धनगर समाजाची पुरोगामी पावले!

बबनराव रानगे -

सुंबरान मांडलं गा, सुंबरान मांडलं !
तवाच्या येळंला आन, तवाच्या गा काळाला!!

सुंबराने म्हणजे स्मरण करून मांडले आहे. धनगर समाजातल्या चालीरीती, रूढी, परंपरा, इतिहास हा स्मरण करून ठेवलेला आहे. तो ओव्यांमधून ऐकायला मिळतो.

धनगर समाज मुख्यतः मेंढपाळ, भटका समाज! शेपाचशे मेंढ्यांचा कळप घेऊन रानोमाळ भटकायचं, शेतकर्‍याने परवानगी दिली तर, पीक गेल्यानंतर शेतात मेंढ्या चारायच्या, बसवायच्या! लेंडी खताने शेती समृद्ध करायची; मेंढ्यांना पाऊस सोसत नाही, म्हणून पाऊस नसलेल्या भागांमध्ये मेंढ्यांना हलवायचं, हा मुख्य उद्योग! वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी शेती करणार्‍या शेतकर्‍याला कूळकायद्याने शेताचे मालक होता आले; पण वर्षानुवर्षे याच माळावर मेंढ्या चारणार्‍या धनगर समाजाला मात्र कायम भटकेच रहावे लागले.

शहरीकरणामध्ये माळ कमी झाले, सिमेंटचे जंगल उभे राहिले, गायराने दुसर्‍याच उद्योगासाठी वापरली गेली; पण धनगरांना कुणीही विचारात घेतले नाही. कमी कमी होणार्‍या शेतीमध्ये कीटकनाशकांचे विष पसरले जाते, त्याचाही परिणाम मेंढ्यांवर होतो; अशा अनेक समस्यांना सध्या धनगर समाज तोंड देत आहे.

इतिहासात या समाजातून काही राज्यकर्त्यांचाही उदय झाला आहे. ‘अहिल्यादेवी’सारख्या राज्यकर्त्यांनी आपल्या पुरोगामी कार्याचा ठसा आणि आदर्श मागे ठेवला आहे. मेंढपाळ मल्हारराव पहिल्या बाजीरावांच्या संपर्कात आले आणि कर्तृत्वाने इंदूरचे संस्थानिक बनले. अहिल्यादेवींनी सर्व देश माझा आहे म्हणूनच कार्य केले. त्या ‘राष्ट्रमाता’ बनल्या. दानधर्म, पाणपोया, मंदिरांचा जीर्णोद्धार करत असताना, त्यांनी एकाच धर्माचे ओझे घेतले नाही. मशिदी बांधल्या आणि दर्ग्यालासुद्धा मदत केली.

यशवंतराव होळकर यांनी सर्व संस्थानिक एकत्र करण्याचा आणि ब्रिटिशांवरोधात लढण्याचा प्रयत्न केला, त्यांनी इंग्रजांचा २९ वेळा पराभव केला. स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. होळकरांच्या राज्यामध्ये महिलांचा सन्मान, भुकेलेल्या अन्न, गरजूंना मदत ही तत्त्वे होती. पेशव्यांच्या प्रदेशात जातिभेद तीव्र होते, त्याच काळात होळकर यांच्या राज्यात मात्र समता नांदत होती! गळ्यात मडके आणि पाठीला फेसाठी, अशा गोष्टी होळकर राज्यात दिसत नाहीत. म्हैसूरचे वाडियार राजे धनगर होते. शिवरायांचे अनेक शूर सरदार धनगर होते. मावळ्यांनी धनगर मावळ्यांकडून गनिमी कावा आत्मसात केला. ब्रिटिशांना धनगर शिंगरोबांनी मुंबईचा मार्ग दाखवला; त्या मार्गाचा घाट तयार झाला. पण स्वाभिमानी शिंगरोबांनी बक्षीस नाकारले, तेव्हा उद्धट म्हणून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. अशा तर्‍हेने धनगर समाजाला पुरोगामी विचारांचा आणि आचारांचा वारसा आहे.

महाराष्ट्राच्या ३६ च्या ३६ जिल्ह्यांत धनगर समाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात धनगर आहेत. ‘जत’सारख्या भागात तर गावेच्या गावे या समाजाची आहेत. तर ‘शिरोळ’सारख्या तालुयात ते जमीनदार आहेत. डोंगरी भागात अडचणी जास्त असतात, त्यामुळे स्थलांतर करून हा समाज इतरत्र गेला. महाराष्ट्रात धनगर समाजाची एकूण संख्या एक कोटी २० ते ३० लाख एवढी आहे. या समाजाला रानोमाळ भटकत असल्यामुळे गावापासून दूर राहावे लागते, त्यामुळे तो बुजरा असतो.

