प्रा. डॉ. एस. के. माने -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रा.एन.डी.पाटील प्रतिष्ठान आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ढवळी ता.वाळवा येथे बागणी पंचक्रोशीतील सरपंचाची बैठक पार पडली. या बैठकीस परिसरातील 18 गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विधवा भगिनींच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून अभिनव पद्धतीने केली गेली.
या सरपंच बैठकीला मार्गदर्शन करताना अंनिसच्या राज्य अध्यक्ष सरोजमाई पाटील म्हणाल्या की, हेरवाड गावाने विधवा प्रथेविरुद्ध ठराव करुन आपल्या समोर आदर्श निर्माण केला आहे. त्याच पद्धतीचा ठराव वाळवा तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीनी करुन वाळवा तालुका हा क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे नेहमी ठामपणे उभा राहतो हे दाखवून द्यावे. ठराव केले नंतर त्याची अमंलबजावणी करणेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. विधवा प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आमचे अंनिसचे कार्यकर्तेआपल्या गावात येवून जनजागृती करतील.
सरोजमाई पुढे बोलताना म्हणाल्या की, “महिलांचा आत्मसन्मान नाकारणारी विधवा प्रथा झुगारून द्यावी. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. माझे पती एन. डी. पाटील साहेब यांचे निधन झाले नंतर मी कोणतेही प्रथा परंपरा पाळली नाही, तशी एन.डी.सरांचीच इच्छा होती.”
वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथेविरुद्ध काढलेले परिपत्रक विधवा भगिनींचा सन्मान वाढवणारे आहे. या परिपत्रकानुसार तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने ठराव करावेत. यासाठी जी मदत, मार्गदर्शन लागेल ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल.”
अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अंनिस इस्लामपूरचे उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते दिपक कोठावळे, ग्रामसेवक संघटनेचे दादासो पांडुरंग सिंग या सर्वांनी आपल्या मनोगतात विधवा सधवा हा भेदभाव समाजातून नष्ट झाला पाहिजे, तसेच शासनाने विधवा प्रथेविरुद्ध काढलेला जीआर हा पुरोगामी विचारांची गावोगावी पेरणी करणेसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन केले.
उपस्थित सर्वांना विधवा महिलांचा सन्मान करणेची सामुहिक शपथ प्रा. एस. के. माने यांनी दिली. यावेळी उपस्थित सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी आमच्या गावामध्ये लवकर विधवा प्रथेविरुद्ध ठराव करु असे आश्वस्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाच्या मुलींनी स्वागतगीत गायले. त्याला संगीत शिक्षकांनी सुरेल साथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्लामपूर अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अलका पाटील, डॉ. राजेश दांडगे यांनी तर आभार इस्लामपूर अंनिसच्या अध्यक्षा डॉ.नीलम शहा यांनी मांडले.
या कार्यक्रमास डॉ. एन. आर. पाटील काका (अध्यक्ष, महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर,) बी. ए. पाटील, प्रा. सचिन गरुड, प्रा. संतोष खडसे तसेच ढवळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजन शशिकांत बामणे, राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. माने व त्यांचे सहकारी यांनी केले होते.
– प्रा. डॉ. एस. के. माने, इस्लामपूर