रमेश माने -
सरंजामशाही विचारसरणी असलेल्या काही सवर्ण जातींना असे वाटते की मिशा, विशेषतः मोठ्या आणि पिळदार मिशा, केवळ त्यांच्या समाजातील पुरुषांनीच ठेवायला हव्यात. दलित व्यक्तींनी अशा मिशा ठेवणे म्हणजे त्यांच्या सामाजिक वर्चस्वाला थेट आव्हान देणे आहे, असा त्यांचा गैरसमज आहे.
दलित समाजातील तरुण आता शिक्षण आणि नोकर्यांमुळे अधिक जागरूक व आत्मविश्वासू झाले आहेत. ते मिशा ठेवून, लग्नप्रसंगी घोड्यावर स्वार होऊन किंवा सोशल मीडियावर आत्मविश्वासाने फोटो टाकून आपला आत्मसन्मान व्यक्त करत आहेत. हा आत्मसन्मान सवर्ण समाजाच्या काही लोकांना सहन होत नाही.
मिशा ठेवल्यामुळे किंवा विशिष्ट पद्धतीने कपडे परिधान केल्यामुळे दलितांना शारीरिक हल्ले, अपमान आणि धमक्यांना सामोरे जावे लागल्याची अनेक प्रकरणे राजस्थानमध्ये नोंदवली गेली आहेत.
हा ‘मिशा’वाद केवळ एका केशभूषेपुरता मर्यादित नाही, तर तो जातीय उतरंडीला आव्हान देणार्या दलित हक्कांच्या संघर्षाचे प्रतीक आहे. याविरोधात राजस्थान मधील दलित संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने आवाज उठवत आहेत आणि या अत्याचारांना विरोध दर्शवित आहेत.
पिळदार मिशा ठेवल्या म्हणून जितेंद्र मेघवाल याचा खून केला. जितेंद्र मेघवालच्या हत्येनंतर, त्याचे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी दलित समाज आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप होता. त्याच वेळी, गर्दीतून ‘भाई की मुच्छे उपर रहेगी!’ ही घोषणा देण्यात आली. या घटनेनंतर दलित कार्यकर्ते आणि आंदोलकांनी ही घोषणा मिशी ठेवण्याच्या हक्काचे आणि आत्म-सन्मानाचे प्रतीक म्हणून स्वीकारली.
दलित अधिकार कार्यकर्ते भंवर मेघवंशी यांच्यासारख्या अनेक लोकांनी या हत्येबद्दल आवाज उठवला आणि सांगितले की, ही केवळ मिशीची लढाई नसून, जातीय श्रेष्ठत्वाच्या विचाराला आव्हान देण्याची लढाई आहे. २०१७ मध्ये गुजरातमधील मेहसाणा येथे दलित तरुणांवर मिश्या ठेवल्याबद्दल झालेल्या हल्ल्यानंतर ही चळवळ सोशल मीडियावर व्यापक झाली. दलित तरुणांनी मोठ्या संख्येने त्यांच्या ‘ताव दिलेल्या मिश्यांसह’ सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केल्या. यासाठी #MrDalitWithAMooch आणि #JavirvaadNaVirodhMa (जातिवादाच्या विरोधात) यांसारख्या हॅशटॅगचा वापर केला गेला.

या माध्यमातून दलित तरुणांनी जोर दिला की, मिशी ठेवणे हा संवैधानिक हक्क आहे आणि त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचे, कपडे घालण्याचे किंवा मिशी ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
‘भाई की मुच्छे उपर रहेगी’ हे अभियान किंवा घोषणा, दलित समाजाच्या वाढत्या शिक्षणातून आणि आत्म-जागरूकतेतून आलेले सन्मान आणि समानतेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. घोडीवर बसण्याचा हक्क असो वा मिशी ठेवण्याचा, हे दोन्ही संघर्ष दलित तरुणांनी जातीय उतरंडीला दिलेले थेट आव्हान दर्शवतात.
– राहुल थोरात, रमेश माने
