वेदांमध्ये काय आहे?

मेघनाद साहा -

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतीय पंचांगाचे निर्माते मेघनाद साहा यांनी तटस्थ वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिंदूंच्या वेदांना तसेच इतर धर्माच्या मूलभूत तत्त्वांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची अवहेलना करणे अगर अस्वीकार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मेघनाद साहा यांचा असा विश्वास आहे, प्राचीन धर्मग्रंथ जे वैश्विक शक्ती, घटनांचे ऐतिहासिक ज्ञान तसेच मानवी चरित्राच्या ज्या माहितीवर आधारित आहेत ते वर्तमान युगाला उपयुक्त आध्यात्मिकतेच्या आधाराचे ज्ञान होऊ शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर आजच्या युगाची आध्यात्मिकता कशा प्रकारे प्रस्थापित होऊ शकेल याचे सविस्तर वर्णन साहा यांनी केले आहे.

संपूर्ण ज्ञान वेदांमध्ये सामावलेले आहे? या माझ्या आधीच्या निबंधावर अनेक वाचक नाराज झाले आहेत. मी उगीचच वेदांबद्दल अनास्था दाखवली असे त्यांच्या नाराजीमागचे कारण होते. परंतु त्यांनी असे नाराज होणे योग्य नाही. तो निबंध लिहिण्यामागे एक व्यक्तिगत घटना आहे. जवळजवळ १८ वर्षापूर्वी मी इंग्लंडहून पहिल्यांदाच स्वदेशी परतलो होतो. वैज्ञानिक जगतात माझ्या नावाची थोडीबहुत चर्चा चालू झाली होती. मी विज्ञानाच्या क्षेत्रात काय काम केले आहे हे जाणण्याची इच्छा माझ्या ढाका शहरातल्या एका मान्यवर वकिलाने व्यक्त केली. मी उत्साहात त्यांना त्या वेळचा शोध (सूर्य आणि नक्षत्रांची नैसर्गिक स्थिती आयन सिद्धांताच्या माध्यमातून योग्य प्रकारे कशी समजता येते) याबद्दल समजावून सांगितले. ते थोडे थांबले आणि म्हणाले, “यात काय नवीन सांगितलेत? हे तर सर्व वेदांमध्ये आहे.” मी त्यांच्या म्हणण्याला नम्रपणे विरोध करत विचारले, “महाशय, या सर्व गोष्टी वेदाच्या कोणत्या भागात आहेत हे कृपा करून सांगाल का?” त्यावर ते उत्तरले, “मी स्वत: काही वेद वाचलेले नाहीत. पण तुमचे आधुनिक विज्ञान जे नवनवीन दावे करते त्यांचे वर्णन वेदांमध्ये आधीच केलेले आहे यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे.” हे महाशय विश्वविद्यालयाची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.

तर सांगायची गोष्ट अशी, गेल्या वीस वर्षांत मी वेद, उपनिषद, पुराण ही समस्त हिंदू शास्त्रे आणि ज्योतिष व विज्ञानासंबंधातील इतर प्राचीन ग्रंथ याचे पान अन् पान वाचले तरी मी हे समजू शकलो नाही. समस्त प्राचीन ग्रंथात आजच्या आधुनिक विज्ञानाच्या मूलतत्त्वांची माहिती कोठे दिली आहे? विश्वातील पृथ्वीचे स्थान, चंद्र, सूर्य, ग्रहगती, रसायन विद्या, प्राणी विद्या या विषयाबद्दल सगळ्याच प्राचीन देशातील विद्वानांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे जरी खरे असले, तरी आधुनिक विज्ञानाचे जग हे गेल्या तीन शतकांपासून युरोपीय विद्वानांनी घेतलेल्या सामूहिक शोध, विचारशक्ती आणि परिश्रमांचे फलित आहे. अकराव्या शतकात भास्कराचार्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा केलेल्या अगदी पुसटशा उल्लेखावरून ते म्हणतात, “न्यूटनने नवीन काय केले?” पण अशी तुलना न्यूटनशी करणे कितपत योग्य आहे? अज्ञान किती हानिकारक होऊ शकते, हे यावरून समजून येऊ शकते. भास्कराचार्यांनी कोठेही सांगितलेले नाही की पृथ्वी किंवा अन्य ग्रह सूर्याभोवती अंडाकृती मार्गाने (ईलिप्टिकल पाथ) फिरतात. गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा गतीच्या नियमांद्वारे त्यांनी कोठेही असे सिद्ध केलेले नाही की, पृथ्वी आणि अन्य ग्रह कशा प्रकारे आपापल्या कक्षेत भ्रमण करत असतात. त्यामुळे भास्कराचार्य अगर हिंदू, अरबी, ग्रीक विद्वानांनी केप्लर, गॅलिलिओ किंवा न्यूटन यांच्यापूर्वी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला होता असे म्हणणे अज्ञानीपणाचेच लक्षण ठरेल. आणि सर्वांत दु:खाची गोष्ट ही आहे की आपल्या देशात विज्ञानाचा विकृत प्रचार करणार्‍यांची अजिबात कमतरता नाही. हे लोक सत्याच्या नावाखाली केवळ असत्याचाच प्रचार करत असतात.

