चित्तरंजन चौरे -

महाअंनिसची राज्यव्यापी महिला परिषद नागपूरला जल्लोषात संपन्न
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला विभागातर्फे नागपूर येथे राज्यस्तरीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात येईल, असा संदेश राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे घेऊन आले व तेव्हापासूनच या परिषदेचे वेध नागपूर शहरातील सर्व शाखांच्या महिला विभागाला लागले. ही परिषद जल्लोषात कशी करता येईल? त्यासाठी कोणते ठिकाण ठरवायचे? त्याचं नियोजन कसं करायचं? या व इतर प्रश्नांसाठी महिला विभागाच्या बैठका सुरू झाल्या. रामभाऊ म्हणाले, “कार्यक्रमाची रुपरेषा व नियोजनाची चिंता करणेचे कारण नाही. मध्यवर्तीचा महिला विभाग त्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. आपण उत्कृष्ट व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू.”

त्या अनुषंगाने आम्ही आमचे नेहमीचे हितचिंतक मा. उपायुक्त प्रादेशिक समाजकल्याण विभाग, नागपूर यांच्याकडे जाऊन महिला परिषदेची सर्व रूपरेषा सांगितली. उपायुक्त मा. बाबासाहेब देशमुख यांना ती आवडली व त्यांनी कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर मधील सभागृह सहर्ष देऊ केले. महाअंनिस व सामाजिक न्याय विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सर्व महिलांमध्ये विभागात उत्साह संचारला. ऑनलाईन बैठका सुरू झाल्या. मुंबई व पुण्यातून राज्य कार्यकारी समिती सदस्य अॅड. मुक्ता दाभोलकर व नंदिनी जाधव, सोलापूरहून राज्य महिला विभाग सदस्य उषा शहा, चाळीसगावहून नीता सामंत व नागपूरचा महिला विभाग कामाला लागले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानंतरच्या आठवड्यातील १५ व १६ मार्च ही परिषदेची तारीख ठरली. राज्यभरातून परिषदेला येणार्या महिलांची तसेच सांस्कृतिक व अन्य उपक्रमांत सहभाग घेणार्या महिलांची नोंदणी सुरू झाली.
दि. १५ मार्च २०२५: उद्घाटन सत्र
स्त्री-पुरुष समता चळवळीतील कार्यकर्ता, लेखक व ‘सर्वंकष’ या त्रैमासिकाचे संपादक मा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या हस्ते महिला परिषदेचे उद्घाटन झाले. मा. ज्ञानेश्वर रक्षक (अध्यक्ष-गुरुदेव सेवा मंडळ, नागपूर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. संध्याताई राजूरकर (संपादक-दैनिक बहुजन सौरभ, नागपूर) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने झाले. महिलांनी अंगावर अंधश्रद्धा, भूतबाधा, गुप्तधन, नरबळी, व्रतवैकल्ये, चेटूक व भानामती यांच्या बेड्या ठोकून घेतल्या होत्या. मंचावर येऊन मा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी व बेड्यात अडकलेल्या महिलांनी स्वतः त्या बेड्या तोडल्या व टाळ्यांच्या गजरात परिषदेचे उद्घाटन झालं. मान्यवरांच्या स्वागतानंतर अवनी चव्हाण या चिमुकलीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. अण्णा कडलासकर व देवयानी भगत यांच्या चमूने “डॉ. दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ” हे अभिवादन गीत सादर केले.

राज्य कार्यकारी समिती सदस्य अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी त्या म्हणाल्या की, अंनिसच्या कार्यात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी आपण एकमेकींना प्रेरणा द्यायची आहे. त्यासाठी ज्या उपक्रमांमध्ये महिला केवळ प्रेक्षक किंवा श्रोते म्हणून नव्हे, तर सक्रिय सहभागी होऊ शकतील असे उपक्रम आपण संघटना म्हणून निवडले पाहिजेत. त्या पुढे म्हणाल्या की, जगभर हे दिसते की जितकी धर्मांधता वाढते तितका बाईचा सार्वजनिक अवकाशातील वावर कमी होतो व ती परत घरात म्हणजे पारंपरिक भूमिकेत ढकलली जाते. वडील, पती, सासू-सासरे यांच्या मताने जगणे हे बाईसाठी आदर्श मानले जाते. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः न घेणे हेच आदर्श समजले जाते. त्यामुळे तिच्या मनात प्रयत्नवादाऐवजी दैववाद खोलवर रुजतो.
महिला परिषदेचे उद्घाटक मा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आपल्या संबोधनात म्हणाले की, पुरुषसत्ता, भांडवलशाही आणि जातिव्यवस्था या तिहेरी जोखडात आजची स्त्री अडकली आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्या जात-धर्म भांडवलशाही व्यवस्था अतिशय मजबूत झाल्या आहेत.आज पुनश्च एकदा आपण प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलो आहोत. अशा वेळी पुरोगामी चळवळी मात्र दुभंगल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.
समाजात वावरताना छोट्या छोट्या गोष्टींमधूनही कशा अंधश्रद्धा पसरवल्या जातात याचे मार्मिक दाखले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे भाष्यकार मा. ज्ञानेश्वर रक्षक यांनी दिले.
तर उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार मा. संध्या राजूरकर म्हणाल्या की, महिलांकडे बघण्याची दृष्टी आपल्याला आपल्या कृतीतून बदलावी लागेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेने लाभलेली बंधने झुगारून द्यावी लागतील. ‘जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उधारी’ या तत्त्वानुसार काम करावे लागेल. पाळण्याची दोरी तिच्या हातून काढून तिला तिचं आयुष्य जगू द्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी उंबरठा ओलांडून शिक्षणाचे दारे उघडे करून दिली. म्हणून आज आपण अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या कामाबाबत बोलू शकतो. तर संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्व जाती-धर्माच्या महिलांना डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले असे ठाम प्रतिपादन राजूरकर यांनी केले.
सत्र पहिले : उद्घाटन सत्रानंतरच्या ‘अंनिस समजून घेताना’ या सत्रात मा. उषा शहा, सोलापूर यांनी ‘अंनिसची वैचारिक भूमिका’, अण्णा कडलासकर, पालघर यांनी ‘अंनिसची वाटचाल’ व मिलिंद देशमुख, पुणे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे लढे’ या विषयांची मांडणी केली.

सत्र दुसरे : खुली गटचर्चा
या गटचर्चेचे संयोजन मा. किरण जाधव, अंबरनाथ व देवयानी भगत, नागपूर यांनी केले. गटचर्चेचे विषय खालीलप्रमाणे होते.
१. स्त्रिया आणि व्रतवैकल्ये.
२. स्त्रिया, अंधश्रद्धा आणि दूरदर्शन मालिका.
३. स्त्रिया : अंधश्रद्धेच्या बळी आणि वाहक.
४. आधुनिक स्त्री आणि अंधश्रद्धा.
५. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आणि अंधश्रद्धा.
६. आध्यात्मिक बुवाबाजी आणि स्त्रियांचा वाढता सहभाग.

महिलांचे सहा गट पाडून प्रत्येक गटाने वरील विषयावर सखोल चर्चा केली व प्रत्येक गटाच्या प्रतिनिधीने मंचावर येऊन आपल्या गटामध्ये झालेल्या चर्चेतील महत्त्वाच्या मुद्यांची मांडणी केली. या गटचर्चेच्या माध्यमातून ‘समाजात असलेली अंधश्रद्धा केवळ शिक्षणाच्या अभावामुळे नाही तर मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रभावामुळे अधिक गंभीर होत चालली आहे.’ ‘वैज्ञानिक दृष्टिकोन शाळा-कॉलेजांमधून रुजविणे जास्त आवश्यक वाटत.’ तसेच ‘आत्मनिर्भरतेसाठी आर्थिक स्वावलंबनाबरोबरच स्त्रियांनी आर्थिक साक्षर होणे ही काळाची गरज आहे.’ ‘सावित्रीआईंनी ‘लोक काय म्हणतील’ हा विचार बाजूला ठेवून प्रतिकूल परिस्थितीत देखील निर्भिडपणे अन्याय्य रुढींना ठामपणे विरोध केला, आज आपल्या पाठीशी भकमपणे संविधान उभे आहे हे घराघरात पोहचवू या’ असे अनेक महत्त्वाचे मुद्दे गटचर्चेतून पुढे आले.
सत्र तिसरे : ‘स्त्रियांचे विशिष्ट जीवनानुभव व अंधश्रद्धा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात शुभदा देशमुख, कुरखेडा, गडचिरोली, अॅड. अंजली साळवे, नागपूर व सुवर्णा दामले, नागपूर यांनी सहभाग घेतला. प्रा. डॉ. सुनील भगत यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. सहभागी वत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अनुभव व अंधश्रद्धा यांचे सोदाहरण अनुभव कथन केले.

सत्र चौथे : या सत्रात पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कला हे विचारांच्या अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे याचा प्रत्यय या सत्रात आला. या सत्रात पुढील कार्यक्रम सादर झाले.
१. मानसिक विकलांगतेतून केलेले शोषण (मतिमंद मुला-मुलींचे दैवतीकरण) या विषयावर आधारित रिंगण नाटक सोलापूर, चाळीसगाव, पालघर शाखेच्या कार्यकर्त्यांनी मिळून प्रस्तुत केले. सादरकर्ते-निशा भोसले, मधुरा सलवारू, उषा शहा, वैशाली निकम, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, वैशाली निकम, त्रिशला शहा, आशा धनाले, मीना मोरे व चमू.
२. ‘मी सावित्री बोलतेय’ हे एकपात्री नाटक शोभा पाटील, पूर्व शाखा नागपूर यांनी सादर केले.
३. ‘अंगात आला देव व अकरा रुपये ठेव’ ही अंधश्रद्धेवर आधारित नाटिका भद्रावती (जिल्हा चंद्रपूर) शाखेच्या कार्यकर्त्यांनी सादर केली. सादरकर्ते – शारदा खोब्रागडे, इंदू उमरे, प्रीती मैत्रेय, लता टिपले, मुक्ता पेटकर व दीपाली व अनिता भुजभुजे.
४. ‘फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?’ या गीतावर दक्षिण नागपूर शाखेच्या मंगला गाणार व दीपा मोहिले यांनी नृत्य सादर केले.
५. ‘बाबांचा चमत्कार व महिलेवर बलात्कार’ ही अंधश्रद्धेवर आधारित नाटिका उत्तर नागपूर शाखेच्या गटाने सादर केली. सादरकर्ते – अजय रहाटे, गौतम मघाडे, वर्षा सहारे, प्रिया गजभिये, देवानंद बडगे, निकिता बोंदाडे, चंदा मोटघरे, वंदना टेंभुर्णे व हर्षल काळबांडे.
६. ‘शनीचा संताप व प्रकोप’ या नाटिकेचे सादरीकरण मधुरा सलवारु, निशा भोसले व सोलापूर शाखेने केले.
७. ‘वंशाचा दिवा’ हे नाटक प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, अण्णा कडलास्कर, निशा भोसले या चाळीसगाव, पालघर, सोलापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी सादर केले.
गौतम पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.

दि.१६ मार्च : सत्र पहिले
या सत्रात चमत्काराची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. वंदना शिंदे, ठाणे यांनी अत्यंत शिताफीने लंगर सोडविणे, भूत अंगात आणणे, नारळातून करणी काढणे इ. प्रयोग सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

सत्र दुसरे : हे सत्र ओपन फोरमचे होते. यात राज्यभरातून आलेल्या विविध महिला कार्यकर्त्यांनी, ‘त्या अंनिसमध्ये कशा आल्या?’, ‘अंनिसमध्ये काम करताना त्यांना कोणते अनुभव आले?’, ‘त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणते बदल झाले?’, ‘या कामाला कुटुंबीय व समाज कसा प्रतिसाद देतो?’ याविषयी त्यांचे मनोगत मांडले. त्यात वैशाली निकम, त्रिशला शहा, मधुरा सलवारु, देवयानी भगत, शारदा खोब्रागडे, मंगला गाणार, वंदना सहारे, रंजना ठवरे, शोभा पाटील, विजया ठाकरे, सुषमा शेवडे, वर्षा सहारे, इंदू उमरे, प्रा. पुष्पा घोडके, वंदना लांजेवार, कांचनमाला माकडे, चंदा मोटघरे, शोभा तिरपुडे, माही मोहिले, आशा पडळकर यांनी मनोगत मांडले. काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!

