माधव बावगे -

1993 च्या प्रलयंकारी भूकंपानंतर लगेच लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात निर्भय मानस मोहीम, भानामती प्रबोधन धडक मोहीम समारोप, लातुरात आणि संपूर्ण मराठवाड्यात विवेक जागर वाद – संवाद, विवेक जागर यात्रा, वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, महिला जाहीरनामा संकल्प परिषद. एकट्या लातुरात या सर्व कार्यक्रमांना त्यांना ‘महा. अंनिस’च्या वतीने निमंत्रित करण्यात आले आणि ते उपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याशी अगदी कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. एवढेच काय, तर एका कार्यक्रमाच्या वेळी “तुझ्या घरी नाश्ता करायचंय,” म्हणून माझ्या घरीही आले. एक तास थांबले. दिलखुलास चर्चा केली. पुण्यात अनेक वेळा आम्ही कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेटी द्यायचो. विचारांचे पक्के. त्यामुळे चळवळीत जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळायची. ‘महा. अंनिस’च्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांना खूप अभिमान वाटायचा. डॉ. नरेंद्र दाभोलकर सरांप्रमाणेच डॉ. लागूही मला ‘अरे माधव,’ म्हणूनच बोलायचे. असा तोलामोलाचा आधारवड गेल्याने हुरहूर वाटते. ‘महा. अंनिस’साठी हे न भरून निघणारे दुःख आहे. अकारणी दीपाताई आणि आपण ‘अंनिस’ कार्यकर्ते पोरके झालो. अत्यंत दुःखद अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली!