वावरे काका

डॉ. प्रसन्न दाभोलकर -

मोकळ्या मनाचा प्रांजल खूप अस्वस्थ होता. सर आल्याआल्या त्यानं उभं राहून विचारायला सुरुवात केली, “सर, असं करणं बरोबर आहे का?”

खुर्चीवर बसत सर म्हणाले, “अरे, मला येऊ तर दे! नेमकं काय झालंय?”

जरा शांत होऊन प्रांजल म्हणाला, “सॉरी सर… आपल्या शाळेच्या परिसरात वेडा ‘वावर्‍या’ हिंडत असतो… फाटके कपडे घातलेला, गलिच्छ… स्वतःशीच बडबडत हातवारे करत असतो तो! आज तो पलीकडच्या गल्लीत होता. दुसर्‍या वर्गातली काही मुलं त्याला दगड मारत होती आणि चिडवत होती. मला राहवलं नाही. मी म्हणालो, ‘तुम्ही असं का करता?’ तर ती माझ्यावरच ओरडली, ‘आला फार शहाणा… ही यडी फार डेंजर असतात!’ सर, खरंच अशी यडी फार डेंजर असतात का? का बरं ती अशी फिरतात?”

आमच्या वर्गाचा शिस्तप्रिय मॉनिटर सर्वेश मध्येच म्हणाला, “रस्त्यावर फिरणार्‍या आणि राहणार्‍या अशा लोकांना पकडून तुरुंगात टाकलं पाहिजे.”

अस्वस्थ होऊन सर काही काळ शांत बसून राहिले. हळूच त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, “मीही त्याला बघितलाय… तो वार्‍यासारखा येतो आणि पळत निघून जातो, म्हणून सगळे त्याला ‘वावर्‍या’ म्हणतात. त्यांचं नाव काय असेल? कोण शोधेल?”

सरांच्या या प्रश्नाने आम्ही गप्प झालो. ‘वावर्‍याचं नाव काय असेल?’ हा विचार मनात आल्याबरोबर ‘तोही आपल्यासारखाच एक माणूस आहे’ हे आम्हाला जाणवलं. अखेरीस सरांनी त्याचा आदरार्थी उल्लेख केला, हेही आमच्या लक्षात आलं; पण त्याचं नाव विचारण्याची हिंमत आमच्यात नव्हती.

तडफदार तेजस्विनी म्हणाली, “मी माहिती मिळवेन सर! माझे थोरले काका त्याच्याशी अधूनमधून बोलतात. त्यांना माहीत असेल.”

सरांचा चेहरा जरा निवळला. ते हळूच म्हणाले, “तुझे काका म्हणजे जगदीश ना? ते जगन्मित्र आहेत!”

प्रांजलच्या मनातली भीती अजून कमी झाली नव्हती. त्याने विचारलं, “सर, अशी माणसं डेंजर असतात का हो?”

“डेंजर म्हणजे काय रे?” सरांनी प्रतिप्रश्न केला.

“डेंजर म्हणजे ती आपल्याला मारतात, शिव्या देतात…”

यावर सर हळुवारपणे म्हणाले, “पण तूच तर सांगितलंस की, काही वाईट मुलंच त्यांना त्रास देत होती… चिडवत होती!”

“सर मी पेपरमध्ये वाचलंय… वेडाच्या भरात काही जण आपल्या मुलांचा आणि घरच्यांचा खूनही करतात!” अभ्यासू सुबुद्धीने आपलं मत मांडलं.

“वर्तमानपत्रात अशा बातम्या ठळक रीतीने छापल्या जातात. जगात खून, मारामार्‍या, दंगे सदैव होतात, पण त्यांमधले फारच थोडे वेड्या व्यक्तींनी केलेले असतात. त्यांना वेडं ठरवणारी आपण शहाणी माणसंच जास्त हिंसा करीत असतो.” सरांचा आवाज गंभीर होता.

“मुळात ‘वेड’ म्हणजे काय, हेच आम्हाला माहीत नाही. तुम्ही सांगाल का सर?” अर्चनाने सरांना हळूच विनंती केली.

            “माणसानं काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं, कोणते कपडे घालावेत याची एक समाजमान्य पद्धत असते. वेड लागलेली माणसं ही चाकोरी सोडून विचित्र आणि वेगळं वागायला लागतात. ती अशी का वागत असतात, ते आपल्याला कळू शकत नाही.” सरांनी सांगायला सुरुवात केली.

“पण ती अशी का वागतात, सर?” अर्चनाने मध्येच विचारलं.

“असं समज अर्चना, या माणसांचं जग काहीसं काल्पनिक असतं… म्हणजे त्यांना कोणी बोललं नाही, तरी बोलल्याचे आवाज ऐकू येतात… कोणताही वास नसला, तरी कसलातरी वास आल्याचा भास होतो… ‘कोणीतरी आपल्याला उगाचच त्रास देतंय’, ‘कोणीतरी आपल्या विरुद्ध आहे’ असे खोटेनाटे विचार त्यांच्या मनात मनात घर करतात. यातून चार माणसांसारखं वागणं, स्वतःची योग्य काळजी घेणं, काम करणं यांमधलं त्यांचं लक्ष हळूहळू उडत जातं.” सरांनी समजावून सांगितलं.

“पण अशा माणसांनी रस्त्यावर का फिरायचं? गप घरी राहावं!” राजेश म्हणाला.