सर्व धनगरांचा ‘बिरोबा’ हा देव आहे. डगे धनगर यांच्यामध्ये त्याशिवाय कुलदेवता देवी आहेत. काही भागांमध्ये खंडोबा किंवा स्थानिक देव, म्हसोबा, नायकोबा, अशाही कुलदेवता आढळतात. पंढरपूर वारी मेंढपाळ धनगरांनी सुरू केली. आजही आरतीच्या वेळी धनगरी ढोल वाजतो. लातूर जवळचे काळे महाराज, अकोल्याचे पुंडलीक महाराज आणि संत बाळूमामा वारकरी संत होते. अशा नऊ संतांची स्मारके महाराष्ट्रात आढळतात. त्याशिवाय लिंगायत धनगर संत वेगळेच.

धनगर समाजात मेंडे, झेंडे, डंगे, हटकर इत्यादी ३२ पोटजाती आहेत. त्यांच्यात दहा वर्षांपूर्वीपर्यंत रोटी बेटी व्यवहार होत नव्हता. अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राज्यभर ‘नको पक्ष भेद, नको शाखा भेद, धनगर सारा एक!’ अशी घोषणा घेऊन राज्यभर दौरे काढले. या प्रबोधनाचा परिणाम म्हणून गरजेनुसार काही प्रमाणात पोटजातींमध्ये विवाह होत आहेत. उच्च शिक्षण प्राप्त तरुण-तरुण सुयोग्य वर-वधू मिळण्यासाठी पोटजातींमध्ये शोध घेत आहेत. घटनेमध्ये धनगर समाजाची नोंद एसटी म्हणून आहे. पण केंद्रामध्ये त्याला ओबीसीमध्ये तर राज्यांमध्ये ‘एनटी’ मध्ये घातले आहे. आपल्याला घटनेप्रमाणे आरक्षण मिळावे अशी समाजाची मागणी आहे. अलीकडे समाजाला शिक्षणाचे महत्त्व कळू लागले आहे.

पूर्वी धनगर समाजात मृत्यूनंतर दफनाची पद्धत होती; पण अलीकडच्या दहा वर्षांत दहनाची पद्धत रुजू लागली आहे. मृत्यूनंतर तिसर्‍या दिवशी माती सावरली जाते व सर्व उत्तर कार्य केले जाते. या वेळी बकरे कापले जाई, ते अलीकडे बंद झाले आहे. भाकणूक करणार्‍या देवऋष्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याचे दफन केले जाते आणि त्याच दिवशी माती सावरून तीन बकरी कापली जातात! धनगर समाजात ताईबाईच्या जत्रेला महत्त्व होते. नातेवाईक एकत्रित येऊन मेंढी कापून जत्रा करत असे. त्यामध्ये गाभण मेंढी कापून गर्भ मातीत पुरला जातो. ही प्रथा प्रयत्न करून आम्ही बंद केली.

धार्मिक विधीसाठी समाजातील पुजारी व रानगे या आडनावाचे लोक काम करतात. डंगे धनगरांमध्ये गावडे आडनावाचे पुरोहित आहेत, तेच लग्न लावतात. मंगलाष्टका मध्ये जमीन, वारा, पाऊस यांचे आभार मानलेले दिसतात. अलीकडे काही जण ब्राह्मण पुरोहितांना बोलावू लागले आहेत.

पूर्वी बालवयातच लग्ने होत, काही वेळा पाळण्याला बाशिंग बांधले जाई. आता बालविवाह बंद झाले आहेत. प्रबोधनाबरोबर त्यांना कायद्याचाही धाक आहे. मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिणामी इतर समाजाप्रमाणेच या समाजातही, गावोगाव ३५-४० वयाची अविवाहित मुलं- मुली दिसून येत आहेत.

अलीकडेपर्यंत जात पंचायत न्यायनिवाडा करत असे. समाजविरोधी कृती, चोरीमारी, अनैतिक कृत्ये यावर दंड आणि वाळीत टाकणे अशा शिक्षा असत. आता जात पंचायत बंद पडून भारतीय कायद्याप्रमाणे न्याय-अन्याय केला जातो.

मेंढपाळ व्यवसाय असल्यामुळे देवाला स्वतः पाळलेले चांगले मेंढरू बळी दिले जाते. वाशी आणि आरेवाडीच्या जत्रेत हजारो बकरी बळी दिली जात. जत्रेसाठी लांब लांबून समाज येतो; एकत्र आल्यावर सुखदुःखाच्या गोष्टी होतात; विचारपूस होते; लग्नं जुळवली जातात. मेंढ्या पाळणे हाच व्यवसाय आहे, तर स्वतः पाळलेल्या मेंढ्यांपैकी एक मेंढी परंपरेप्रमाणे देवाला बळी दिली जाते. लोक जे अन्न घेत असतात त्याचा नैवेद्य देवाला दाखवत असतात. त्यामुळेच जत्रेत मेंढ्या कापल्या जातात. त्यामध्ये सुधारणा व्हायला हवी हे खरे. त्याप्रमाणे सुधारणा झालेली सुद्धा आहे. देवळाच्या आसपास कुठेही मेंढी कापल्यामुळे सर्वत्र रक्त सांडलेले असे, ते ओंगळवाणे दिसत असे. आता हे प्रमाण कमी झालेले आहे. बकरी कापण्यासाठी वेगळी जागा, रांगेने एकेकाला पाठवणे, बकरी साफ करण्यासाठी दुसरी जागा, पुरेशा पाण्याची सोय असे बदल यात्रा कमिटीने केलेले आहेत. पण नवसासाठी मेंढी कापणे किंवा कर्ज काढून मेंढी कापणे या गोष्टी चुकीच्याच आहेत. त्यासाठी प्रबोधन होणे जरुरीचे आहे.

या समाजात महिलांची परिस्थिती थोडीफार इतर जाती-धर्माप्रमाणेच आहे. महिला पुरुषांबरोबर काम करतात मेंढ्या घेऊन फिरण्यासाठीसुद्धा त्या मदत करतात. लहान कोकरांना पाला पुरवणे, त्यांचा सांभाळ करणे, निगा राखणे अशी कामे त्या करत असतात. त्यामुळे त्यांचा वावर पुरुषांबरोबर असतो. काही वेळा नवरा-बायको मध्ये मतभेद होतात. अलीकडे अशा प्रसंगी कायदेशीर घटस्फोट घेतला जातो. पुनर्विवाहाला समाजाचे बंधन नाही. आंतरजातीय विवाहाचे प्रमाण कमी आहे. खेडेगावात पाच- दहा वर्षांत एक दोन आंतरजातीय विवाह झालेले दिसतात. अशा विवाहांना समाज विरोध करत नाही. धनगर समाजातील मुली करून आणणे पुण्याचे काम मानले जाते. पण आपल्या मुली धनगर समाजात देत नाहीत. वैदिक धर्माप्रमाणे अनुलोम विवाहाला मान्यता आहे, पण प्रतिलोम विवाहाला विरोध केला जातो. तीच ही मानसिकता आहे.

शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, पण रोजगार नाही. शिकलेला मुलगा मेंढ्या पाळत नाही. त्यामुळे आता पारंपरिक व्यवसाय करणार्‍यांची संख्या फक्त तीस टके राहिली आहे. अल्पशिक्षित लोक प्लंबिंग, सेंटरिंगची कामे सुद्धा करतात. मेंढपाळ व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्याची गरज आहे. बंदिस्त शेळीपालन, गोट फार्म याकडे लोकांना वळविण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे. धनगर निसर्गाशी एकरूप होऊन आपला व्यवसाय करतात. सूर्य, तारे यावरून वेळ ठरवतात. बकरे फ्रॅचर झाले तर चार कामटे काढून पाय बांधतात. त्यावर लेप देऊन डागण्या देऊन पाय बरा करतात. त्यांच्याकडे असे पारंपरिक ज्ञान आहे, पण ते नोंदवून लिखित स्वरूपात एकत्र केलेले नाही.

सण-समारंभ प्रसंगी धनगरी ढोल वाजवणे, ठरावीक तालात गज नृत्य करणे, धनगरी ओव्या म्हणणे, असे करमणुकीचे मार्ग या समाजात दिसतात. ओव्यांमधून मौखिक कथा, पुराणकथा सांगितल्या जातात. या कथांमध्ये दैववादाबरोबर बिरोबाचेही वर्णन असते. समाजात सोवळे ओवळे मानले जात नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांशी बोलणे चालणे असते. मेंढपाळांचा सर्वांत जवळचा व्यावसायिक मित्र म्हणजे खाटीक. दोन्ही समाजाचा देव एकच म्हणजे ‘बिरोबा’ आहे. खाटीक समाजात बिरोबा हे कुलदैवत आढळते. तोही हजारोच्या संख्येने बिरोबाला भजतो. खाटकाच्या लग्नात धनगरांचा पुजारी यावा लागतो. प्रत्येक शुभकार्याला ते धनगरांना बोलावतात.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या समाजात शंभर आंतरजातीय विवाह घडवून आणायचे असा संकल्प केला होता. त्याप्रमाणे त्यांनी पहिला मराठा-धनगर विवाह स्वतःच्या नात्यामध्ये लावून दिला. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे हे काम अपुरे राहिले. ते पूर्ण करण्यासाठी आपण झटले पाहिजे.

सर्वसामान्यपणे धनगर समाज जातीच्या बाहेर पाहायला तयार नाही, त्यामुळे भुते-खेते, लागीरं, देवऋषी या चक्रात काही जण अडकतात; त्यात बदल केला पाहिजे. कर्ज काढून सण करणे, जत्रा करणे, बकरे कापणे, या गोष्टी पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत. आर्थिक परिस्थिती सुधारलेले आणि सुशिक्षित यांच्यामध्ये ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती बंद करून अहिल्यादेवींचा साधेपणाचा आणि समतेचा विचार अंगी बाणवला पाहिजे.

फुले-शाहू-आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गानेच वाटचाल केली तरच समाजाचा विकास होणार आहे, त्याच दिशेने आपण पावले टाकू या.

बबनराव रानगे, कोल्हापूर

प्रदेशाध्यक्ष, मल्हार सेना महाराष्ट्र राज्य

लेखक संपर्क : ९६६७३८२७७८


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ]