-
स्त्रियांनी देवभोळेपणा सोडावा, अंधश्रद्धेपासून दूर राहावे – सरोजमाई पाटील
स्त्रियांनी देवभोळेपणा सोडावा. अंधश्रद्धेपासून दूर राहावे, असे प्रतिपादन महा ‘अंनिस’च्या राज्याध्यक्ष सरोजमाई पाटील यांनी केले. जातीभेद रोखण्यासाठी सर्वांनी मानवी मूल्ये आचरणात आणली पाहिजेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर व एन. डी. पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळीचे कार्य जोमाने पुढे नेऊया, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्यावतीने येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. २०० विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यकर्ते सहभागी झाले. निवृत्त प्राचार्य सुभाष ढगे, प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘बुवाबाजी विरोधातील वैचारिक भूमिका’ वर मार्गदर्शन करताना राजीव देशपांडे म्हणाले, वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. बुवाबाजीचे षड्यंत्र व शोषण ओळखून त्याला सर्वांनी आळा घातला पाहिजे. भारतीय घटनेने दिलेली मूल्ये हा जगण्याचा आधार आहे. देशाचे द्वेषाचे वातावरण धोक्याचे आहे. त्याविरुद्ध सर्वांनी लढणे आवश्यक आहे. राज्य सदस्य फारुख गवंडी म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणायचे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कामात क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, “धर्मांध वातावरण राजकीय सत्तेच्या आधारे पसरवले जात आहे. विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षण संस्थांनी लोकशाही मूल्यांचे व वैज्ञानिक दृष्टीचे कसोशीने पालन करणे आवश्यक आहे.”
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा वाळव्याचे कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सीमा परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सी. जे. भारसकळे यांनी आभार मानले. प्रा. सचिन गरुड, डॉ. संतोष खडसे, शशिकांत बामणे, सीमा परदेशी, स्मिता पाटील, प्रा. पी. एच. पाटील, जगन्नाथ नांगरे यांनी संयोजन केले.