वेदांमध्ये काय आहे?

अठरा वर्षांपूर्वी वरील घटनेच्या वेळी मी वेद वाचले नव्हते. ऋग्वेदालाच मी वेद समजत होतो. नंतर मी इंग्रजी अथवा बंगालीत अनुवादित ऋग्वेद संहिता वाचली. कारण मूळ वैदिक संस्कृत वाचणे सोपे नव्हते आणि जरी मूळ संस्कृतमधून वाचले म्हणून काही विशेष फायदा होता असेही नव्हते. कारण आचार्य पाणिनीच्या काळापासूनच (सहावे किंवा पाचवे शतक) ऋग्वेद समजणे अवघडच होते. इसवी सनाच्या १४ व्या शतकात आचार्य शायन यांनी त्यावर भाष्य (शायन भाष्य) करण्याचा प्रयत्न केला होता. युरोपातील विद्वानांनी वेदांना संग्रहित करून त्यांना अनुवादित केले. त्यातील कठीण भाग समजावून घेण्याचा सामुदायिक प्रयत्न केला. तरीही त्यातील अधिकांश भाग स्पष्ट करता आला नाही. त्याची अनेक कारणे आहेत, पण मुख्यत: वेदांच्या वेगवेगळ्या भागांची रचना खूपच प्राचीन काळी झाली आणि ज्या काळी, ज्या देशात, ज्या वातावरणात आणि ज्या वर्गातील लोकांनी या रचना केल्या, त्या काळानंतर ते लोक त्या रचनांना पूर्णत: विसरून गेले. त्यामुळे या विषयांची पार्श्वभूमी समजल्याशिवाय या ग्रंथांचा मूळ अर्थ लावणे कठीण आहे. नंतरच्या काळात केवळ कल्पनेच्या आधारे यांचा अर्थ लावणे शक्य नाही. सर्वांत प्रथम हे जाणून घ्यायची आवश्यकता आहे की वेद नकी कोणत्या कालखंडात लिहिले गेले? वेदांमध्ये अनेक ज्योतिषीय घटनांचा उल्लेख आहे. त्यावरून या घटनांचा काळ निर्धारित करणे अवघड नाही. प्रोफेसर जैको बी. शंकर, बाळकृष्ण दीक्षित, प्रबोधचंद्र सेनगुप्त तसेच बाळ गंगाधर टिळक अशा स्वदेशी आणि विदेशी विद्वानांनी या ज्योतिषीय घटनांची वैज्ञानिक चिकित्सा करत वेदांचा कालखंड निर्धारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व लेखांवरून वेदांच्या वेगवेगळ्या भागांचे संकलन अथवा त्यांची रचना याचा काळ २५०० इसवी सन पूर्व ते ४००० इसवी सन पूर्व या दरम्यान आहे. त्या पूर्वीच्या घटना श्रुती मात्र आहेत. ज्या प्रकारे या देशात सध्याच्या प्रचलित पंचांगात अश्विनी नक्षत्राला नक्षत्र पुंजांचे मूळ मानले गेले आहे. आपल्या मानसिक आळशीपणामुळे वर्तमानातले पंचांग रचणारे १४३४ वर्षांपूर्वीच्या ज्योतिषीय घटनांचा प्रचार आजच्या काळातील घटना म्हणून करत आहेत. अनेक विद्वानांच्या मते, वेदांचे काही प्राचीन भाग त्यांच्या नेमक्या संकलन काळाच्या १००० वर्षांपूर्वीपासून श्रुतीच्या स्वरूपात चालत आले होते. असे असूनही युरोपातील विद्वान वेदांच्या अति प्राचीन भागांचा काळ २५०० इसवीसन पूर्व मानण्यास काही विशेष हरकत घेत नाहीत. मोहेंजोदारो, हरप्पा संस्कृतीत जी भारतीय सभ्यतेची छाप दिसते ती सुद्धा २५०० इसवी सन पूर्व किंवा त्याच्या एक दोन शताब्दी आगे मागे मानली जाऊ शकते.

