-

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची इस्लामपूर शाखा आणि येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध ग्रंथकार ह.भ.प. देवदत्त परूळेकर यांनी संत परंपरेवर लिहिलेल्या दहा महत्त्वाच्या पुस्तकांचे (ग्रंथमालेचे) प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले.
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी आणि ज्येष्ठ मार्गदर्शिका मा. सरोज पाटील (माई) यांच्या हस्ते या ग्रंथमालेचे प्रकाशन करण्यात आले. सुभाष ढगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर विशेष अतिथी म्हणून छत्रपती शाहू कॉलेज (कोल्हापूर) चे प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले आणि कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. व्ही. गायकवाड उपस्थित होते.
याप्रसंगी ह.भ.प. देवदत्त परूळेकर यांनी लिहिलेल्या संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत निर्मळा, संत सोयराबाई, संत गोरा कुंभार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ आणि ‘संतांची मांदियाळी’ भाग १ व २ या पुस्तकांचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.
या वेळी लेखक देवदत्त परूळेकर म्हणाले, “मराठी व भारतीय संत परंपरेने समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे आणि प्रबोधनाचे खरे कार्य केले. मात्र, दुर्दैवाने काळाच्या ओघात त्यांना केवळ चमत्कार आणि दैवी रूपात अडकवून ठेवले गेले. आजच्या काळात संतांचे हे मूळ विवेकवादी विचार समाजापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.”
पुस्तकांचे स्वागत करताना मा. सरोज पाटील यांनी समाजात वाढत्या अंधश्रद्धेवर चिंता व्यक्त केली आणि संतांच्या या वैचारिक साहित्यामुळे समाजाला विवेकाची नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले यांनी संत कबीरांच्या विवेकवादाचे आणि निधर्मी विचारांचे महत्त्व सांगत या ग्रंथमालेचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात सुभाष ढगे यांनी या वैचारिक साहित्याचा प्रचार सर्वदूर होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
डॉ. एस. के. माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी मान्यवरांचा आणि प्रकाशित ग्रंथमालेचा सविस्तर परिचय करून दिला. शशिकांत बामणे यांनी आभार, तर डॉ. राजेश दांडगे यांनी सूत्रसंचालन केले.
या सोहळ्याला उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील, ज्युनियरचे उपप्राचार्य प्रा. संतोष पाटील, प्रा. मिलिंद खंडेलोटे, फारुख गवंडी, डॉ. विजय ककडे, दीपक कोठावळे, डॉ. संजय निटवे, वाघेश साळुंखे, अमर खोत यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि इतिहास व साहित्यप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