सरांच्या चेहर्‍यावर दुःख उमटलं. ते हळुवारपणे बोलायला लागले, “अरे, कोण कधी हौसेनं रस्त्यावर राहतं का? मानसिक आजारांवर उपचार आहेत, याची अजून अनेकांना नीट जाणीव नाही. त्यामुळे अशा माणसांवर अनेकदा वेळेत इलाज केले जात नाहीत… ‘अंधश्रद्धा’ आणि ‘गैरसमज’ यांमुळे उपचार अनेकदा अर्धवट सोडले जातात. काही रोगी औषध घ्यायला नकार देतात. शेवटी घरचा आधार तुटला की, काहीच नीट कळत नसल्यामुळं असे दुर्दैवी जीव रस्त्यावर येतात.”

“पण माणसाला वेड लागतंच का?” अबोल सायलीने हळूच विचारलं.

“मोठा मानसिक धक्का बसला की, वेड लागतं.” चंचल विद्युत् बोलून मोकळा झाला.

“हो, ते एक कारण असू शकतं.” सर आम्हाला नीट समजावून द्यायला लागले, ” ‘वेड’ हा एक मानसिक आजार आहे. शरीराप्रमाणं आपलं मनही आजारी पडतं. शरीराला सर्दीसारखे साधे आजार होतात, तसाच कॅन्सरसारखा दुर्धर रोगही होतो. रस्त्यावर फिरणार्‍या मनोरुग्णांना मनाचा कॅन्सर झालेला असतो असं समजा ना! त्याची कारणं अनेक असतात. आनुवंशिकता, व्यक्तीचा स्वभाव, लहानपणी व्यक्तीला आलेले बरे-वाईट अनुभव, त्याच्या मेंदूमधले रासायनिक बदल, बिकट सामाजिक परिस्थिती… अशी अनेक कारणं आहेत. ‘मनाला अचानक धक्का बसणं’ हे एक कारण होऊ शकतं.”

” ‘वेड’ हा एक रोग आहे, तर त्यावर औषध नाही का? माझी गावाकडची आजी म्हणते ‘ ‘चिंत्या रोगा’वर औषध नाही.’ ” राजेश म्हणाला.

“छान प्रश्न!” सर म्हणाले, ” ‘मानसिक रोगावर इलाज नाही… डॉक्टर नुसती झोपेची औषधं देतात… आपलं मन स्ट्राँग केलं की, मानसिक आजार आपोआप पळून जाईल’ असे गैरसमज अजूनही आहेत. त्यामुळे अशा आजारांवर अनेकदा नीट उपचार केले जात नाहीत. वेडावर वेगवेगळी औषधं उपलब्ध आहेत, पण ती व्यवस्थित आणि दीर्घ काळ घ्यावी लागतात… माणसं कंटाळतात आणि रोग बळावतो.”

“वेड लागलं की शॉक देतात!” काहीतरी मोठं रहस्य सांगितल्याच्या अविर्भावात ईशा म्हणाली.

“त्याला ‘विद्युत् उपचार’ म्हणतात. आपल्याला एखाद्या वेळी चुकून विजेचा शॉक लागतो, तसाच तो शॉक नसतो. माणसाला पूर्ण भूल देऊन हा उपचार केला जातो. त्याबद्दलही समाजात खूप भीती आहे आणि गैरसमज आहेत. एकंदरच मानसिक आजारांबाबत खूप अज्ञान, गैरसमज, भीती आणि अंधश्रद्धा असं सगळं आहे.” सरांनी नीट समजावून सांगितलं.

“पण आपल्याला त्याचं काय पडलंय!” विक्रम म्हणाला.

त्याच्याकडे बघत सर म्हणाले, “अरे, सर्व गोष्टींचं आपल्याला ज्ञान पाहिजे. जगात मानसिक रोगांचं प्रमाण मोठं आहे आणि ते वाढतं आहे. तुम्हाला अजून याची जाणीव नाही. आपण याबाबत मोकळेपणानं बोलत नाही, त्यामुळे तुम्हा मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीत.”

“पण रस्त्यावरच्या अशा रोग्यांसाठी कोण काहीच का करत नाही?” ईशाने कळवळून विचारलं.

“सर्व जगच काही वाईट नाही!” सर बोलायला लागले, “कोणीतरी त्यांना खायला देतं, कपडे देतं, म्हणून ते तग धरू शकतात. अशा माणसांना आधार देऊन त्यांच्यावर उपचार करणार्‍या संस्था निघत आहेत. त्यांना तिथे नेऊन त्यांची काळजी घेतली जाते… उपचार करून सुधारल्यावर त्यांना परत घरीही पाठवतात.”

“सर, तुम्हाला एवढी कशी माहिती?” शांत ऋत्विकने कुतूहलाने विचारलं.

सर म्हणाले, “माझ्या नातेवाइकांमध्ये अशी एक केस झाली होती. माझा वर्गमित्र मनोविकारतज्ज्ञ आहे. त्याच्याकडे मी माझ्या नातेवाइकाला घेऊन जात असे. उपचाराने ते बरे झाले आणि आता आनंदात आहेत. मी अनेक जणांना मानसिक उपचारांसाठी नेत असतो… मनोविकारतज्ज्ञ मित्राकडून अधिक माहिती मिळवत असतो…”

सर्वेश खाली मान घालून म्हणाला, “सॉरी सर! अशा माणसांकडं मी आता रागानं बघणार नाही. ती आजारी आहेत… त्यांना मदतीची, औषधोपचारांची आणि आधाराची गरज आहे, हे मला कळलं.”

सरांचा चेहरा उजळला आणि ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, “शाबास सर्वेश! माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती.”

तेजस्विनी उठून म्हणाली, “सर, मी जगदीश काकांशी बोलेन. ‘वावरे’काकांवर कुठे उपचार करता येईल का, याची ते चौकशी करतील.”

“त्यांना मला भेटायला सांग. आम्ही दोघं मिळून नक्की काहीतरी करू!” एवढं बोलून सर बाहेर पडले. त्यांचा चेहरा खुलला होता.

-डॉ. प्रसन्न दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]