समारोपाचे सत्र :
मा. डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक उपायुक्त – समाजकल्याण विभाग, नागपूर) हे समारोप सत्राचे अध्यक्ष होते व मा. प्रा. रोशनी गायकवाड या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रा. रोशनी गायकवाड यांनी ‘अंधश्रद्धा कशी जीवघेणी असते’, हे सोदाहरण स्पष्ट केले. महिलांनी आपल्या मनाची मेंदूशी सांगड घालावी व जागृत रहावे, असे त्या म्हणाल्या. या महिला परिषदेचा समारोप करताना डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा गौरव केला. जादूटोणाविरोधी कायद्याच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतला. हा कायदा पारित होताना किती अडचणी आल्या, त्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी कसा मार्ग काढला. कायद्याचा किती वर्षे पाठपुरावा केला याची माहिती त्यांनी सांगितली. उपायुक्त गायकवाड पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने कायदा तर केला, परंतु त्याच्या प्रचाराचे काम शासनाकडून एकही पैसा न घेता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करते आहे असे गौरवोद्गार त्यांनी या निमित्ताने काढले.

या राज्यव्यापी महिला परिषदेच्या निमित्ताने चार ठराव पारित करण्यात आले. ते ठराव पुढीलप्रमाणे.
१. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्या रोज किमान एका नवीन महिलेशी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित व्रतवैकल्ये, रूढी-परंपरा, अंगात येणे, बुवाबाजी, करणी, भानामती अशा कोणत्या ना कोणत्या विषयाबद्दल किमान १५ मिनिटे गप्पा मारून संवाद साधू. तसेच आम्ही अंधश्रद्धेच्या बळी ठरलेल्या व्यक्तींची आवर्जून भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधू.
२. भोवतालचा समाज व जग अधिक समजून घेण्यासाठी आम्ही रोज किमान अर्धा तास वैचारिक वाचन करू.
३. विधवा प्रथेमुळे महिलांच्या वाट्याला दुःख व अवहेलना येते. अशा विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू.
४. महाराष्ट्रातील जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे देशव्यापी कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करू.
या परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून २३० जणांनी सहभाग नोंदविला. त्यात १७ जिल्ह्यांतून १८० पेक्षा अधिक महिला प्रत्यक्ष सहभागी झाल्या. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातून ११ महिलांनी सहभाग नोंदविला. वर्षा सहारे यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचलन व प्रा. पुष्पा घोडके यांनी आभारप्रदर्शन केले. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने कार्यक्रमाचे समापन झाले. हार्मोनियमवर छाया मनोहर व सृष्टी मनोहर तसेच ढोलकवर गोपी यादव यांनी दोन्ही सत्रातील चळवळीच्या गीतांना संगीताचा साज चढविला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजया श्रीखंडे, देवयानी भगत, प्रा. पुष्पा घोडके, शोभा पाटील, वर्षा सहारे, प्रिया गजभिये, रंजना ठवरे, मंगला गाणार, माही मोहिले, विजया ठाकरे, इंदू उमरे, दीप्ती नाईक, इंदू मेश्राम, सुषमा शेवडे, वंदना टेंभुर्णे, चंदा मोटघरे, रामभाऊ डोंगरे, देवानंद बडगे, चित्तरंजन चौरे, विभूतीचंद्र गजभिये, गौतम पाटील, चंद्रशेखर मेश्राम, डॉ. सुनील भगत, अरविंद तायडे, डॉ. विलास होले, कमलाकर सतदेवे, नरेश मेश्राम, अरविंद तायडे, माया व अविनाश सुखदेवे, नरेश महाजन, इंजि.यशवंत घोडके यांचे सहकार्य लाभले.
– चित्तरंजन चौरे, कार्याध्यक्ष, अंनिस नागपूर जिल्हा
मो.९४२२९ ०६२६४