठलदासला नमस्कार केला. प्रत्येक बोगीत एक माईक व स्पीकर होता. त्यावरुन लोक कविता सादर करणे, गाणी म्हणणे, विचार व्यक्त करणे असे विविध कार्यक्रम करत होते. ‘फिरत्या चाकावरती मिनी साहित्य संमेलन’ ही आयोजकांची संकल्पना भारीच होती.
सुमारे ३५ तासांचा प्रवास करून आम्ही मध्यरात्री २ वाजता दिल्लीत पोहोचलो. एवढ्या रात्रीही आयोजकांनी बसेस ठेवून ट्रेनमधील १२०० लोकांना त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी सोडले. विश्रांती घेऊन आम्ही सकाळी संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी म्हणजे तालकटोराला येथे पोहचलो. पुस्तकांच्या दालनाने सज्ज झालेली ‘ग्रंथनगरी’ चांगलीच प्रशस्त होती. स्टॉलचा ताबा घेऊन आम्ही लगेचच पुस्तक मांडणी, फ्लेक्स लावणे हे काम सुरू केले. कार्यकर्त्यांनी खूपच आकर्षक मांडणी केली.
स्टॉलची मांडणी करत असतानाच लोकांनी स्टॉलला भेट देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर मांडणी पूर्ण होण्यापूर्वीच पुस्तक विक्रीलाही सुरुवात झाली. हा शुभ संकेत समजून आमचा उत्साह द्विगुणित झाला. महाराष्ट्रात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा देशपातळीवर लागू व्हावा यासाठी एक निवेदन तयार केले होते. त्यावर लोकांच्या सह्या घ्यायची मोहीम आम्ही राबवली. तीन दिवसात चारशेपेक्षा जास्त लोकांनी त्यावर सह्या केल्या. स्टॉलसमोरच मोकळ्या असलेल्या जागेत टेबल-खुर्ची मांडून, भारत विठ्ठलदासने चमत्कार प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली. त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तेथे चांगली गर्दी होत होती. लोकांचे प्रबोधन करण्यात भारत विठ्ठलदास चांगलाच यशस्वी झाला.
स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. मान्यवरांना स्टॉलवर घेऊन येण्यासाठी अरुण जाधव विशेष प्रयत्न करत होते. संमेलनाच्या अध्यक्ष ताराबाई भवाळकर, मागच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार उल्हास पवार, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, माजी आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कवयित्री मृणाल जैन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहदचे संजय नहार, बंधुता संमेलनाचे प्रा. अशोक पगारिया यांच्यासह अनेक पत्रकार, आयपीएस अधिकारी यांनी स्टॉलला भेट दिली.
पुस्तक विक्री कितपत होईल याविषयी आम्ही सुरुवातीला साशंक होतो. प्रत्यक्षात पुस्तकविक्रीला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. दाभोलकरांची पुस्तके जास्त करुन विकली गेली. पुस्तिकांचे सर्व संच विकले गेले. णझडउ/चझडउ करण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांनी स्टॉलला मोठ्या प्रमाणात भेट दिली व पुस्तके खरेदी केली. ही गोष्ट दिलासा देणारी होती. एकंदर अतिशय चांगला व उत्साहवर्धक अनुभव घेऊन, पुन्हा ३४ तासांचा प्रवास करून आम्ही पुण्यात परतलो.
आम्ही सोशल मीडियावरून सर्व रिपोर्टिंग करतच होतो. अनेकांनी फोन करून अभिनंदन व कौतुक केले. कार्यकारी समिती सदस्य प्रा. प्रविण देशमुख, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष वाघमारे सर यांनी खास पुण्यात येऊन आमचा सत्कार केला. त्याचे विस्तृत रिपार्टिंग ग्रुपवर केले. गिरमे सरांनी दिल्लीला गेलेल्या प्रत्येकाला एक सॅक भेट दिली. राहुल माने याने एक चांगला व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला. या सर्वांमुळे भरुन पावल्यासारखे झाले, केलेल्या कष्टांचे चीज झाले. पुढच्या साहित्य संमेलनातही असाच स्टॉल लावायचा मनोदय आहे. सर्वांच्या सहकार्याने तो यशस्वी होईल अशी खात्री वाटते.
विवेकाचा आवाज बुलंद करू! विवेकाचा आवाज बुलंद करू !!
– श्रीपाल ललवाणी, पुणे
मो.९८२३९७७४७२