-

गेली वर्षभर सार्या जगभर धुमाकूळ घालणारी कोरोनाची साथ आता आटोक्यात आली आहे, असा समज गेल्या काही आठवड्यात कोरोनाची साथ जितक्या वेगाने पसरली तितक्याच वेगाने पसरला. हा समज पसरण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी महत्त्वाची म्हणजे गेल्या काही आठवड्यात देशभरातच नवीन रुग्णांची आणि मृतांची संख्या रोडावली, कोरोनाला रोखण्यासाठी जे कडक निर्बंध घालण्यात आले होते, ते शिथिल करण्यास सुरुवात झाली; त्यात लस आली, ती द्यायला सुरुवात झाली. त्यामुळे लोकांच्या मनातील साथीबद्दलची भीती, दहशत कमी झाली. लोक आणखीच सैलावले. अर्थकारणाने प्रचंड उसळी घेतल्याची जाहिरातबाजी, अशा कारणांमुळे लोकांना मनोमन खात्री झाली की, कोरोना संपला. पण कोणताही विषाणू आज आला आणि गेला, असे होत नाही. हे यापूर्वी येऊन गेलेल्या स्वाईन फ्लू, सार्स वगैरे साथींच्या अनुभवावरून सांगता येईल. कोरोनाचा विषाणू तर ठिकठिकाणी आपले स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशभरात; आणि मुख्यत: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही काही अचानक घडलेली घटना नाही. अशी परिस्थिती उद्भवू शकते, असा अंदाज साथरोगतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांतील डॉक्टरांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. त्यामुळे या नव्या कोरोना लाटेला सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक; तसेच इतरही यंत्रणा तयार होत्याच.
पण धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, विवाह समारंभ, मोर्चे, आंदोलने अशी ठिकाणे गर्दीने फुलून गेली आहेत. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांसारख्या प्राथमिक खबरदारीकडेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे दुसरी, तिसरी लाट हे अपेक्षित असले तरी तिची तीव्रता कमी करण्याची खबरदारी घेणे आपल्या हातात आहे, म्हणूनच कोरोनाच्या निर्बंधांचे अतिअवडंबर माजविणे किंवा निर्बंधांना बेछूटपणे झुगारणे, या दोन्ही गोष्टी बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकाने आपले व्यवहार पार पाडण्याची वेळ आली आहे.
पण अशा या गंभीर परिस्थितीत योग्य वैज्ञानिक उपचार घ्यावेत, संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली लस घ्यावी, सर्व निर्बध पाळावेत. यासंदर्भात लोकांचे प्रबोधन केले पाहिजे. त्याऐवजी नफा कमाविण्यासाठी चटावलेले रामदेवबाबासारखे बाबा आपल्या उत्पादनाची लोकांची दिशाभूल करणारी जाहिरात करत आहेत आणि त्याचा राजकीय फायदा उपटण्यासाठी टपून बसलेले ‘गो कोरोना’, गोमूत्र, गोबर फेम सध्याचे सत्ताधारी वैज्ञानिकतेला व विवेकाला धाब्यावर बसवत अशा जाहिरातींची भलावण करत आहेत.
खरे तर होमिओपॅथीक अथवा आयुर्वेदिक औषधांपासून कोरोनाचा बचाव अथवा उपचार होऊ शकतो, हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. कोणत्याही औषधाच्या अशा मानवी चाचण्या केल्या गेलेल्या नाहीत, हे वैज्ञानिक जगतात स्पष्ट असतानाही रामदेवबाबाने आपले कोरोनिल हे औषध कोरोना प्रतिबंध आणि उपचारांसाठी उपयुक्त असून त्याला औषध महानियंत्रकांनी मान्यता दिल्याचे आणि जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केला. हा दावा जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावला व कोरोना उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधांच्या वापराला मान्यता दिलेली नाही किंवा त्याबाबत अभ्यासही झालेला नाही, असे जाहीर करत रामदेवबाबाचा खोटेपणा उघड पाडलेला आहे आणि डॉक्टर असलेल्या आरोग्यमंत्र्यांनी अशा अवैज्ञानिक आणि फसव्या कृत्याला रामदेवबाबाच्या वार्ताहर परिषदेला हजर राहत हातभार लावल्यामुळे भारतीय वैद्यक संघटनेने त्यांनाही जाब विचारला आहे.
अर्थात, जाब विचारला असला तरी आपल्या या भूमिकेवर भारतीय वैद्यक संघटना कितपत ठाम राहते, याबद्दल साशंकताच आहे. कारण केवळ कोरोनाबाबतच नव्हे, तर गेल्या पाच-सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैज्ञानिकांच्या भरसभेत प्लास्टिक सर्जरीबाबत केलेल्या विधानापासून ‘गो कोरोना’, गोमूत्र पिणे, गोबर खाणे, टाळ्या, थाळ्या वाजवणे, दिवे लावणे, कापूर जाळणे, मंत्रांचा जप करणे असे अनेक प्रसंग घडले. पण त्याविरोधात वैज्ञानिक जगतातून अपवाद सोडले तर कोणी ठाम भूमिका घेतल्याचे दिसत नाही. आज अशी ठाम भूमिका घेऊन वैज्ञानिक व विवेकी मूल्यांवर होत असलेल्या या हल्ल्यांविरोधात उभे राहण्याची गरज आहे, तरच आपण या एकापाठोपाठ उमटणार्या लाटांना यशस्वीपणे तोंड देऊ शकू.