ऋग्वेद संहितेच्या रचनेचा प्रारंभ २५०० इसवी सन पूर्व मध्ये झाला. संहितेत ज्या प्रकारच्या समाजाचे चित्रण सापडते त्यानुसार पृथ्वीच्या अनेक भागात (इजिप्त, इराण, संभवत: भारतही) उच्च स्तराचे समाज अस्तित्वात होते. ऋग्वेदात वर्णन केलेल्या नद्यांवरून संकेत मिळतात की, प्राचीन आर्य आजच्या पंजाबच्या उत्तर-पश्चिमी भागात तसेच आजच्या अफगाणिस्तानाच्या पूर्व भागात वसले होते. हे लोक सिंधू नदीच्या खोर्‍यातील जनतेवर सतत आक्रमण करत असत.

बाळ गंगाधर टिळकांनी आपल्या एका लेखात दाखवून दिले आहे की, अथर्व वेदात असे अनेक शब्द आणि श्लोक आहेत ज्यांचे योग्य अर्थ लावणे कोणालाही शक्य झालेले नाही. पण जर हे मान्य केले हे सर्व शब्द बॅबिलॉनमध्ये प्रचलित पौराणिक कथांमधून घेतलेले आहेत तर त्या शब्दांचा आणि श्लोकांचा अर्थ लावता येईल. जर हे मान्य केले अथर्व वेदाची रचना १५००-१६०० इसवीसन पूर्व झाली आहे तर टिळकांच्या लेखांवरून हे सिद्ध होते की, त्या वेळेस भारत आणि बॅबिलॉन यात संपर्क होता. असा विचार केला तर आपण ऋग्वेदाचे अनेक कठीण भाग समजावून घेऊ शकू. ऋग्वेदी ऋषींनी रचलेल्या अशा श्लोकांच्या संग्रहात मात्र सूर्य, चंद्र अशा नैसर्गिक देवतांचे तसेच इंद्र, वरुण, मित्र अशा इतर देवतांचे गुणगान आहे. अनेक विद्वानांच्या मते मित्र, वरुण, विष्णू या देवता सूर्याच्या प्रतीक आहेत. अर्थात ग्रह, नक्षत्र आदी नैसर्गिक शक्तींना देवता मानून स्तुती करणे हा काही फक्त आर्यांचाच आविष्कार नव्हता तर वैदिक संस्कृतीच्या समकालीन असलेल्या इजिप्शियन, सुमेरियन यांसारख्या संस्कृतीत तसेच सगळ्याच प्राचीन संस्कृतीत कोणत्या ना कोणत्या काळी या परंपरा पाळल्या जात असलेल्या दिसतात. इजिप्शियन लोक सूर्याला प्रमुख देवता तसेच सृष्टीचा निर्माता मानत होते. साइरम (sirim) लोक ब्रह्मांडात सर्वांत श्रेष्ठ मानल्या जात असलेल्या लुब्धक नक्षत्राला आईसिस देवीच्या रूपात मानत होते. प्राचीन सुमेरी लोकांच्या बर्‍याच देवता ग्रह नक्षत्राशीच निगडित होत्या.

या सर्व देवी-देवता तसेच समुद्र, नदी किंवा पर्वत देवता यांना घेऊन सुमेरियन कवींनी तसेच ऋषींनी ज्या स्तोत्रांची (देवी-देवतांच्या छंदबद्ध स्तुती) रचना केली होती त्याचे अनेक भाग अलीकडेच शोधून काढले आहेत. ते ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. सुमेरियन पुरातत्त्व विभागाचे उपनिदेशक डॉ. गौड यांनी त्यांचा अनुवाद प्रकाशितही केलेला आहे. ‘इजिप्शियन बुक ऑफ डेड’ नावाच्या ग्रंथात इजिप्शियन देवतांच्या उपासनेसाठी रचलेले श्लोक संग्रहित करण्यात आलेले आहेत. दिवंगत झालेले अमेरिकेचे सुप्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता प्रोफेसर ब्रेस्ट यांनी ‘Dawn Of Conscience In The World’ या आपल्या पुस्तकात सिद्ध केले आहे की, बायबलमध्ये येशूची आध्यात्मिक वाणी म्हणून ज्याचा प्रचार केला गेला आहे त्याचा अगदी अक्षरासह बहुतांश भाग प्राचीन बॅबिलिनिया आणि मिरवी शास्त्रांतून उधार घेतलेला आहे. अर्थात, प्रत्यक्षात इ.स.पू. ४००० ते इ.स.पू. ६०० या कालखंडात या दोन संस्कृतींनी आपल्या हजारो वर्षांच्या अनुभवातून जे काही आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले होते तेच पुढील काळात ख्रिश्चन धर्माचा आधार बनले. परंतु ख्रिस्ती व इतर धर्म मानणार्‍यांनी ग्रह, नक्षत्र, अनेक देवी-देवता यांना मानण्यात काहीच औचित्य नाही, हे समजून या परंपरेला सोडले.

वेद तसेच परिवर्तन काळातील शास्त्रे यांचा सखोलपणे अभ्यास केला तर वरील गोष्ट बरोबर आहे हे समजून येईल. मोहेंजोदडो (२५०० इ.स.पू.) तसेच अशोकाचा काळ (३०० इ.स.पू.) यामधील काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ज्या साधनांची आवश्यकता आहे ती साधने आजपर्यंत उपलब्ध नाहीत. वैदिक तसेच वैदिकपूर्व भारतीय संस्कृतीच्या दोन किंवा तीन धारांच्या सामिलीकरणाच्या परिणामी याच काळात भारतीय संस्कृतीच्या मूळ तत्त्वांचा आविष्कार व प्रस्थापना तसेच भारतीय धर्म, समाज आणि संस्कृतीची बांधणी झाली. या नंतरच्या काळात (अर्थात, ३०० इ.स.पू. किंवा त्यानंतरही) रामायण, महाभारत, पुराणे यात या २२०० वर्षांतील घटना अस्पष्टपणे श्रुतींच्या स्वरुपात आपल्याला दिसू शकतात. वैदिक आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा ते करत असलेल्या यज्ञयाग, अनुष्ठाने या संदर्भात अनेक प्रश्न उद्भवू लागले. उपनिषदात या मानसिकतेची झलक दिसून येते. उपनिषदांची आध्यात्मिकता ब्रह्मवाद आहे. त्यात वैदिक देवतांना मान्यता नव्हती.

बौद्ध तसेच जैनांनी वेदांना स्पष्ट नकार देत आपापल्या धर्माची स्थापना केली. पण ज्या शास्त्रांना आणि दर्शनांना कट्टर सनातनी म्हटले जाते तेसुद्धा अधिकतर वेदविरोधी आहेत. सांख्य दर्शनावर टीका करताना बंकिमचंद्र यांनी म्हटले आहे, सांख्यांनी वेदांना कधीच नाकारले नाही. सांख्य दर्शनात वैदिकतेचे पुरेसे वर्णन केलेले आहे, पण सांख्य प्रवचनकार वेदांशी सहमती दर्शवत त्यांचा अस्वीकार करतात.

वेदांच्या उत्पत्तीबद्दलच्या अनेक हिंदू शास्त्रांच्या सर्वच समजुतींचा उल्लेख बंकिमचंद्रांनी त्यांच्या ‘विविध प्रबंधा’च्या पाचव्या अध्यायात केलेला आहे. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचून पहावा. या सर्व समजुतींवर एक दृष्टिक्षेप टाकला तर वेदांच्या रचनेच्या वेळी ‘वेद ईश्वराची मूळ वाणी आहे’ हीच समजूत प्रबळ असल्याचे दिसून येते. प्राचीन काळात वेदांच्या उत्पत्ती संदर्भात अनेक प्रकारच्या विचित्र व अस्पष्ट समजुती प्रचलित होत्या. पण ‘वेद ईश्वराची मूळ वाणी आहे’ हे सिद्ध करण्याचा काहीच प्रयत्न केला गेला नव्हता. जिथे वेद मतांना विरोध आहे, तेथे वेदांशी सहमतीही आहे.

मग प्रश्न उठतो, वेदांची इतकी रूपे का आहेत? या प्रश्नाचे उत्तर एका दुसर्‍या धर्माच्या उदाहरणातून देता येईल. तो धर्म आहे इस्लाम. हा धर्म कुराणावर आधारित आहे. असे मानले जाते की, हजरत मुहम्मद यांनी ईश्वराचा आदेश ऐकला, त्यांच्या शिष्यांनी तो ऐकून लिपीबद्ध केला. या संग्रहाला ‘कुराण’ मानले जाते. पण हजरत मुहम्मद यांच्या मृत्यूला २० वर्षे होण्याच्या आतच इस्लामच्या विशाल जगातील विविध भागात कुराणाच्या वेगवेगळ्या प्रती आणि पाठ निर्माण होऊ लागले. हे पाहिल्यावर, यामुळे लवकरच अनेक इस्लाम धर्म अस्तित्वात येतील याची जाणीव खलिफा उस्मान यांना झाली. याला प्रतिरोध करण्यासाठी त्यांनी एक उपाय शोधला. त्यांनी हजरत मुहम्मद यांचे शिष्य आणि साथी यांची एक सभा बोलविली. त्यात त्यांनी विविध देशांमध्ये जितक्या प्रकारची कुराणे होती त्यातील कोणकोणत्या कुराणात हजरत मुहम्मद यांनी त्यांच्या प्रत्यक्ष मुखातून सांगितलेल्या विषयांचे संकलन आहे याची खातरजमा केली. त्यानंतर बर्‍याच काळच्या उलथापालथीनंतर ज्या रचना हजरत मुहम्मद यांच्या प्रत्यक्ष सांगण्यातून आल्या होत्या त्या सर्व रचना पुन्हा लिहून त्याची मूळ प्रत तयार केली गेली व भविष्यात जर कुराणाच्या प्रतीत काही त्रुटी आढळली तर ती प्रत अशुद्ध मानली जाईल असा नियम बनविला गेला. या कठोर नियमामुळेच गेल्या १४ शताब्दीपासून आजपर्यंत इस्लामच्या विशाल जगात कोठेही कुराणचे मूळ स्वरूप बदलणे शक्य झालेले नाही.

तरी असे कठोर नियम असूनही इस्लाम धर्मात वेगवेगळे पंथ अस्तित्वात आले. अध्यापक ताराचंद यांच्या मते, इस्लाममध्ये अलग अलग पंथ (जसे शिया-सुन्नी) आहेत. हे सर्व पंथ वरून जरी कुराणाला हजरत मुहम्मद यांची मूळ वाणी म्हणून स्वीकारतात. पण त्या उप्परही या पंथांचा धर्म विश्वास व आचार-विचार यात पुरेशा काळापासून जमीन-अस्मानाचे अंतर आहे. या सर्व पंथात मोतजीर पंथ प्रखर विवेकवादी पंथ आहे. या पंथाचे लोक सॉक्रेटिस, प्लेटो, अरस्तु अशा प्राचीन युनानी विवेकवादी दार्शनिकांच्या विचारांना मान्यता देतात. आगाखानी पंथ जो भारतीयांप्रमाणे अवतारवाद आणि पुनर्जीवनवाद यावर विश्वास ठेवणारा आहे. असे असूनही हे सर्व पंथ धर्मावर श्रद्धा ठेवणारे आहेत. याचे कारण इस्लाम धर्म अल्पावधीतच सीरिया, इराक, मध्य आशिया यात पसरला, पण आपल्या देशातील प्रस्थापित जुन्या धर्मविश्वासांना एका झटक्यात सोडणे तेथील लोकांना शक्य नव्हते. राज्य शासन इस्लाम धर्म अवलंबितांच्या हाती असल्याने ते लोक त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे साहस करू शकत नव्हते. त्यामुळेच त्यांनी वरून वरून कुराणाला मान्यता दिली पण प्रत्यक्षात कुराणाच्या विरोधात आचरण करूनही कट्टर मुसलमानांप्रमाणे इस्लाम धर्माचा विस्तार केला.

हाच तर्क ‘वेद ईश्वराची मूळ वाणी आहे’ या विषयातही काम करेल. जेव्हा इ.स.पू. २५०० (किंवा याच्या थोडे आगे मागे) मध्ये वैदिक आर्यांनी समस्त उत्तर भारत आपल्या अधिकारात घेतला तेव्हा त्यांचे नेता, पुरोहित (ऋषी), राजपुरुष यांनी यज्ञ, अनुष्ठानांचे खूपच अवडंबर माजवले. यज्ञ, अनुष्ठान करताना त्यांचे आपल्या देवी-देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी जसे स्तुतीगान चालायचे तसेच ते पशूंचे बळीपण द्यायचे. पाणिनीच्या पूर्वीच हे सर्व स्तोत्र वगैरे गणित तसेच मंत्रादीत वाटले गेले होते. पण उपनिषदाचे युग असल्यामुळे ऋषिगण वैदिक यज्ञ आदीच्या आध्यात्मिकतेबद्दल संदिग्ध होते. वैदिक पूर्व भारतीय संस्कृतीत ज्या लोकांची धार्मिक श्रद्धा होती (बहुधा पाशुपती धर्म आणि नारायणी धर्म), त्यांनी नंतर अन्य उपायांनी आपल्या धर्माला प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला. परंतु देशातील राज्य शक्तीचा आणि पुरोहित शक्तीचा वैदिक कर्मकांडात प्रगाढ विश्वास होता.

त्यांना विरोध करून आपल्या मताचा प्रसार करण्याचे धाडस या लोकात (प्राचीन धर्म मानणार्‍यांत) नव्हते. परिणामी, हे लोक वेदांच्या अस्पष्ट सूत्रांना प्रतिसाद देत आपल्या धर्माची मुळे शाबूत राखण्याचे प्रयत्न करीत होते. यामुळेच वैदिक पूर्व शिव, पशुपती देवता तसेच वेदांमध्ये वर्णन केलेल्या अमंगलकारी रुद्र देवता कालांतराने एक होऊन वेदांच्या सूर्य देवता तसेच नारायणी धर्माच्या विष्णू देवतांनाही एक करण्याचे प्रयत्न झाले. पाशुपती आणि नारायणी धर्म मानणार्‍यांनी या प्रकारे वेदांना प्रतिसाद देत अवैदिक कर्मकांडे चालू ठेवली. बौद्ध व जैन धर्म मानणार्‍यांना वैदिक धार्मिक विश्वास मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या पद्धतीचा अवलंब न करता त्यांनी वेदांच्या ईश्वरीय असण्याचे मानण्यास नकार दिला आणि वैदिक कर्मकांडांना निरर्थक मानले.

धार्मिक दृष्टिकोनाच्या आधारावर जगाच्या कोणत्याही भागात एक आंदोलन होऊ शकेल. पण त्यामुळे बहुमुखी विकास होईल असे वाटत नाही. जीवन आपल्या सर्वांनाच प्रिय आहे आणि आपण सर्व जीवनातील सर्व कोड्यांना सोडविण्यासाठी उत्सुक आहोत. प्राचीन काळात विज्ञानाला असलेल्या मर्यादांमुळे एका कल्पित ईश्वराच्या पायाशी दयेची भीक मागण्याशिवाय आपल्याजवळ दुसरा मार्गच नव्हता, ज्याला निसर्गाच्या रहस्यमय नियमांचा नियंता मानले गेले. वैज्ञानिक युगपूर्व मानवाला आपल्या असहाय्यतेची जाणीव फारच प्रकर्षाने झाली. बहुधा या मानसिकतेमुळेच धर्माची रचना होऊ शकली. प्राचीन धर्मात निसर्गासंबंधीच्या विचारांना अभावानेच व्यवस्थित परिभाषित केलेले आहे.

अनुवाद : राजीव देशपांडे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ]