अंनिवा -
बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या उपक्रमांतर्गत ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर दोन युवा मुस्लिम कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये पुणे येथून ‘आर्थिक कुर्बानी’ संकल्पना राबवणारे पैगंबर शेख आणि पत्रकार समीर शेख या दोघांशी ‘अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य फारूक गवंडी यांनी संवाद साधला.
दोन तास चाललेल्या संवादाच्या कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विचारलेल्या प्रश्नांना अतिशय संयमी आणि अभ्यासू उत्तरे समीर आणि पैगंबर यांनी दिली.
पैगंबर शेख हे गेल्या आठ वर्षांपासून मुस्लिम समाजात बकरी ईदनिमित्त ‘आर्थिक कुर्बानी’ ही संकल्पना चालवत आहेत. ही कल्पना त्यांना पवित्र कुराणातून सुचली असल्याने सांगून त्यांनी यामागील आपला विचार सांगितला. प्रेषित इब्राहिमपासून ही परंपरा चालू असून आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग, समर्पण करणे ही प्रामाणिकपणाची भावना कुर्बानीमागे आहे. प्रेषित इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशानुसार आपला मुलगा बळी न देता, प्रतीकात्मकरित्या विशिष्ट बोकड बळी दिला गेला आणि याचे प्रतीक म्हणून दरवर्षी मुस्लिम समाज बोकडाची कुर्बानी करीत आहे. मुस्लिम समाज पैसे खर्च करून बोकड विकत घेतो आणि तो अल्लाहसाठी कुर्बान करतो आणि मांसाचा वाटा गरिबांना देतो. आताच्या काळात मांस कुर्बान करण्यापेक्षा ‘आर्थिक कुर्बानी’ करून गरीब मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हा पैसा उपयोगात आणून समाजासमोर एक चांगला पर्याय ठेवू शकतो, असे पैगंबर शेख यांनी सांगितले. अशा प्रकारे ‘आर्थिक कुर्बानी’तून त्यांनी सांगली, कोल्हापूर; तसेच केरळ येथील पूरग्रस्तांनादेखील मदत केली असल्याचे सांगितले. या उपक्रमास सुरुवातीच्या काळात विरोध झाला होता. पण ‘अल्लाहला संयमी व्यक्ती आवडतो,’ या कुराणातील शिकवणीनुसार या विरोधास अत्यंत संयमितपणे हाताळल्याने सध्या या उपक्रमास प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असेही पैगंबर शेख यांनी सांगितले.
समीर शेख म्हणाला की, मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा आणि इतर बहुसंख्य समाजातील अंधश्रद्धा या बहुतांश एकच आहेत. कारण मुसलमान इथलाच भूमिपुत्र आहे, त्याने फक्त धर्म बदलला आहे. त्याची उपासनापद्धती बदललेली आहे; पण सगळे जगणे शेजारच्या इतर बहुसंख्य समाजासारखे आहे. त्याच्या अंधश्रद्धा दर्ग्याच्या भोवती पसरलेल्या आहेत. त्यामुळे गंडे-दोरे, ताईत, करणी, भानामती, भुताने झपाटणे, अंगात येणे हे सर्व बहुसंख्य समाजासारखेच आहे. मुस्लिम समाजाच्या अनेक रूढी, प्रथा, परंपरा या त्याच्या जन्मापासून मरेपर्यंत एकच आहेत. जगभरात कुठेही एकजिनसी समाज अस्तित्वात नाही. अनेक जाती, पंथ, विचारभेदांत तो विभागलेला असतो. ही सर्वमान्य असलेली सामान्य बाब मात्र मुस्लिम समाजाबाबत मान्य केली जात नाही. हे धक्कादायक असल्याचे त्याने सांगितले. आज मुस्लिम समाज बदलत आहे, चुकीच्या रुढी-परंपरेविरोधात सुशिक्षित मुस्लिम युवा विचार करत आहेत.
मुस्लिम तरुणांना सामाजिक चळवळीशी कसे जोडून घेता येईल? या प्रश्नाचे पैगंबर आणि समीरने दिलेले उत्तर सर्वच श्रोत्यांना आतून विचार करायला लावणारे होते. ते म्हणाले, मुस्लिम तरुण प्रचंड अस्वस्थ आहे. दंगली, ‘मॉब लिंचिंग’मुळे तो प्रचंड असुरक्षितता ‘फील’ करीत आहे. इतर तरुणांसारखेच त्याचे रोजी, रोटी, कपडा, मकानचे प्रश्न असताना त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यात येत आहे. देशभक्तीचे सर्टिफिकेट खिशात घेऊन फिरण्यासाठी त्याच्यावर दबाव आहे. प्रसारमाध्यमे स्वतःच्या ‘टीआरपी’साठी एखाद्या विखारी मुस्लिम पुढार्यास समोर आणून त्याच्या विखारी प्रचारास बढावा देतात आणि त्याची विखारी भूमिका समस्त मुस्लिम समाजाची आहे, हे भासवतात, हे अत्यंत चूक आहे. याचे अनेक गंभीर परिणाम मुस्लिम समाजाला भोगावे लागतात. संयमित, सुधारणावादी भूमिका घेणार्या मुस्लिम पुढार्यांना प्रसारमाध्यमांत मुद्दामहून डावलले जाते, हे कटू सत्य आहे. म्हणून पुरोगामी सामाजिक चळवळींनी आणि बहुसंख्य समाजाने मुस्लिम युवकांना सुरक्षितता, विश्वास आणि आधार दिल्यानंतर मुक्त विचारांसाठी वातावरण तयार झाल्यास तो नक्की सामाजिक चळवळीत सहभागी होऊ शकेल.
संवादक फारूक गवंडी यांनी प्रास्ताविकामध्ये आणि प्रश्नोत्तराच्या दरम्यान ‘अंनिस’ची भूमिका ही कोणत्याही देवा-धर्माच्या विरोधात नसून अंधश्रद्धेच्या चुकीच्या रूढी-प्रथा-परंपरांच्या विरोधात असल्याचे सांगितले. त्यासाठी आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनातीलही अनेक उदाहरणे देऊन हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच गेल्या दहा वर्षांपासून ‘अंनिस’ बकरी ईदनिमित्ताने रक्तदानाचा अभिनव कार्यक्रम आयोजित करते. यावेळी देखील ‘अंनिस’च्या अनेक शाखांकडून रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमामध्ये वक्त्यांची ओळख ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी सदस्या मधुरा सलवारु, (सोलापूर) आणि बाळासाहेब मुल्ला (गडहिंग्लज) यांनी करून दिली, तर आभार संदेश गायकवाड (पेण) यांनी मानले.