प्रशांत पोतदार -
दोन भोंदूबाबांनी भूतबाधा झाल्याच्या दिलेल्या सल्लयावर विश्वास ठेवून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षांच्या मुलीचा हकनाक बळी गेला. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रशांत पोतदार यांना समजल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना भेटून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सूत्रे हालवून दोन्हीही भोंदूबाबांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली.रामचंद्र तुकाराम सावंत (वय 45, रा. मोही, ता. माण), उत्तम कोंडीबा अवघडे (वय 55, रा. गोंदवले, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबांची नावे आहेत.
दहिवडी येथील फलटण रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयाजवळ काही फिरस्त्या वस्ती आहे. या वस्तीवरील बायली सुभाष इंगवले या चौदा वर्षीय मुलीचे सतत डोके दुखत होते. तसेच तिला तापही आला होता. तिच्यावर वडूज येथील एका डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले होते. परंतु वैद्यकीय उपचारानंतरही मुलीच्या पालकांनी बायलीला गोंदवले येथील उत्तम अवघडे या भोंदूबाबाकडे नेले. त्याने तुमच्या घराच्या आसपास बारव आहे. तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावास्येपर्यंत ठीक होइल, असे सांगून मंत्रतंत्र करून त्यांना परत घरी पाठवले. त्याच दिवशी सायंकाळी जास्त त्रास झाल्याने बायलीला मोही गावच्या रामचंद्र सावंत या भोंदूकडे नेण्यात आले. त्यानेही बारवीतील भूत लागले आहे. पौर्णिमेपर्यंत देव बांधले आहेत. ते ठीक होणे खूप कठीण आहे, असे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदीगाव, दहिवडी (जि. सातारा) येथील बायली सुभाष इंगवले या 14 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू दि. 20 फेबु्रवारी रोजी 11.55 वा. झाला आणि अत्यंत गुप्तपणे तिचा मृतदेह एका ओढ्याजवळ पुरण्यात आला. या धक्कादायक घटनाबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शिंदीगाव, दहिवडी येथील 14 वर्षांच्या बायली इंगवले, हिचे सतत डोके दुखत होते; तसेच तापही आला होता. स्थानिक डॉक्टरांनी प्रथमोपचार करून घरी पाठवले. परंतु कुटुंबीयांनी तिला दुपारी गोंदवले येथील एका देवऋर्षीकडे घेऊन गेले. “देवऋषीने “‘तुमच्या घराच्या आसपास बारव आहे, तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावास्येपर्यंत ठीक होईल,” असे सांगितले व मंत्रतंत्र करून परत पाठवले. नंतर संध्याकाळी जास्त त्रास झाल्याने “रामचंद्र सावंत या मोही गावच्या देवऋषीकडे मुलीला नेण्यात आले. याही देवऋषीने, “बारवीतले भूत लागले आहे व पौर्णिमेपर्यंत देव बांधलेले आहेत आणि ते ठीक होणे खूप कठीण आहे. 20 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तिला भयंकर धोका आहे,” असे सांगून व अंगारे-धुपारे करून परत पाठवले.
‘त्या’ रात्री घरातील सर्व मुलीला गराडा घालून काय होतेय, हे केवळ बघत बसले, मुलगी शांत बसली होती. तिचे हात-पाय थरथर कापत होते; पण तरीही सगळ्यांच्या नजरा घड्याळ्याच्या काट्याकडे बारा वाजण्याची वाट बघत बसल्या, यातच बाराला पाच मिनिटे कमी असताना ती मुलगी निपचित पडली, निधन पावली.” या घटनेमुळे देवऋर्षीने सांगितल्याप्रमाणे खरोखरच तिला भुताने नेले ही बाब देवऋषीवरील विश्वास दृढ होण्यास कारणीभूत ठरली. कुटुंबीयांनीच काहीही बोभाटा न करता मुलीचा मृतदेह जवळ असलेल्या ओढ्याशेजारी पुरला.
ही घटना, सातारचे जिज्ञासा ग्रुपचे नीलेश पंडित यांना सुनील काटकर (दहिवडी) यांनी सांगितली. त्यांनी सातारा अंनिसचा संपर्क सुनील काटकर यांना दिला. फोनवर ही हकिकत प्रशांत पोतदार यांना कळली, लगेच कार्यकर्त्यांनी दहिवडी गाठले; परंतु यामागील सत्यशोधन होऊन आपले कृत्य जनतेपुढे येईल व समाजात नाचक्की होईल, या भीतीने; तसेच देवऋषीच्या दहशतीमुळे मुलीच्या कुटुंबीयांनी प्रशांत पोतदार, अॅड. हौसेराव धुमाळ, सीताराम चाळके या म.अंनिस सातारा येथील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेट दिली नाही. आमची कोणतीही तक्रार नाही, असे कुटुंबीयांकडून मध्यस्थी सुनील काटकर यांना निरोप देण्यात आला. काटकर यांच्या घरी मुलीचे मामा; जे पोलीस दलात कार्यरत आहेत व गावातील काही तरुण त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. घडलेला सर्व प्रकार हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.
कुटुंबातील कोणीही तक्रार दिल्यास देवऋषी लोकांना अटक करता येईल व यापुढे अशा घटना टळतील. मुलीच्या मामाने घरी तक्रार द्यावी, अशी विनंती आम्ही केली मात्र त्यांनीही तक्रार देण्याचे नंतर नाकारले. हे अत्यंत वेदनादायी आहे.
या संपूर्ण प्रकरणाची दखल जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दक्षता अधिकारी या तरतुदीनुसार असलेल्या या ‘सू मोटो’ अधिकारातून त्यांनी करावी व मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही देवऋषींची; तसेच परस्पर मुलीच्या मृतदेहाची विल्हवाट लावणार्या दोषींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा जिल्हा यांनी मा. जिल्हाधिकारी सातारा, मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. सिव्हिल सर्जन सातारा यांच्याकडे केली आहे.
– प्रशांत पोतदार, सातारा