-
शिबिरात वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादाचा जागर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली जिल्हा यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ईश्वरपूर येथे आयोजित दोन दिवसीय अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अंनिसच्या राज्य मार्गदर्शिका मा. सरोज पाटील (माई) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
उद्घाटनप्रसंगी मा. सरोज पाटील (माई) यांनी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचारसरणी आणि संविधानाने अपेक्षित केलेली वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. अंधश्रद्धा, अवैज्ञानिक समजुती आणि भोंदूगिरीविरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी प्रशिक्षण, जनजागृती आणि संघटनबांधणी यांचे महत्त्व त्यांनी विशद केले.
समारंभाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प. देवदत्त परूळेकर यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे समाजप्रबोधनातील योगदान अधोरेखित केले. विवेकनिष्ठ समाज घडविण्यासाठी अंनिसच्या चळवळीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून सामाजिक परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष ढगे यांनी अध्यक्षीय भाषणात अंनिसच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी मूल्ये आणि संविधानिक विचार समाजात रुजविण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास प्राचार्य पी.व्ही. गायकवाड, शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, प्रा. वासुकाका गुरव, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमर खोत, उप प्राचार्य संदीप पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे समन्वयक व अंनिसचे राज्य कार्यवाह डॉ. एस. के. माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिबिराच्या आयोजनामागील उद्देश, प्रशिक्षणाची रूपरेषा आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित विविध विषयांची माहिती त्यांनी दिली. अंनिस वार्तापत्राचे कार्यकारी संपादक राहुल थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजेश दांडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अंनिस इस्लामपूर शाखेचे कार्याध्यक्ष श्री. शशिकांत बामणे यांनी आभार प्रदर्शन केले.
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. मा. दीपक कोठावळे यांनी ‘चमत्कार सादरीकरण व बुवाबाजी संघर्ष’ या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून दाखविले. डॉ. घनश्याम कांबळे यांनी ‘मन आणि मनाचे आजार’ या विषयावर मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करत वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘कार्यकर्त्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर सामाजिक कार्य करताना मानसिक संतुलन, तणाव व्यवस्थापन आणि भावनिक सक्षमता यांचे महत्त्व स्पष्ट केले.
मा. फारुख गवंडी यांनी ‘चला अंनिस समजून घेऊ या’ या विषयातून अंनिसची विचारधारा, कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि सामाजिक बांधिलकी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वाघेश साळुंखे यांनी ‘फलज्योतिषाचा फोलपणा’ या विषयावर वैज्ञानिक विवेचन करून फलज्योतिषासंदर्भातील अंधविश्वास आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. डॉ. संजय निटवे यांनी ‘आकाश निरीक्षण’ या सत्रामध्ये प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे खगोलशास्त्रातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या. सौ. सुजाता म्हेत्रे यांनी ‘छद्मविज्ञान’ या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विविध अवैज्ञानिक दावे, गैरसमज आणि समाजामध्ये प्रचलित असलेल्या छद्मवैज्ञानिक संकल्पनांचे विवेचन करून वैज्ञानिक विचारसरणी स्वीकारण्याचे आवाहन केले.
शिबिरामध्ये सांगली जिल्ह्यासह विविध भागांतील अंनिसचे कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विवेकवादी विचारांचे अभ्यासक असे ४० कार्यकर्ते सहभागी झाले. संपूर्ण शिबिरात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसाराचा प्रभावी संदेश देण्यात आला. शिबिराची सांगता जगन्नाथ नांगरे यांच्या चळवळीतील गीतांच्या गायनाने झाली. शिबिराचे नेटके नियोजन शशिकांत बामणे, प्रा. चंद्रकांत भारसकळे, निलेश जगताप, महेश पाटील यांनी केले.
